काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या शरणागतीच्या वक्तव्यावरून राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर शरणागती पत्करल्याची टीका केली होती. त्यावर भाजपा आक्रमक झाली असून, भाजपाने पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी राहुल गांधींवर टीका करीत म्हटले की, त्यांच्यात या पदासाठी आवश्यक असलेले गांभीर्य आणि परिपक्वता नाही. पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी राहुल गांधींचा उल्लेख काँग्रेस पक्षाचे ‘स्वघोषित सर्वोच्च नेते’ असा केला. भाजपा नेत्यांनी काय आरोप केले? या प्रकरणावरून राजकारण का तापले? ते जाणून घेऊ.

भाजपाचा पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर हल्लाबोल

भाजपा खासदार सुधांशु त्रिवेदी म्हणाले, “अत्यंत नीच दर्जाची विधाने करून स्वयंघोषित सर्वोच्च नेते राहुल गांधी जगाला सांगत आहेत की, विरोधी पक्षनेते झाल्यानंतरही त्यांच्याकडे या पदासाठी आवश्यक असलेले गांभीर्य आणि परिपक्वता नाही.” ते पुढे, “राहुल गांधींनी आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याची आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या संक्षिप्त माहितीची तुलना आत्मसमर्पणाशी कशी केली, यावरून त्यांची मानसिकता दिसून येते,” असेही म्हणाले.

सुधांशु त्रिवेदी यांनी राहुल गांधींवर देशाच्या स्वाभिमानाचा अपमान केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “हिंदीत एक म्हण आहे. ‘नया मुल्ला ज्यादा प्याज खाते है’; परंतु इथे ‘गैर मुल्ला इस कदर प्याज खाने में लगा है’ की, त्यांना हेदेखील कळत नाही की, ते भारताच्या स्वाभिमानाचा आणि भारतीय सैन्याच्या शौर्याचा अपमान करत आहेत.” भाजपा खासदार पुढे म्हणाले, “आतापर्यंत काँग्रेस नेते पाकिस्तानी माध्यमांना बातम्या देत होते, त्यांच्या विधानांचा उल्लेख पाकिस्तानी संसदेत केला जात होता. पण पहिल्यांदाच राहुल गांधींनी असे काही म्हटले आहे, जे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनीही म्हटले नाही किंवा पाकिस्तानच्या कोणत्याही दहशतवादी संघटनेनेही, असे म्हटलेले नाही. मसूद अझहर किंवा हाफिज सईद यांनीही असे म्हटलेले नाही.”

“त्यांच्यापैकी कोणीही असे म्हटले नाही की, भारताने आत्मसमर्पण केले. आतापर्यंत ते पाकिस्तानच्या लोकांना, पाकिस्तानी सैन्याला आणि दहशतवादी संघटनांना वाचवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, ते आता त्यांचे नेते होण्याचा प्रयत्न करीत आहेत का”, असाही प्रश्न त्यांनी विचारला. सुधांशु त्रिवेदी यांनी निवडणुकीतील पराभवाबद्दल पक्ष आणि राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले, “निवडणुकीच्या निकालात तिसऱ्या प्रयत्नात येणाऱ्या अपयशाला यश मानणाऱ्या आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून येणे हा पराभव मानणाऱ्या व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि शहाणपणा किती आहे हे स्पष्टपणे दिसून येते.”

भाजपा खासदार काँग्रेसला प्रश्न विचारत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षाला विचारू इच्छितो की, राहुल गांधींनी आत्मसमर्पण हा शब्द वापरून लष्कराचा अपमान केला आहे की नाही? त्यांनी असा शब्द वापरला आहे, जो पाकिस्तानचे सैन्य, दहशतवादी संघटना किंवा संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेले मसूद अझहर किंवा हाफिज सईद यांनीही वापरलेला नाही.”

अमित मालवीय काय म्हणाले?

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एका ‘एक्स’ पोस्टमध्ये लिहिले, “इतिहास लक्षात ठेवेल की, डोकलामपासून पहलगामपर्यंत जेव्हा जेव्हा भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि जागतिक शक्ती म्हणून उदयास येण्यासाठी एकत्र आला, तेव्हा राहुल गांधींनी भारताच्या राजकीय आणि आर्थिक पुनरुत्थानाला विरोध करणाऱ्या शक्तींबरोबर उभे राहणे पसंत केले.” ते पुढे, “ज्यावेळी एकतेची आवश्यकता होती, त्यावेळी त्यांनी संशय घेतला. ज्या काळात ताकदीची आवश्यकता होती, त्या काळात त्यांनी विभाजन वाढवले”, असेही म्हणाले.

राहुल गांधींच्या वक्तव्याने उफाळला वाद

भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मसमर्पण केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आणि त्यानंतर वाद निर्माण झाला. भोपाळमधील पक्षाच्या अधिवेशनावेळी राहुल गांधी म्हणाले की, १९७१ च्या युद्धात अमेरिकेने ७ वे फ्लीट पाठवले तरीही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी डगमगल्या नाहीत. “ट्रम्पकडून फोन आला आणि नरेंद्र मोदीजींनी लगेच शरणागती पत्करली. इतिहास साक्षी आहे. भाजपा नेहमीच झुकते”, असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेच्या धमकीला न जुमानता १९७१ मध्ये भारताने पाकिस्तानचे तुकडे कसे केले, याचादेखील उल्लेख त्यांनी केला. “काँग्रेसचे बब्बर शेर आणि सिंहीण महासत्तांशी लढले, ते कधीही झुकले नाहीत”, असे ते पुढे म्हणाले. १९७१ च्या युद्धादरम्यान एकही फोन आला नसल्याचेही त्यांनी सांगितले. ७ वा फ्लीट, शस्त्रे व विमानवाहू जहाज आले तरी इंदिरा गांधींनी शरणागती पत्करली नाही आणि त्या म्हणाल्या की, त्यांना जे हवे, ते करतील.