छत्रपती संभाजीनगर : सकाळी नऊ – साडेनऊची वेळ. इदगाह मैदानावर ‘ ईद’ची नमाज ‘ अदा’ करायला मुस्लिम समाज एकत्र झालेला. शहरातील इदगाह मैदानावर जरा नवल झाले एरवी शुभेच्छा देणारे हिंदू बांधव असायचे या मैदानावर पण या वेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी अनेकांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समोर एमआयएमचे नेते खासदार इम्तियाज जलील आले आणि त्यांनी चंद्रकांत खैरे यांची गळाभेटच घेतली. राजकीय लढ्यात समोरासमोर उभे ठाकणारी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीशी लवचिक झाली आणि मुस्लिम बहुल भागातील राजकीय कार्यकर्त्यांचा राबताही खैरे यांच्या निवासस्थानी वाढू लागला होता. त्यामुळेच खासदार जलील आणि चंद्रकांत खैरे यांची गळाभेट चर्चेचा विषय ठरली. २०१९ च्या निवडणुकीमध्ये खासदार जलील यांनी चंद्रकांत खैरे यांचा ४ हजार २३४ मतांनी पराभव केला होता तेव्हापासून सार्वजिक कार्यक्रमात जलील आणि खैरे यांच्यामध्ये फारसा संवाद होत नसे.

हेही वाचा… अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आप संकटात; पक्षाचे १० पैकी सात खासदार गायब

हेही वाचा… तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अनेक भागात रमजान सणाच्या शुभेच्छा देणारे अनेक संदेश अनेक भागात फलकांवर लागले आहेत. एरवी असे चित्र दिसत नसे. गंगा – जमनी तहजीब वगैरे शब्द या शहरात चालणार नाहीत, अशीच आतापर्यतची शिवसेनेची भूमिका असे. ‘ हिरवा साप’ , त्याची गरळ, रझाकाराची पिलावळ, औरंगजेबाची, मोघलांची औलाद अशा शेलक्या विश्लेषणांनी ‘ एमआयएम’ चे वर्णन केले जायचे. मा़त्र, शिवसेनेने ‘ महाविकास आघाडी’ चे सरकार स्थापन केल्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांचा वैचारिक वारसा शिवसैनकांपर्यंत पोहचवला जाऊ लागला. भाजप विरुद्ध लढणारा पक्ष म्हणून मुस्लिम बहुल भागातही शिवसेनेविषयी ममत्व वाटू लागले. त्यातून निर्माण झालेल्या भावनेतून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने रमजानच्या शुभेच्छांचे फलकही लावले. दरम्यान या गळाभेटी बाबत बोलताना भाजपचे लोकसभा प्रभारी समी्र राजूरकर म्हणाले, ‘ ठाकरे गटाचा बेगडी हिंदुत्त्ववादी चेहरा आता उघड झाला आहे’ एकेकाळी आक्रमक असणारी शिवसेना आता मतांसाठी कणाहीन झाल्याचा आरोप केला जात आहे.

ती गळाभेट नव्हती उलट मी झिडकारले पण ते गळ्यात पडले

इदगाह मैदानात प्रार्थना झाल्यानंतर मुस्लिम बंधुना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. तेव्हा अचानक इत्मियाज जलील तेथे आले. त्यांचा हातात हात मी घेत शुभेच्छा दिल्या. पण ते गळ्यात पडले. आज भेटावेच लागते असे म्हणाले. पण मी त्यांना झिडकारले. पण ते गळ्यात पडले. मी गद्दार मंत्री जरी शेजारी बसला तरी त्यांचेकडे मी पाहत नाही. मी कशाला गळाला भेट घेऊ असा खुलासा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.