-दिगंबर शिंदे

राज्यातील सत्ता बदलानंतर राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या भाजपाच्या एका माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशाला खीळ बसली आहे. तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या मेगाभरतीलाही ब्रेक लागला आहे. तरीही अडीच वर्षांत सत्ता हाती असूनही काँग्रेसची स्थिती ना खाया ना पिया अशीच राहिल्याने अस्वस्थता कायम आहे.

प्रकाश आवाडेंच्या भाजपा प्रवेशाची केवळ औपचारिकता

विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या सहभागाने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वाचा सर्वात जास्त लाभ राष्ट्रवादीने करून घेतला. भाजपामध्ये असलेले दोन माजी आमदार राष्ट्रवादीत लवकरच डेरेदाखल होतील असे सूतोवाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. यामुळे भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. शिराळ्याचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आटपाडीचे राजेंद्र देशमुख आणि जतचे विलासराव जगताप यांच्या नावांवरून तर्कवितर्क सुरू झाले होते.

जळगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी सध्या तरी भाजपपासून दूर

याच दरम्यान, जगताप यांनी जतच्या पूर्व भागातील गावासाठी जलसंपदा विभागाने सहा टीएमसी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या अगोदर जयंत पाटलांचा सत्कार करण्यात पुढाकार घेतला होता. तर आर्थिक अडचणीत असलेल्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याला ऊर्जितावस्था देण्याच्या बोलीवर देशमुख यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात होता. जिल्ह्यातील तिन्ही भाजपाचे माजी आमदार मूळचे राष्ट्रवादीचेच होते. काँग्रेसला शह देण्यासाठी त्यांची पाठवणी भाजपामध्ये करण्यात आल्याचेही मानले जात होते.

रात्रीच्या अंधारात घडलेल्या चर्चांना पूर्णविराम –

तथापि, यापैकी नाईक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर अन्य एका माजी आमदारांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा सोहळा थांबला आहे. आता राज्यात सत्ता बदल झाल्याने अन्य माजी आमदार सध्या तरी दिल्या घरी सुखी असे समजून रात्रीच्या अंधारात घडलेल्या चर्चांना पूर्णविराम देऊन भाजपामध्येच राहतील असे स्पष्ट दिसत आहे. याचे उघड पडसाद खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवेळी दिसून येतील.