Former BJP MLA Sita Soren : मागील काही दिवसांपासून भाजपाचे नेते कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अडचणीत सापडताना दिसून येत आहेत. जानेवारीमध्ये एका तरुणीने बलात्काराचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी हरियाणाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तर मार्चमध्ये एका महिलेने सामूहिक बलात्काराची तक्रार केल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी बंगळुरु येथील भाजपाचे आमदार मुन्नीरत्न नायडू यांच्याविरोधात एफआरआर दाखल केला. ही दोन्ही प्रकरणं ताजी असताना झारखंडमधील भाजपाच्या नेत्या सीता सोरेन यांच्यावर त्यांच्याच माजी स्वीय सहायकाने गंभीर आरोप करीत थेट न्यायालयात खटला दाखल केला आहे. दरम्यान, हे प्रकरण नेमकं काय आहे? ते जाणून घेऊ…
सीता सोरेन या झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांच्या सुनबाई असून सध्या त्या भाजपामध्ये आहेत. मागील काही दिवसांपासून माजी आमदार सीता सोरेन आणि त्यांचे माजी स्वीय सहायक देवाशिष घोष यांच्यात आरोप प्रत्यारोपांची फेरी पाहायला मिळत आहेत. ७ मार्च रोजी सीता सोरेन यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी देवाशिष घोष यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. आता जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी सोरेन यांच्याविरोधात थेट न्यायालयात धाव घेऊन खंडणी तसेच अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. धनबादमधील मुख्य न्यायिक दंडाधिकारी यांनी ही तक्रार सुनावणीसाठी स्वीकारली आहे.
कोण आहेत सीता सोरेन?
- सीता सोरेन या झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) संस्थापक शिबू सोरेन यांच्या सुनबाई आहेत.
- झारखंड मुक्ती मोर्चात असताना जामा (दुमका) मतदारसंघातून सलग तीनवेळा त्या आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत.
- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सीता सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता.
- भाजपात मध्ये प्रवेश करताना, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला.
- झारखंडमध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी मी काम करेन असे आश्वासन त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना दिले होते.
- मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार इरफान अन्सारी यांनी त्यांचा दारुण पराभव केला.
- २०१२ च्या राज्यसभेच्या निवडणुकीतील कथित लाच प्रकरणात सीता सोरेन यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत.

देवाशिष घोष यांनी काय आरोप केले?
देवाशिष घोष यांनी असा आरोप केलाय की, ६ मार्च २०२५ रोजी भाजपाच्या माजी आमदार सीता सोरेन यांनी त्यांना एका लग्न सोहळ्याच्या बहाण्याने धनबादला बोलावलं. मात्र, प्रवासादरम्यान वाटेतच त्यांना काही लोकांनी अडवलं आणि एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना घोषण म्हणाले, “सायंकाळी, जेव्हा मी हॉटेलमध्ये विश्रांती घेत होतो, तेव्हा मला हॉटेलच्या बाहेर बोलावण्यात आले. त्यानंतर जवळपास १५ लोकांनी मला बेदम मारहाण केली आणि माझ्याजवळील एटीएम व यूपीआय अॅपमधून पैसे काढून घेतले. इतकंच नाही तर त्यांनी बंदूक आणि काही शस्त्रांसह मला एका खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर पोलिस बोलावून माझ्याविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी जबरदस्तीने गुन्हा दाखल करायला लावला. सीमा सोरेन यांच्या सांगण्यानुसारच पोलिसांनी मला अटक केली आणि मी ३१ दिवस तुरुंगात घालवले.”
आणखी वाचा : काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून आरएसएसच्या नेत्याचं कौतुक; कोण आहेत बंडारू दत्तात्रेय?
“राजकीय वादातून सुडबुद्धीने कारवाई केली”
सूत्रांच्या माहितीनुसार, देवाशिष घोष आणि भाजपाच्या माजी आमदार सीता सोरेन यांच्यात राजकीय मतभेद आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत जमतारा मतदारसंघातून सीता सोरेन यांचा पराभव झाला होता. त्यावेळी घोष हे सोरेन यांचे स्वीय सहायक म्हणून काम करीत होते. दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार इरफान अन्सारी यांच्याबरोबर संगनमत करून घोष यांनी माझा पराभव घडवून आणला, असा आरोप सीतार सोरेन यांनी केला होता, जो घोष यांनी पूर्णपणे फेटाळून लावला.
“भाजपाने सीता सोरेन यांच्या प्रचारासाठी २५ जणांची प्रचार समिती नेमली होती. जर काही गैरव्यवहार झाले असते, तर पक्षाने चौकशी करायला हवी होती. पण कोणतीही चौकशी झाली नाही. उलट, मला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले,” असे घोष यांनी म्हटले आहे. तुरुंगातून जामिनावर सुटल्यावर, घोष यांनी पोलिसांकडे न जाता थेट धनबाद न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यांनी तुरुंगातील अर्ज, कॉल रेकॉर्ड, ईमेल्स आणि इतर कागदपत्रे पुराव्याच्या स्वरूपात सादर केली आहेत.
“घोष यांनी माझी दीड कोटींची फसवणूक केली”
सीता सोरेन यांनी देवाशिष घोष यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी घोष यांच्यावर झारखंड निवडणूक प्रचारादरम्यान तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. “देवाशिष घोषने माझ्या बनावट सह्या करून प्रचार खर्चाचे पैसे स्वत:च्या खात्यात वळवले. निवडणूक काळात त्याने दोन ते तीन बनावट खाती उघडून माझे सर्व पैसे हडप केले, असा आरोप सोरेन यांनी केला आहे. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सीता सोरेन म्हणाल्या, निवडणुकीवेळी मी घोष यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या, त्यावेळी एका वकिलांचे शुल्क भरण्यासाठी मी त्याला ५० हजार रुपये दिले होते. पण नंतर मला कळले की ते पैसे वकिलापर्यंत पोहोचलेच नाहीत. घोष याने ते पैसे स्वतःकडेच ठेवले होते.”
हेही वाचा : चंद्राबाबू नायडूंचे सरकार कशामुळे अडचणीत आलं? आंध्र प्रदेशात नेमकं चाललंय तरी काय?
सीता सोरेन यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप
सीता यांनी हेही सांगितले की, त्यांनी घोष यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत, ज्यामध्ये अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत एक खटला आणि चेकसंदर्भात दुसरा खटला आहे. “घोष याने माझी फसवणूक केली याचे माझ्याकडे पुरावे असून मी यंत्रणांना सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सीता सोरेन यांच्यावर २०१२ मधील राज्यसभेच्या निवडणुकांदरम्यान लाच घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांची सीबीआय चौकशी सुरू असून हा खटला न्यायालयीन प्रलंबित आहे. २०१४ मध्ये अटक झाल्यानंतर झारखंड उच्च न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले आहे.
न्यायालयाने फिरवला होता निर्णय
महत्वाची बाब म्हणजे, सीता सोरेन यांनी आपल्या विरोधातील खटल्यात न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण मिळावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मार्च २०२४ मध्ये या याचिकेवर सुनावणी घेताना खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयात न्यायालयाने १९९८ मध्ये दिलेला सर्वोच्च न्यायालयाचा जुना निर्णय फिरवला होता. हा निर्णय झारखंड मुक्ती मोर्चा लाचखोरी प्रकरणाशी संबंधित होता, ज्यामध्ये शिबू सोरेन हेही आरोपी होते. नवीन निर्णयात खंडपीठाने असे नमूद केले की, कोणतेही खासदार किंवा आमदार जर संसद किंवा विधिमंडळातील मतदानासाठी किंवा भाषणासाठी लाच घेत असतील तर त्यांना फौजदारी कारवाईपासून संरक्षण मिळणार नाही. खंडपीठाचा हा निर्णय भारतीय संसदीय इतिहासात मैलाचा दगड मानला जात आहे