धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात एकहाती वर्चस्व असणारे नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात निर्माण होणारा रोष, याच काळात पवन राजेनिंबाळकर यांची झालेली हत्या, त्या हत्या प्रकरणातून निर्माण झालेल्या सहानुभूतीमधून ओम राजेनिंबाळकर यांचा राजकीय उदय झाला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले. त्यानंतर २०१९ मध्ये राणाजगजीतसिंह पाटील यांना पराभूत करुन ओम राजेनिंबाळकर यांनी लोकसभा गाठली. पण तेव्हा भाजपची साथ होती. आता भाजपची साथ नसताना पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्याचे कारण निष्ठा. शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी राणाजगजीतसिंह भाजपात गेल्याने साहजिकच ओम राजेनिंबाळकर यांनी ते दार बंद केले. आता पुन्हा ते नव्याने राजकीय मैदानात उतरले आहेत. आता टिकेच्या केंद्रस्थानी केंद्र सरकार आहे.

आपले मत आक्रमकपणे मांडताना राणाजगजीतसिंह पाटील हे राजकीय पटलावर दुय्यम राहावेत अशी वक्तव्ये करीत आपले राजकारण मोठे करणे हे ओम राजेनिंबाळकर यांचे एक बलस्थान. दुसरे बलस्थान संपर्क. येणारा प्रत्येक दूरध्वनी उचलणारा खासदार अशी त्यांची ओळख आहे. ‘अक्काबाई पोटात गेल्यावर फोन केला तरी आम्ही तो उचलतो’, असे ते आवर्जून सांगतात. शिवसेनेतील मोठ्या निर्णयांचे काहीही होवो, आपला मतदारसंघ बांधलेला हवा यासाठी त्यांनी आमदार कैलास पाटील यांना बरोबर घेतले आणि गावोगावी संपर्क वाढविला. साखर कारखान्याच्या राजकारणात अनेक वर्षे घालवले असल्याने ग्रामीण भागातील नस माहीत असणारा तरुण खासदार अशी त्यांची ओळख. पण एकूण मांडणीचा आवाका फक्त आपल्या मतदारसंघापुरता. राणाजगजीतसिंह पाटील भाजपमध्ये गेल्याने मध्यंतरी शरद पवार यांच्या गाडीतूनही त्यांनी प्रवास केला. ‘आक्रमकपणा’ हेच बलस्थान आणि तोच धोकाही.

हेही वाचा… ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले संजय जाधव हॅटट्रिक करणार का ?

हेही वाचा…. वंचितची तिसरी आघाडी भाजपच्या पथ्थ्यावर? महाविकास आघाडीची चिंता वाढली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणीही काम सांगितले की, ते ज्या अधिकाऱ्यांशी बोलतात तेव्हा त्यांचा लागणारा चढा सूर अनेकांना खटकणारा. पण सर्वसामांन्य माणसाच्या कामासाठी दूरध्वनीच केला नाही, लक्षच दिले नाही, अशा त्यांच्याविषयीच्या तक्रारी कमी. उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना कसरतीचा शौक. ओम राजे हेही त्यातून सुटलेले नाहीत. त्यामुळे कधी तरुण मुलांमध्ये क्रिकेट खेळतील तर कधी मॅरेथॉनमध्ये उतरतील. यामुळे तरुणांशी त्यांचा संपर्क चांगला आहे.