नागपूर : पक्षांतर्गत मतभेदापासून कोणताही पक्ष वेगळा राहू शकत नाही, भाजपही त्याला अपवाद नाही, फक्त या पक्षातील मतभेद जाहीरपणे बाहेर येत नाही, त्यावर चर्चाही होत नाही. पण सत्ता आली की तिचे काही अवगुणही पक्षाला चिटकतात. भाजपचेही तेच झाले. नागपुरात मंडळ अध्यक्ष नियुक्तीहून या पक्षाचे मतभेद, रुसवे, फुगवे अखेर जाहीरपण पुढे आले.

भाजपमध्ये सध्या लोकशाही पद्धतीने पदाधिकाऱ्याची निवड प्रक्रिया जोरात सुरू आहे, हा पक्ष देशात सर्वात मोठा कसा आहे हे बिंबवण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहे. सर्वच प्रक्रिया एकमताने होत असल्याचेही सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर या दोन प्रमुख मतदारसंघातील मंडळ अध्यक्ष निवडीवरून नेत्यांमध्ये घमासान माजले आहे. मुद्दा आहे नियुक्त करताना विश्वासात न घेण्याचा आणि आरोप केले आहेत पक्षाच्या दोन माजी आमदारांनी. त्यामुळे भाजपमध्ये चाललेय काय याचा अंदाज येऊ शकतो. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष दर आठवड्याला नागपुरात येतात. त्यांनाही याबाबत माहिती नसावी हे आश्चर्य आहे.

काय आहे प्रकरण ?

पश्चिम नागपूरमध्ये मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, असा संताप या भागाचे माजी आमदार सुधाकर देशमुख आणि २०२४ ची निवडणूक पश्चिममधून लढलेले भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी मंडळाची ही यादी जाहीर होणार होती त्याच्या एक दिवसआधीच या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोहळेंच्या मते त्यांनी पक्षाचा आदेश आल्यावर पश्चिममधून निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाला असला तरी या मतदारसंघात पक्षांतर्गत नियुक्ती करताना आपल्याला विश्वासात घेणे अपेक्षित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असाच प्रकार दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्ष नियुक्तीबाबतही घडला आहे. येथे वाद माजी आमदार सुधाकर कोहळे व विद्यमान आमदार मोहन मते यांच्यात आहे. या दोघांच्या वादामुळे दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांची नावेच जाहीर करण्यात आली. रविवारी पक्षातर्फे शहर आणि ग्रामीणमधील मंडळ अध्यक्षांची यादी प्रकाशित करण्यात आली. त्यात दक्षिणचा समावेश नव्हता. पण पश्चिमचा होता. याचा अर्थ तेथील वाद शमवण्यात पक्षाला यश आलेले दिसते. पश्चिम नागपूर हा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐकेकाळचा मतदारसंघ होय. रविवारी ते नागपूरमध्ये होते. तोपर्यंत मंडळाची यादी जाहीर झालेली नव्हती. ते गेल्यावर रात्री याद्या जाहीर करण्यात आल्या. भाजपमध्ये सर्वच काही ऑल-वेल नाही हेच मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्यावरून दिसून आले आहे.