महेश सरलष्कर

खरी शिवसेना कोणाची, याचा निर्णय आज, शुक्रवारी कदाचित केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होणारही नाही. पण, या सुनावणीआधी गुरुवारी रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या दोघांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शहा यांच्याशी झालेली चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.

प्रदेशाध्यक्ष व मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बावनकुळे व शेलार यांनी स्वतंत्रपणे शहांची सदिच्छा भेट घेतली असली तरी, गुरुवारी दोघांनी एकत्र भेट घेतली. मात्र, या भेटीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश नव्हता. राज्यातील सत्तांतरानंतर मंत्रिमंडळ विस्तारापासून सर्व महत्त्वाच्या निर्णयाआधी फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत येऊन शहांची भेट घेतली होती. यावेळी भाजपचे राज्यातील दोन्ही प्रमुख फडणवीस यांच्याविना दिल्लीत येऊन शहांना भेटून गेले आहेत. त्यामुळेही या भेटीबाबत चर्चा केली जात आहे.

हेही वाचा… राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा असलेल्या चंद्रशेखर राव यांच्यापुढे तेलंगणाची सत्ता राखण्याचे मोठे आव्हान

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, यावर अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या उमेदवारीचा निर्णय अवलंबून आहे. नोव्हेंबरनंतर मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुकाही होणार आहेत. शिंदे गटाने ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याची मागणी करणारा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला आहे. ही मागणी आयोगाने मान्य केली तर, ठाकरे व शिंदे गटाला नव्या निवडणूक चिन्हावर पोटनिवडणूक लढवावी लागेल. या बदललेल्या राजकीय परिस्थितीत अंधेरी-पूर्व मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार वा भाजपच्या चिन्हावर शिंदे गटाचा उमेदवार निवडणूक लढवू शकतो. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीनंतर उद्भवणाऱ्या संभाव्य समीकरणांवर तिघांमध्ये चर्चा झाल्याचे मानले जाते.

हेही वाचा… पुण्यातील मनसेला भाजपबरोबर छुपी युती नको, उघड मैत्री हवी!

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे गट तसेच शिंदे गटाने केलेल्या शक्तिप्रदर्शनाची माहितीही शहा यांना देण्यात आल्याचे समजते. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यानिमित्त झालेल्या रस्सीखेचीत भाजपने अधिकृतपणे तरी तटस्थ भूमिका घेतल्याचे दिसले होते. ही तटस्थ भूमिका केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार घेण्यात आली असली तरी, त्यानिमित्ताने ठाकरे गटाच्या ताकदीचाही अंदाज घेण्यात आला होता. शिंदेच्या दसरा मेळाव्याला मोठी गर्दी जमली असली तरी, शिवाजी पार्कवरील ठाकरे गटाच्या मेळाव्यालाही शिवसैनिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाली होता. शिवाजी पार्क दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला दिलेली परवानगी, प्रत्यक्ष मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेली टीका हेही चर्चेचे विषय ठरले होते. शिवसेना व भाजप यांच्यामध्ये अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यावर सहमती झाली होती हे मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, असे जाहीरपणे उद्धव ठाकरे म्हणाले होते. या दोन्ही मुद्द्यांची गंभीर दखल भाजपने घेतल्याचे समजते.

हेही वाचा… नागपुरातील संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्याचे कारण काय?

राज्यात भाजपने ‘मिशन ४५’वर लक्ष केंद्रीत केले असून त्याअंतर्गत केंद्रीयमंत्री विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये ‘प्रवास’ करत आहेत. प्रवासी मंत्र्यांचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला सादर केला जाणार आहे. केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा केला होता. पण, ठाकूर यांच्या दौऱ्यासंदर्भात प्रसारमाध्यमांतून अनुकूल प्रतिसाद मिळाला नसल्याचा मुद्दाही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांच्या संभाव्य आगामी दौऱ्यांची आखणी अधिक योग्य पद्धतीने करण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. राज्यामध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीनिमित्ताने निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने बावनकुळे, शेलार यांच्या दिल्लीवारीकडे लक्ष वेधले गेले आहे.