ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आणि भारतामधील शस्त्रविरामानंतर पाकिस्तानातील दहशतवादाविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशाची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी भारताने सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर पाठवले. त्यातील एका शिष्टमंडळात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांचादेखील समावेश आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अमेरिकेत गेले होते. अमेरिकेत त्यांनी प्रभावीपणे भारताची बाजू मांडली. याचदरम्यान त्यांना तुम्ही मोदी सरकारसाठी काम करता का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराची सध्या चर्चा आहे. शशी थरूर नक्की काय म्हणाले? काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी म्हटले की, ते केंद्रातील सरकारसाठी काम करत नसून विरोधी पक्षात काम करतात. परंतु, २६ जणांचा बळी घेणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेल्या ठोस प्रत्युत्तराबद्दल ते समाधानी आहेत. थरूर म्हणाले की, हल्ल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी भारताने कठोर प्रत्युत्तर द्यावे, या आशयाचा एका वृत्तपत्रात लेख लिहिला होता आणि तेच घडले, हे सांगण्यास त्यांना आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
थरूर म्हणाले, “मी सरकारसाठी काम करत नाही, मी विरोधी पक्षासाठी काम करतो. परंतु, मी स्वतः भारतातील एका आघाडीच्या वर्तमानपत्रात एक लेख लिहिला होता. त्यामध्ये मी म्हटले होते की, पाकिस्तानला फक्त प्रत्युत्तर देऊन चालणार नाही, तर त्यांना हुशारीने आणि ठोस प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. मला हे सांगण्यास आनंद होत आहे की भारताने नेमके तेच केले आहे,” असे थरूर यांनी भारतीय दूतावासात भाषण देताना सांगितले.
थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात कोणाचा समावेश?
शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळात शांभवी चौधरी (लोक जनशक्ती पार्टी), सरफराज अहमद (झारखंड मुक्ती मोर्चा), जीएम हरीश बालयागी (तेलगू देसम पार्टी), भाजपाचे शशांक मणी त्रिपाठी, तेजस्वी सूर्या, भुवनेश्वर के. लता, मल्लिकार्जुन देवदा (शिवसेना) आणि अमेरिकेतील माजी भारतीय राजदूत तरणजित सिंग संधू यांचा समावेश आहे.
शशी थरूर ऑपरेशन सिंदूरविषयी काय म्हणाले?
थरूर यांनी सांगितले की, भारताने नऊ विशिष्ट दहशतवादी तळ, मुख्यालय आणि लाँचपॅडवर कसे अचूक आणि नियोजनबद्ध हल्ले केले. त्यामध्ये मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबा (एलईटी), बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद (जेईएम) यांचा समावेश होता, ते जो डॅनियल पर्लच्या हत्येसह इतर गोष्टींसाठी जबाबदार असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. त्यांनी अधोरेखित केले की, भारताने स्पष्ट संदेश दिला आहे की भारत दहशतवादाला शांतपणे सहन करणार नाही.
शशी थरूर यांनी दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढण्यासाठी जगाला एकत्र येण्याचे आवाहन केले आणि शिष्टमंडळातील सदस्यांनी ९/११ स्मारकाला दिलेल्या भेटीला अमेरिकेतील ठिकाणाला दिलेली त्यांची पहिलीच भेट असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “हा आमच्यासाठी निश्चितच एक अतिशय भावनिक क्षण होता, परंतु त्यातून एक अतिशय मजबूत संदेशदेखील होता की, आपण अशा शहरात आहोत, जिथे आपल्याच देशात झालेल्या आणखी एका दहशतवादी हल्ल्यासारख्याच क्रूर दहशतवादी हल्ल्याचे व्रण अजूनही आहेत,” असे ते म्हणाले.
शशी थरूर यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये राजकारण्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण या हल्ल्याविरुद्ध एकजुटीने कसे एकत्र आले याची उदाहरणंही दिली. त्यांनी असेही नमूद केले की, ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) नावाच्या एका गटाने काही तासांतच या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. ते म्हणाले की, ही संघटना काही वर्षांपासून संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबाचा भाग आहे.
शशी थरूर म्हणाले की, भारत २०२३ आणि २०२४ मध्ये टीआरएफबद्दल माहिती घेऊन संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध समितीकडे गेला होता. ते म्हणाले, “दुर्दैवाने पाकिस्तानने नकार देण्याचा त्यांचा नेहमीचा मार्ग निवडला. खरं तर चीनच्या मदतीने पाकिस्तानने दोन दिवसांनंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत तयार केलेल्या प्रेस निवेदनातून टीआरएफचा संदर्भदेखील काढून टाकला,” असे ते म्हणाले.