महेश सरलष्कर

गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनात दिशाबदल झाला आहे. आंदोलनाचे ठिकाण आणि स्वरूपही बदलले आहे. आतापरत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) होणाऱ्या चौकशीला विरोध करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. मात्र, आता या आंदोलनात ‘अग्निपथ’ योजनाविरोधाचा मुद्दाही सामील झाला आहे. तसेच, आंदोलन काँग्रेसच्या मुख्यालयातून संसद मार्गावर जंतर-मंतर येथे स्थलांतरित झाले आहे.

‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणातील चौकशीसाठी राहुल गांधी सोमवारी चौथ्यांदा ‘’ईडी’’च्या कार्यालयात गेले. गेल्या आठवड्यात सोमवार ते बुधवार असे तीन दिवस त्यांची चौकशी झाली होती व प्रत्येकवेळी राहुल गांधी काँग्रेसच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांच्या गराड्यात ‘’ईडी’’च्या कार्यालयात रवाना झाले होते. सोमवारी मात्र ते मुख्यालयात न जाता थेट ‘’ईडी’’च्या चौकशीसाठी निघून गेले. त्यामुळे सोमवारी काँग्रेसच्या मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांची फारशी गर्दी नव्हती. तरीही दिल्ली पोलिसांनी मुख्यालयाच्या परिसरात जमाव बंदी लागू करून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

गेल्या आठवड्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड आक्रमक होत आंदोलन केले होते. पोलिसांनीही नेत्यांची धरपकड केली होती, अनेक नेत्यांना धक्काबुक्की झाली होती, मारहाण झाली होती, नेत्यांना १२-१४ तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते. रविवारी तसेच, सोमवारी काँग्रेसचे आंदोलन जंतर-मंतरवर अत्यंत शांततेत सुरू होते. काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख व ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी रविवारी ट्वीट करून काँग्रेसच्या आंदोलनातील दिशाबदलाची माहिती दिली होती. जंतर-मंतर येथे धरणे आंदोलनासाठी काँग्रेसच्या नेत्यांना पुन्हा दिल्लीत बोलावण्यात आले आहे. रविवारी प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांची भाषणे झाली होती. त्यामध्ये राहुल गांधींच्या ‘’ईडी’’ चौकशीपेक्षा अल्पकालीन सैन्यभरतीच्या ‘’अग्निपथ’’ योजनेला विरोध करणारे मुद्दे मांडले गेले. त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनाची दिशा राहुल गांधींकडून हळूहळू ‘’अग्निपथ’’कडे वळाली असल्याचे दिसले. सोमवारी काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. पण, या आंदोलनाचे ठिकाण पक्ष मुख्यालयाऐवजी दिल्लीचे मध्यवर्ती कॅनॉट प्लेस परिसरात होते. गेल्या आठवड्यात राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी होत पोलिसांशी संघर्ष केला होता. सोमवारी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ‘’अग्निपथ’’ योजनेविरोधात आक्रमक झाले होते. भाजपच्या मुख्यालयाच्या मागे असलेल्या शिवाजी पूल रेल्वे स्टेशनवर रेलरोको आंदोलन केले.

सोमवारी सकाळी काँग्रेसच्या मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षनेते अजय माकन यांनी ‘’ईडी’’च्या चौकशी पद्धतीवर टीका केली. ‘’ईडी’’ने राहुल गांधी यांना विचारलेले विशिष्ट प्रश्न आणि राहुल यांनी दिलेली उत्तरे प्रसारमाध्यमांपर्यत पोहोचवली जातात व त्यातून राहुल गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही माकन यांनी केला. आतापर्यंत राहुल गांधी यांची तीन दिवसांमध्ये सुमारे तीस तास चौकशी करण्यात आली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चौकशी पुढे ढकलण्याची विनंती राहुल गांधी यांनी ‘’ईडी’’ला केली होती. ती मान्य करत चार दिवसांनी सोमवारी पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ‘’नॅशनल हेराल्ड’’प्रकरणी मल्लिकार्जुन खरगे, सॅम पित्रोदा, पवन बन्सल आदी नेत्यांची चौकशी झाली असून सोनिया गांधी यांचीही चौकशी केली जाणार आहे.