आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी चिकन नेकचा मुद्दा उपस्थित करत बांगलादेशचे अंतरिम मुख्यमंत्री मुहम्मद युनूस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘चिकन नेक’ कॉरिडॉरबाबत मुहम्मद युनूस यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत सरमा यांनी बांगलादेशला इशारा दिला आहे. बांगलादेशच्या स्वतःच्या भौगोलिक असुरक्षिततेवर प्रकाश टाकत हिमंता बिसवा सरमा म्हणाले, “‘चिकन नेक कॉरिडॉर’ वर भारताला नेहमीच धमकावणाऱ्यांनी, बांगलादेशकडे स्वतःचे दोन चिकन नेक आहेत हे लक्षात ठेवावे.” नेमका हा वाद काय? जाणून घेऊयात.
हिमंता बिसवा सरमा काय म्हणाले?
मार्च २०२५ मध्ये चीनच्या दौऱ्यावर असताना मुहम्मद युनूस यांनी बांगलादेश हा भारताच्या ईशान्येकडील राज्यांसाठी एकमेव महासागराचा रक्षक असल्याचे म्हटले होते. भारतातील इशान्य भाग भूपरिवेष्टित असल्याचेही सांगितले होते. यातून भारताच्या प्रादेशिक सुरक्षेबद्दलची चिंता दिसून येते. त्यातच सिलीगुडीजवळील भारत-बांगलादेश सीमेजवळ बांगलादेशातील लालमोनिरहाट येथे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील हवाई तळ चीन पुन्हा विकसित करत असल्याचे वृत्तदेखील समोर येत आहे.
हिमंता बिसवा सरमा यांनी काही भौगोलिक तथ्ये सादर करत बांगलादेशला त्याच्या स्वतःच्या प्रादेशिकदृष्ट्या संवेदनशील प्रदेशांची आठवण करून दिली. बांगलादेशमध्ये दक्षिण दिनाजपूर ते नैऋत्य गारो हिल्स हा प्रदेश संवेदनशील आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी दक्षिण त्रिपुरा ते बंगालच्या उपसागरापर्यंत जाणाऱ्या चितगाव कॉरिडॉरचाही उल्लेख केला. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कॉरिडॉर बांगलादेशची आर्थिक राजधानी आणि राजकीय राजधानी यांच्यातील एकमेव दुवा आहे. सरमा यांनी केलेल्या दाव्यानुसार, यापैकी कोणत्याही चिकन नेकमध्ये व्यत्यय आल्यास बांगलादेशमधील आर्थिक आणि अराजकीय राजधानीत तुटवडा निर्माण होईल. आपण केवळ भौगोलिक परिस्थिती मांडत असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
“भारताच्या सिलिगुडी कॉरिडॉरप्रमाणेच, आपला शेजारील देशदेखील दोन अरुंद कॉरिडॉरने वेढलेला “
सिलिगुडी कॉरिडॉर हा सुमारे २२ ते ३५ किलोमीटर रुंद जमीन असलेला एक अरुंद भाग आहे. हा भाग भारताच्या ईशान्येकडील राज्यांना देशाच्या उर्वरित भागाशी जोडतो. भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, नागालँड, मिझोरम, त्रिपुरा आणि सिक्कीम यांचा समावेश आहे. ही राज्ये बांगलादेशशी १,५९६ किलोमीटर, चीनशी १,३९५ किलोमीटर, म्यानमारशी १,६४० किलोमीटर, भूतानशी ४५५ किलोमीटर आणि नेपाळशी ९७ किलोमीटर विस्तृत आंतरराष्ट्रीय सीमा सामायिक करतात.
ही सर्व राज्ये देशाच्या उर्वरित भागाशी ‘चिकन नेक’ कॉरिडॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका अरुंद २२ किलोमीटर रुंदीच्या मार्गाने जोडलेली आहेत. आसामच्या मुख्यमंत्र्यांचे विधान या प्रदेशातील भारताचा व्यापक धोरणात्मक दृष्टिकोन दर्शवितो. तसेच बदलत्या भौगोलिक राजकीय परिस्थितीत महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यावर भर देतो.