जननायक जनता पार्टीची हरियाणात सत्ताधारी पक्षासोबत युती असून ते स्वत: राज्यातील कॅबिनेटचा भाग आहेत. तरीही जननायक जनता पार्टीचे प्रमुख देवेंद्र सिंह बाबली सुरुवातीपासून मनोहर लाल खट्टर प्रणीत सरकारचे कट्टर टीकाकार मानले जातात. आता तर त्यांनी राज्याच्या प्रशासकीय कारभारावर निशाणा साधत ड्रग माफिया तसेच भ्रष्टाचाऱ्यांना रान मोकळे मिळाल्याचा आरोप केला आहे. आपले वर्चस्व असलेला मुलूख स्वत:च्या ताब्यातच राहावा यासाठी त्यांचा राग अनावर झाल्याची कुजबूज आहे. 

बाबली हे ५२ वर्षीय व्यावसायिक असून काही वर्षांपूर्वीच त्यांनी स्वत:ची राजकीय कारकीर्द सुरू केली. ते सुरुवातीच्या काळात कॉँग्रेसच्या बाजूने होते. हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटी प्रमुख अशोक तनवर यांच्या मर्जीतले होते. मात्र तनवर यांनी कॉँग्रेस सोडली आणि याच धामधुमीत बाबली देखील दुरावले. सध्या बाबली हे राज्यातील सर्वाधिक श्रीमंत आमदारांत गणले जातात.  केवळ टोहानाच नव्हे तर संपूर्ण राज्याने “भ्रष्टाचारी राजकारण्यांच्या तोंडाला काळे फासले पाहिजे”  असे म्हणत भ्रष्टाचाराविरुद्ध लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन आमदार बाबली यांनी केले. संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, “मी या प्रकारासाठी सरकारच्या कणाहीन भूमिकेला जबाबदार धरतो.”

आपल्या पक्ष आणि कॅबिनेट सहकाऱ्याच्या वक्तव्यावर बोलताना दुष्यंत चौटाला म्हणाले, “तर मग त्यांनी हरकत का घेतली नाही? जर बाबली यांना सगळीकडे भ्रष्टाचार दिसतो, तर त्यांनी जबाबदार घटक शोधून प्रकाराला त्वरीत आळा घालणे अपेक्षित होते. केवळ दोषारोप करून काय उपयोग? जोपर्यंत तुम्ही भ्रष्टाचार थांबवण्यास प्रयत्न करत नाहीत आणि त्याविरुद्ध कारवाई होत नाही, भ्रष्टाचार थांबविणे अशक्य आहे. आपल्या सरकारने डिजीटलायजेशनच्या अंतर्गत भ्रष्टाचार थोपविण्याकरिता काही उपक्रम राबवले आहेत.”  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधी कॉँग्रेस पक्षाचे नेते भूपिंदर सिंह हुडा हे टोहानाच्या या आमदाराचे कौतुक करताना म्हणाले, “सरतेशेवटी कोणीतरी सत्याची बाजू उचलून धरत सत्य बोलण्याची हिंमत दाखवली”. माजी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, जर देवेंद्र बाबली खोटं बोलत असतील तर दुष्यंत यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली पाहिजे. मग देवेंद्र बाबली यांना कॅबिनेटमध्ये राहण्याचा कोणताच अधिकार उरणार नाही. मात्र बाबली यांचे बोलणे खरे असेल तर संपूर्ण सरकारची पोलखोल झाली पाहिजे. हरियाणातील भ्रष्टाचार सध्या शिखरावर पोहोचलेला आहे हे केवळ बाबलीच नव्हे, तर संपूर्ण हरियाणाला ठाऊक आहे. बाबली यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची राज्य सरकारने चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे.”