दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाच्या एका मान्यात तिन्ही पक्षांच्या तलवारींनी दावा केला आहे. ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांनी कोल्हापूर व हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ मिळावे अशी मागणी शीर्षस्थ नेतृत्वाकडे केली आहे. विशेष म्हणजे उमेदवार म्हणून पुढे आलेली नावे निवडणुकीच्या फड मारण्या इतपत सक्षम नाहीत. तर, जी नावे सक्षम आहेत त्यांनी आखाड्या पासून पळ काढण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात याची उत्सुकता वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा अवधी उरला असताना सर्व पक्षांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. याचवेळी मुंबई प्रदेश कार्यालयातील बैठकांच्या सपाटा सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी कोल्हापुरातील शिवसैनिकांची संपर्क साधला असता दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने ते ठाकरे गटाकडेच राहिले पाहिजेत असा दावा करण्यात आला. दोन महिन्यापूर्वी खासदार संजय राऊत यांचा दौरा झाला होता. तेव्हा कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार व हातकणंगले जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. ही दोन नावे वगळता सेनेच्या छावणीत दमाचा गडी अजूनही दिसत नाही.

हेही वाचा >>> शिवसेनेच्या जागेवर काँग्रेसचा दावा

राष्ट्रवादीची भिस्त आयातांवर

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक ज्येष्ठ नेते शरद पवार, यांच्या उपस्थितीमध्ये झाली असता जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीकडे द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पाच पैकी तीन वेळच्या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. या मतदारसंघात दोन्ही काँग्रेसचे पाच आमदार असल्याने राष्ट्रवादीला उमेदवारी दिली तर मोठ्या मताधिक्याने विजय होईल. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत काढून कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीकडे घेऊ, असा युक्तिवाद पक्षाचे जिल्ह्याचे एकमुखी नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केला.

हेही वाचा >>> विरोधकांच्या बैठकीआधीच वर्चस्वाचा वाद चव्हाट्यावर

राष्ट्रवादीकडून माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, उद्योजक व्ही. बी. पाटील यांचे नाव सुचवले गेले. मुश्रीफ यांनी ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे तर आमदार राजेश पाटील यांनी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचे नाव सुचवले. मात्र हे दोघेही पक्षाचे नसल्याने आयात उमेदवारीवर नेतृत्वाने नाराजी दर्शवली. नेतृत्वाच्या मनात मुश्रीफ यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असले तरी मुश्रीफ यांना मात्र कागल विधानसभा मतदारसंघ पुन्हा खुणावत आहे. हीच इच्छा के. पी. पाटील यांची आहे. हातकणंगले मधून जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंह गायकवाड यांचे नाव सुचवले आहे. पण स्थानिक कार्यकर्त्यांची भिस्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांनी निवडणूक लढवावी यावर आहे. दोन्ही मतदारसंघ मिळण्याची मागणी राष्ट्रवादीने तावातावाने केली असली तरी उमेदवार कोण या प्रश्नाचे समर्पक उत्तर शोधले जात आहे.

काँग्रेसची दावेदारी ज्येष्टांवर

कोल्हापूर जिल्ह्याचा लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाले असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा करिता माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार संजीवनी गायकवाड, राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, चेतन नरके यांना उमेदवारी देण्यात यावे असे सुचवण्यात आले. आवळे, गायकवाड यांचे वय, संपर्क या बाबी आश्वासक ठरणाऱ्या दिसत नाहीत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे माजी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे तर पी. एन. पाटील हे सतेज पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी करताना एकमेकांना शह प्रतिशह देण्याचे राजकारण करताना दिसले. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हा भाजप मुक्त ठेवला असल्याचा दावा ठामपणे केला जात असताना याच जिल्ह्यात लोकसभेसाठी प्रभावी उमेदवार नसावा हि कमतरता कशी दूर करणार हा प्रश्न उरतोच.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Both the lok sabha constituencies in kolhapur are claimed by the three parties of mavia print politics news ysh
First published on: 06-06-2023 at 12:58 IST