उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुन्हेगार-राजकीय पुढारी अतिक अहमद आणि त्याच्या भावाची हत्या झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रयागराजमध्ये पाऊल ठेवले. या वेळी एका कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले की, काही लोकांनी आपल्या पापी वृत्तीने प्रयागराजच्या भूमीला जेरीस आणले होते. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी ‘रामचरितमानस’चा दाखला दिला. ते म्हणाले, हे जग कर्माच्या नियमावर चालते. जो जसा वागतो, तशीच क्रिया त्याच्यासोबत होते. उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लुकेरगंज येथील प्रेस ग्राऊंडवर जाहीर सभेला संबोधित करीत असताना अतिक अहमदच्या हत्येवर भाष्य केले.

“हे जग कर्माच्या नियमावर चालते. जे पेराल, तेच उगवेल”, अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी आपला मुद्दा मांडला. मध्ययुगीन काळात तुलसीदास यांनी ‘रामचरितमानस’मधून हा विचार मांडला होता, जो आजही तंतोतंत लागू पडतो, असेही ते म्हणाले. या वेळी ज्या मैदानावर सभा होत होती, त्या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट योगी आदित्यनाथ असे फलक लावण्यात आले होते.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, “राज्यातील २५ कोटी जनता प्रयागराजमधील अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाच्या अपेक्षेने येते. पण नियतीचा खेळ असा होता की, याच शहरातील लोकांना न्याय मिळत नव्हता. अन्याय आणि अत्याचाराला येथील लोक बळी पडत होते. पण नियती एक ना एक दिवस सर्वांचा हिशेब करते. ज्यांनी इतरांच्या हातात तमंछा (देशी कट्टा) दिला, त्यांच्यासोबत काय झाले? हे राज्यातील जनतेने पाहिले आहे.”

प्रयागराजमधील ज्या लुकेरगंज येथे योगी आदित्यनाथ यांची सभा झाली, त्याच शहरात काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने अतिक अहमदच्या अवैध जमिनीवर जप्ती आणली होती. त्या जमिनीवर गरिबांसाठी घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ म्हणाले की, या घरांचा ताबा लवकरच गरीब लोकांना दिला जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योगी आदित्यनाथ यांनी या वेळी गुंडांना इशारा देताना सांगितले की, ज्या गुंड आणि गुन्हेगारांनी अवैधरीत्या जमिनी बळकावल्या आहेत, त्या पुन्हा ताब्यात घेतल्या जातील आणि त्या ठिकाणी गरिबांसाठी घरे बांधली जातील. प्रयागराजमधील जनतेने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला निवडून दिले तर आमचे सरकार गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराविरोधात अशीच कारवाई करीत राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.