भारताला जी-२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर मागच्या वर्षभरात संपूर्ण भारतभर जी-२० च्या बैठका झालेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले, “देशभरात जी-२० च्या बैठका झाल्या. देशातील ६० शहरांमध्ये २२० बैठका झालेल्या आहेत. आमचे सरकार सहकार संघराज्यावर विश्वास ठेवणारे आहे, हे याचे सर्वात मोठे प्रमाणपत्र आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनीकंट्रोल संकेतस्थळाशी बोलताना सांगितले, “जागतिक नेत्यांचे अनेक कार्यक्रम मी देशभरात आयोजित केले आहेत. हैदराबादमध्ये ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप समिट आयोजित करण्यात आले होते. गोव्यात ब्रिक्स परिषद आणि जयपूर येथे इंडो-पॅसिफिक सहकार परिषद आयोजित केली होती. हा एक मोठा बदल आपण पाहत आहोत.” पंतप्रधान पुढे म्हणाले की, आम्ही राज्यात आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या, त्यातील बहुतेक राज्यांमध्ये भाजपातेर पक्षांची सत्ता आहे. राष्ट्रीय हिताचा विचार करत असताना संघवाद आणि द्विपक्षीयतेवर असलेला आमचा दृढ विश्वासाचा हा एक पुरावाच आहे. जी-२० अध्यक्षपदाच्या काळात तुम्ही हे पाहू शकता.

हे वाचा >> जी-२० मधील शेर्पा ट्रॅक, वित्तीय ट्रॅक आणि सहभागी समूह म्हणजे काय? भारताचे शेर्पा कोण?

मोदी सरकार हे सत्तेचे केंद्रीकरण करत असून संघराज्याच्या भावनेला छेद देत असल्याचा आरोप विरोधकांकडून अधूनमधून करण्यात येत असतो. जसे की, जीएसटी महसूलाची असमान वाटणी करणे आणि बिगर भाजपा पक्षांची सत्ता असलेल्या राज्यात राज्यपालांनी विरोधी भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य असा संघर्ष निर्माण झालेला पाहायला मिळाला.

जी-२० चे अध्यक्षपद मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, जी-२० चे अध्यक्षपद हे भारतातील लोकशाहीकरण दाखवून देण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. जी-२० च्या बैठकांच्या माध्यमातून सरकार देशभरातील जनता आणि विशेषतः तरुणांसाठी मोठी गुंतवणूक करत आहे. “जी-२० अध्यक्षपदाचा काळ संपता संपता आपल्या देशात २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील ६० शहरांमध्ये २२० बैठका होणार आहेत. १२५ देशांमधून जवळपास एक लाख लोक या बैठकात सहभागी होण्यासाठी येतील. या बैठकांमध्ये भारतातील दीड कोटी लोक सहभागी होणार आहेत”, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली होती.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “एवढ्या मोठ्या प्रमाणात बैठका आयोजित केल्यानंतर अनेक परदेशी प्रतिनिधी विविध शहरांना भेटी देणार आहेत. या माध्यमातून आपल्याला पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक, संवाद कौशल्य, आदारातिथ्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्तम क्षमता निर्माण करण्याची संधी चालून आली आहे. जी-२० अध्यक्षतेच्या माध्यमातून देशातील नागरिकांचे आणि विशेषतः युवकांच्या क्षमतांचा विकास करण्याची जी-२० ही एकप्रकारे गुंतवणूक आहे. त्याचप्रकारे ‘जन भागीदारी’ याचेही हे उत्तम उदाहरण ठरणार आहे. कोणतेही काम हे लोकांच्या सहभाग आणि सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.”

हे वाचा >> कमळ, पृथ्वी अन् वसुधैव कुटुंबकम! जी-२० बैठकीच्या लोगोचा अर्थ काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले होते, “ऐतिहासिकदृष्ट्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संमेलनांचे आयोजन करण्यासाठी दिल्ली आणि विशेषतः विज्ञान भवनाच्या पलीकडे विचार केला जात नव्हता. कदाचित सोयी-सुविधांचा अभाव आणि लोकांचा विश्वास नसल्यामुळे हे झाले असावे. त्याचप्रकारे अनेक परदेशी नेत्यांचे दौरे हे मुख्यतः राजधानी आणि काही निवडक शहरांपूरतेच कसे मर्यादित राहतील, याचा प्रयत्न गतकाळात झाला. मात्र आपल्या देशातील लोकांची क्षमता आणइ अद्भुत विविधता पाहून मी एक वेगळा दृष्टीकोन विकसित केला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय परिषदा, बैठका आयोजित करण्यासाठी आम्ही पहिल्या दिवसांपासून वेगळा विचार करत आलो.”