काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून गैरप्रकार करण्यात आला असल्याचा आरोप केल्यानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिले आहे आणि हे आरोप हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेतेही त्यांच्या आरोपांनंतर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली आणि १९७५ च्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल पाहण्यास सांगितले. या निकालात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना निवडणूक गैरव्यवहारात दोषी ठरवण्यात आले होते.
निशिकांत दुबे काय म्हणाले?
निशिकांत दुबे यांनी म्हटले की, २०२४ च्या महाराष्ट्र निवडणुकीत भाजपाने फेरफार करून लोकशाही प्रक्रियांना कमकुवत केल्याचा आरोप केला होता. दुबे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, “राहुल बाबा, निवडणूक कशी फिक्स किंवा चोरीला जाते? तुमच्या आजी इंदिरा गांधी यांचे कारनामे वाचा, हा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आहे,” असे ते म्हणाले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने १२ जून १९७५ रोजी दिलेल्या निकालात इंदिरा गांधी यांना निवडणूक गैरव्यवहारात दोषी ठरवले होते. तसेच रायबरेली लोकसभा मतदारसंघामधून त्यांची निवड रद्द केली होती. या निकालामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्याच महिन्याच्या अखेरीस आणीबाणी लागू करण्यात आली होती. निशिकांत दुबे यांनी लोकशाहीवरील काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीवरही टीका केली.

निशिकांत दुबे यांनी काय आरोप केले?
- १९७१ च्या निवडणुकीत सैन्य आणि त्यांच्या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला.
- पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवडणुकीदरम्यान दारू आणि कपडे उघडपणे वाटण्यात आले.
- हिंदू धर्माच्या नावाखाली मते मागण्यात आली.
- मतदारांना वाहनांमधून आणण्यात आले.
- पैशांचे वाटप करण्यात आले.
- सरकारी कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचा प्रचार केला.
“तुम्ही निवडणुकीचे नाटक उभे कराल, देशाला उद्ध्वस्त तुमचे कुटुंब करेल. तुम्हाला आता निवडणुका लुटण्याचे स्वातंत्र्य मिळणार नाही,” असे निशिकांत दुबे म्हणाले.
राहुल गांधी नक्की काय म्हणाले होते?
राहुल गांधींनी नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप केला आणि असा दावा केला की, या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीतही याची पुनरावृत्ती होईल. ‘एक्स’वरील त्यांच्या एका पोस्टमध्ये राहुल गांधींनी ‘मॅच-फिक्सिंग महाराष्ट्र’ या शीर्षकाचा त्यांचा ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील एक लेख शेअर केला. त्या लेखात त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचे आरोप केले होते. “२०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लोकशाहीतील गैरप्रकाराची एक ब्लूप्रिंट होती, हे कसे घडले हे माझ्या लेखात दाखवले आहे,” असे त्यांनी आपल्या ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले.
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला मोठा विजय मिळाला होता. या निवडणुकीत महायुतीला २३५ जागा मिळविण्यात यश आले होते. एकट्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत महाराष्ट्राच्या राजकारणात आपले वर्चस्व मजबूत केले.
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने काय म्हटले?
निवडणूक आयोगाने या आरोपांवर प्रत्युत्तर दिले असून, त्यांचे आरोप हस्यास्पद असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील मतदार याद्यांवर उठवले जाणारे निराधार आरोप कायद्याच्या राज्याचा अपमान करणारे आहेत. निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी काँग्रेसला दिलेल्या उत्तरात ही सर्व तथ्ये समोर आणली होती. ही तथ्ये निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. मात्र, असे मुद्दे वारंवार उपस्थित करून या सर्व तथ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे,” असेही ते म्हणाले.