दिगंबर शिंदे सांगली : कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवडीमध्ये ज्युनियर आर. आर. आबा अशी ओळख असलेल्या रोहित आर. आर. पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करीत भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाने दहा महिन्यांपूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. खासदार गटाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करत असताना चार सदस्य आपल्या बाजूला वळविण्यात यश आले असले तरी याचे परिणाम तासगाव नगरपालिका निवडणुकीवरही उमटू शकतात. हेही वाचा >>>गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने AIMIM ने घेतला मोठा निर्णय; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार? कवठेमहांकाळ नगरपंचायतीचा तसे पाहायला गेले तर अन्य गावाप्रमाणे निमशहरी तोंडावळा असला तरी तालुक्याचे ठिकाण असल्याने याचे पडसाद अन्य ठिकाणीही उमटू शकत असल्याने याला राजकीय दृष्ट्या महत्त्व आहे. दहा महिन्यांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना रोहित पाटील यांनी एकाकी लढत दिली होती. अगदी त्यांना राष्ट्रवादीचे चिन्ह मिळणार नाही अशीही तजवीज करण्यात आली होती. मात्र, तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करीत पक्षाचे एबी फॉर्म मिळवून दिले होते. रोहित पाटील यांच्या पाठीशी आबांची पुण्याई, आ. सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांचे आशीर्वाद आहेत. यामुळे आबा कुटुंब विरोधात सर्व जण असा हा सामना रंगला होता. हेही वाचा >>>प्रशांत किशोर यांच्या ‘त्या’ विधानानंतर चर्चेला उधाण; आता नितीश कुमार यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले “मी ज्यांना ज्यांना…” आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित समोर ठेवून आबांच्या चिरंजीवांचा वारू रोखण्यासाठी खासदार संजय पाटील (भाजप), माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे (शिवसेना) आणि महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे (राष्ट्रवादी) या तीन गटांनी एकत्र येत शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. तीन दिग्गज गट एकत्र असतानाही रोहित पाटील यांनी एकहाती विजय मिळवत १७ पैकी १० जागा जिंकून राज्याचे लक्ष वेधले होते. विजयानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये त्यांनी ही तर सुरुवात आहे, यापुढील काळात प्रत्येक ठिकाणी विरोधकांना जागा दाखवून देउन एक एक सत्तास्थाने जिंकू अशी आरोळीही दिली होती. मात्र, केवळ दहा महिन्याांत त्यांना त्यांच्याच गटाला एकसंघ ठेवता आले नाही.नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी दोन्ही गटाला समसमान म्हणजे आठ मते मिळाली असली तर प्रत्यक्षात व्हीप लागू करूनही राष्ट्रवादीचे सदस्य फुटले हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादीला आठ मते मिळाली असली तरी यापैकी दोन मते ही अजितराव घोरपडे म्हणजेच शेतकरी विकास आघाडीची आहेत. घोरपडे गटाची दोन मते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार हे लक्षात येताच खासदार गटाने राष्ट्रवादीचे चार सदस्य आपल्या बाजूला वळवले होती. यामुळे रोहित पाटील यांचा विजयाचा वारू कवठेमहांकाळने रोखला आहे हे स्पष्ट आहे. हेही वाचा >>>यशवर्धन कदमबांडेंमुळे निवडणुकीच्या तोंडावर धुळ्यात ठाकरे गटाला बळ तर भाजपला धक्का या निकालाचे परिणाम तासगाव नगरपालिका निवडणुकीवरही होणार आहेत. तासगाव हा भाजपचे खासदार संजय पाटील यांचा बालेकिल्ला आहे. नगरपालिका त्यांच्याच ताब्यात होती. तासगाव नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा लावण्याचे मनसुबे राष्ट्रवादीचे होते. मात्र, आता या मनसुब्यांना कवठेमहांकाळ येथील पराभवाचा गतीरोधक लागला आहे. आबांचे मूळ गाव अंजनी हे तासगाव तालुुक्यात असले तरी कवठेमहांकाळ तालुुक्यातील राजकीय वर्चस्व राखण्यासाठी नगरपंचायत महत्त्वाची आहे. मात्र, खासदार पाटील यांनी तासगावमधून येऊन मूळच्या घोरपडे, सगरे गटाला शह देत स्वत:चा गट निर्माण करण्यात काही प्रमाणात यश मिळवले आहे. यासाठी मुलगा प्रभाकर पाटील यांच्या हाती डावपेचाची सूत्रे देउन आबा गटाला विधानसभा निवडणुकीवेळी शह देण्याचा प्रयत्न दिसत आहे.