आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि जनसेना पक्षाचे (जेएसपी) प्रमुख पवन कल्याण यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण म्हणजे ड्रोनद्वारे फोटो काढणे नाही. निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासने पाळणे आणि कल्याणकारी योजनांसाठी काम करणे, म्हणजे राजकारण होय, अशी टीका रेड्डी यांनी केली.

अनकापल्ली आणि नरसिपट्टणम येथे शनिवार व रविवारच्या विविध कार्यक्रमांमध्ये बोलताना, जगन मोहन रेड्डी यांनी नायडूंवर सर्व वर्गातील लोकांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. नायडू यांच्या प्रसिद्धीच्या वेडामुळे नेल्लोर जिल्ह्यात त्यांच्या जाहीरसभेत चेंगराचेंगरी घडली आणि आठ लोकांचा मृत्यू झाला, असा आरोप रेड्डी यांनी केला.

हेही वाचा- “भारत जोडो यात्रा यशस्वी झाली पण… “, राहुल गांधींच्या प्रतिमेबाबत शशी थरूर यांचं विधान

“जेव्हा आपण चंद्राबाबू नायडूंचा विचार करतो तेव्हा पाठीत वार करणे आणि फसवणूक करणे, या दोनच गोष्टी आपल्या मनात येतात. तर पवन कल्याण चौदा वर्षांपूर्वी राजकारणात आले आहेत. मात्र, त्यांना अद्याप एकही जागा जिंकता आली नाही. ते नायडूंना आपल्या खांद्यावर घेऊन मिरवत आहेत. शिवाय नायडू यांनी लिहून दिलेली स्क्रीप्टच ते बोलतात,” असंही रेड्डी म्हणाले.

हेही वाचा- त्रिपुरा विधानसभा निवडणूक: भाजपाकडून ‘रथयात्रे’ची घोषणा

नेल्लोर जिल्ह्यातील ‘रोड शो’दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत आठ जणांच्या मृत्यूसाठी मुख्यमंत्री रेड्डी यांनी नायडू यांना जबाबदार धरलं. “चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांची जबाबदारी नायडू यांनी घेण्याऐवजी ते लोकांनाच मृत्यूसाठी दोष देत आहेत. पण नायडूंचा प्रसिद्धीचा हव्यास हाच मृत्यूकांड घडण्याचं मुख्य कारण आहे. राजकारण हे ड्रोनद्वारे फोटो काढण्यासाठी नसते, तर ते लोकांच्या जीवनात मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी असते,” असा टोलाही जगन मोहन रेड्डी यांनी लगावला.

हेही वाचा- “…तर भाजपाला निवडणूक जिंकणे अवघड,” सक्षम पर्याय हवा म्हणत राहुल गांधींचे विरोधकांना आवाहन म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रसिद्धीच्या हव्यासापोटी चंद्राबाबू नायडूंनी लोकांना अरुंद गल्लीत नेले. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत आठ लोकांचा मृत्यू झाला. यापूर्वी २०१५ मध्येही गोदावरी पुष्करलू येथे अशीच घटना घडली होती. ज्यामध्ये २९ लोकांच्या मृत्यू झाला. त्यामुळे अलीकडे घडलेली चेंगराचेंगरी नायडू यांच्यासाठी नवीन नाही. त्यांना फक्त आपल्या प्रसिद्धीची काळजी आहे,” अशी टीका रेड्डी यांनी केली.