अकोला : आगामी स्वानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने जोमाने तयारी सुरू केली असून अकोल्यात विकास संवाद सभा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहेत. केंद्र व राज्यासोबतच स्थानिक सत्तेच्या चाब्या देखील हातात ठेवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली. सरकारकडून स्थानिक पातळीवर येणारा निधी जिरवणाऱ्यांच्या हातात नव्हे तर पुरवणाऱ्यांच्या हातात सत्ता द्या, असे विरोधकांवर टीकास्त्र सोडत देवेंद्र फडणवीसांनी आगामी निवडणुकीसाठी मतदारांना साकडे घातले. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच भाजपने ‘स्थानिक’ निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने प्रशासकीय हालचालींना वेग आला. निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी देखील तयारी सुरू केली. निवडणुकांसाठी नेहमीच ‘ॲक्शन मोडवर’ असलेल्या भाजपने ‘स्थानिक’च्या निवडणुका सुद्धा गांभीर्याने घेतल्या असून वर्चस्व राखण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात अडीच हजार कोटींच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करून प्रचाराचा ‘श्रीगणेशा’ केला. शासकीय निधीतील विकास कामांचे लोकार्पण करण्यासोबतच भाजपने पश्चिम विदर्भातील मध्यवर्ती अकोला शहरात विकास संवाद सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

देवेंद्र फडणवीसांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा पाढा वाचत शेवटच्या घटकापर्यंत निधी पोहोचण्यासाठी स्थानिक स्तरावरील सत्ता आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. केंद्र व राज्य शासनाने निधी पाठवल्यावर स्थानिक पातळीवरील सत्ता इतर लोकांच्या हातात असल्यास तो आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत आशीर्वाद द्या, जिरवणाऱ्यांच्या नव्हे तर निधी पुरवणाऱ्यांच्या हातात सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मते देऊन परतफेड करण्याचे वक्तव्य केले. लोकशाहीमध्ये विकास अविरत पुढे नेण्याची जबाबदारी मतदारांची असते. केंद्रात नरेंद्र मोदी, तर राज्यात देवेंद्र फडणवीसांकडे नेतृत्व असून स्थानिक स्वराज्य संस्थेत विचारधारा व आशीर्वाद कायम ठेवण्याची साद भाजप कार्याध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना घातली.

या सभेसाठी प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात खा. अनुप धोत्रे, आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. वसंत खंडेलवाल यांनी सूक्ष्म नियोजन केले होते. भर पावसात सुद्धा सभेमध्ये ३५ हजारावर नागरिकांची गर्दी उसळली होती. वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी सभेत सहभागी झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपने विकास संवाद सभेतून राजकीय मशागत केली. स्थानिक निवडणुकांसाठी केंद्र व राज्याच्या योजनांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याचा कितपत परिणाम होतो, हे आगामी निवडणुकांमध्येच स्पष्ट होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फडणवीसांचा कौतुक वर्षाव; वर्चस्वावर शिक्कामोर्तब

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विकास संवाद सभा सुरू असतांनाच अकोल्यात वरुणराजाने बरसण्यास सुरुवात केली. त्याच वेळी सभा मंडपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्यावर अक्षरश: कौतुक वर्षाव केला. देवेंद्र फडणवीसांनी रणधीर सावरकरांच्या नेतृत्व व अभ्यासूवृत्तीचे कौतुक करण्यासोबतच काठीपाटी सिंचन प्रकल्पाचे काम मार्गी लागण्याचे संपूर्ण श्रेय त्यांना दिले. देवेंद्र फडणवीसांनी रणधीर सावरकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याने त्यांचे राजकीय वजन वाढण्यासाेबतच जिल्हापातळीवरील एकहाती वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.