उमाकांत देशपांडे लोकसत्ता

मुंबई : उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाची मागणी शिवसेना शिंदे गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केलेली नसताना भाजपने अद्याप या मतदारसंघातून उमेदवाराची घोषणा केलेली नाही. भाजपसाठी सर्वात कठीण असलेल्या या मतदारसंघात पराभवाचा फटका बसू नये, यासाठी भाजप सावध भूमिकेत असून चांगल्या उमेदवाराच्या शोधात आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ भाजप खासदार पूनम महाजन यांनी २०१४ व २०१९ मध्ये दोन वेळा जिंकला. मात्र वरिष्ठांची नाराजी, पक्षांतर्गत वाद, तक्रारी आणि सर्वेक्षण अहवाल आदी कारणांमुळे महाजन यांना उमेदवारी घोषित होऊ शकलेली नाही. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी अनेकदा आग्रह करूनही त्यांनी आपल्याला रस नसल्याचे वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे.

हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024 : उमेदवारीवरून मराठवाड्यातील चार मतदारसंघात ‘ गोंधळात गोंधळ’

या मतदारसंघात साडेचार-पाच लाख मुस्लिम व ख्रिश्चन मतदार असून ते भाजपविरोधात मतदान करतात. २०१४ व १९ मध्ये भाजपची शिवसेनेबरोबर युती होती आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची या मतदारसंघात ताकद असल्याने त्याचा फायदा महाजन यांना झाला होता. त्यांना मिळालेली ४०-५० टक्के मते शिवसेनेची होती. आता ठाकरे विरोधात असून काँग्रेसकडून माजी आमदार नसीम खान यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. शेलार यांचे मतदारसंघातील मुस्लिम व ख्रिश्चन समाजाशी चांगले संबंध असल्याने ते विजय मिळवू शकतात, असे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.

पण शेलार यांना महाराष्ट्रातील राजकारणात अधिक रस आहे. निवडून आल्यास केंद्रातील मंत्रीपद त्यांना मिळण्याची शक्यता कमी आहे. भाजप सरकार आल्यास पियूष गोयल यांना मंत्रीपद मिळेल. शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मध्य मुंबईतून विजय मिळाल्यास त्यांचाही मंत्रीपदावर दावा असेल. त्यामुळे शेलार यांना मंत्रीपद मिळणार नाही.

हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024 : रामटेकमध्ये केदार यांची कोंडी करण्याचे महायुतीचे प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेलार महाराष्ट्रातील राजकारणातच राहिल्यास विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना राज्यात महत्वाच्या खात्याचे मंत्रीपद मिळेल. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यास मुंबई अध्यक्षाचा पराभव झाला, अशी विरोधकांकडून टीका होईल आणि विधानसभा उमेदवारीतही अडचणी येतील. शेलार यांनी लोकसभा निवडणूक लढविल्यास ठाकरे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे त्यांच्या विरोधात सर्व ताकद एकवटतील. त्यामुळे शेलार व भाजप नेते कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीत.प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षीत, रवीना टंडन यांनी येथून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच या मतदारसंघाची शिंदे किंवा अजित पवार गट मागणी करीत नसतानाही भाजपने उमेदवार घोषित केला नसून सुयोग्य उमेदवाराचा शोध करण्यात येत आहे. अन्य उमेदवार न मिळाल्यास महाजन यांनाच उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. पण शेलार किंवा आमदार पराग अळवणी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे.