माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांचा भाजपा प्रवेश तसा घाईघाईत अन् प्रदेशस्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत झाला होता. पण या दोघांनी काँग्रेसमध्ये असताना अनेक वर्षे स्थानिक पातळीवर ज्यांना वाळीत टाकले होते, त्या बी.आर. कदम यांचा भाजपा प्रवेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत होतो आहे. तोही चव्हाण यांच्या माध्यमातून, ‘शाही थाटा’त!

राजकारणात केव्हा, काय होईल हे सांगता येत नाही असे जे म्हटले जाते, त्यात मावणारे नांदेडमधील हे उदाहरण. बी.आर. कदम तब्बल दोन दशके चव्हाण यांच्या निकट होते. चव्हाणांनी त्यांच्यावर स्थानिक पदांची खैरात केली; पण एका टप्प्यावर ते चव्हाण यांच्या मनातून हळूहळू उतरले आणि २०१९ नंतर तर त्यांना चव्हाण व त्यांच्या चमूने अक्षरशः पक्षसंघटनेतून दूर लोटले होते.

गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर भोकर मतदारसंघातील त्यांच्या बहुसंख्य समर्थकांनी इकडून तिकडे उडी मारत आपली व्यक्तीनिष्ठा दाखवून दिली. पण बी.आर. कदम यांच्यासह काही काँग्रेसजनांनी काँग्रेस पक्षातच राहण्याचा निर्णय घेऊन आम्ही शंकररावांच्या विचारधारेचे आहोत, हे दाखवून दिले. चव्हाण यांनी काँग्रेसमधील आपल्या प्रभावाच्या काळात ज्या कदम यांचा जिल्हाध्यक्षपदाचा मुकूट काढून घेतला होता, तो त्यांना प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून परत मिळाला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत कदम यांना भोकरमध्ये उमेदवारी मिळाली नाही. या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात पक्ष संघटनेमध्ये मरगळ निर्माण झाली तसेच जिल्हा संघटनेत दोन गट निर्माण झाले. लहरी स्वभावाच्या माजी प्रदेशाध्यक्षांनी एक दिवस अचानक कदम यांच्या जागी आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यास जिल्हाध्यक्ष केले; पण खा. रवींद्र चव्हाण यांनी हा विषय पक्षाचे केंद्रीय नेते वेणूगोपाल यांच्यापर्यंत नेत प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयास स्थगिती मिळवली. कदम यांचे पद सुरक्षित राहिल्यानंतर ते पक्षामध्ये कार्यरत होते.

दरम्यान अशोक चव्हाण यांनी भाजपाचा विस्तार करण्याची मोहीम आपल्या कन्येच्या मतदारसंघातून सुरू केल्यानंतर त्यांचे समर्थक किशोर स्वामी यांनी कदम यांना गळाला लावले. गेल्या आठवड्यात खा. चव्हाण कदम यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांच्यात बंद खोलीमध्ये चर्चा झाल्यानंतर ‘बी.आर.’ यांचे ‘कदम’ भाजपाच्या दिशेने पडत असल्याचे त्यानंतर स्पष्ट झाले होते.

आता कदम व त्यांचे पुत्र विश्वास या दोघांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्यावर काँग्रेस पक्षात फार खळखळ झालेली नाही. कदम या पक्षासाठी तसे निरुपयोगी झाले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी नांदेडमध्ये पक्षाच्या उमेदवाराचे काम करण्याऐवजी शिवसेनेच्या उमेदवारास मदत केल्याची तक्रार होती. भोकरमध्येही त्यांनी पक्षाचे काम केले नव्हते.

या पार्श्वभूमीवर मागील काही वर्षांपासून दुरावलेल्या कदम यांना पुन्हा आपल्याजवळ आणण्याची निकड खा. चव्हाण यांना का वाटली, ते पूर्णपणे स्पष्ट झाले नाही. मागील दोन महिन्यांत अजित पवार यांनी चव्हाणांचे मेव्हणे भास्करराव खतगावकर, पुतण्या उदय चव्हाण यांच्यासह खा. चव्हाण यांच्या अनेक जुन्या समर्थकांना आपल्या पक्षात ओढल्यानंतर चव्हाण यांनी जिल्ह्यातल्या काँग्रेस संघटनेतील ‘अर्धा तुकडा’ उचलला; पण काँग्रेसचा एक जिल्हाध्यक्ष आम्ही फोडला असे भासविले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नांदेड जिल्ह्यातून भाजपा प्रवेशाचे सत्र भास्करराव खतगावकर यांनी २०१४च्या सप्टेंबरमध्ये सुरू केले तेव्हा या सर्वांचा पक्षप्रवेश मुंबईत अमित शहा यांच्या उपस्थितीत, मोठ्या थाटात झाला होता. त्यानंतर आता बी.आर. कदम यांचाही भाजपाप्रवेश अमित शहा यांच्या उपस्थितीत मोठ्या जनसमुदायासमोर शाही थाटामध्ये होणार आहे.