इस्रायल-इराण युद्ध चिघळले आहे. अमेरिकेने या युद्धात प्रवेश केल्यानंतर परिस्थिती आणखीनच तणावपूर्ण झाली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्याने इराणनेही धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीला बंद करण्यास मंजुरी दिली आहे. हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी तेलमार्ग आहे. या मार्गाद्वारे जगातील २६ टक्के कच्च्या तेलाचा व्यापार होतो. हा मार्ग बंद केल्याने तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. परंतु, ही सामुद्रधुनी बंद झाल्यास भारतातीत तेलाच्या किमती वाढतील आणि त्यामुळे महागाई वाढेल असेही सांगितले जात आहे. त्याबाबत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ते नक्की काय म्हणाले? जाणून घेऊयात.

तेलाच्या किमती महागण्याबाबत केंद्रीय मंत्री काय म्हणाले?

  • केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी रविवारी नागरिकांना आश्वासन दिले आणि म्हटले की, सामुद्रधुनी बंद झाली तरी भारताचा इंधन पुरवठा स्थिर आणि सुरक्षित राहील.
  • इराणने जागतिक तेल वाहतूक मार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
  • त्यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले की, भारताने गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या भू-राजकीय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा आयातीत विविधता आणण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत, असे ते म्हणाले.
  • ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांत आम्ही देशाला होणाऱ्या तेल पुरवठ्याचे इतरही मार्ग शोधले आहेत आणि आता भारतातील मोठा पुरवठा होर्मुझच्या सामुद्रधुनीद्वारे होत नाही.
होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतुकीच्या मार्गांपैकी एक आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

त्यांनी पुढे सांगितले, “देशातील तेल विपणन कंपन्यांकडे अनेक आठवड्यांचा पुरवठा आहे आणि त्यांना अनेक मार्गांनी ऊर्जा पुरवठा होत राहतो. नागरिकांना इंधन पुरवठा स्थिर राहावा यासाठी आम्ही सर्व आवश्यक पावले उचलू,” असेही त्यांनी सांगितले. पुरी हे सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले की, या बाबतीत चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवू आणि पंतप्रधानांनी याबाबत आधीच सर्व प्रमुख नेत्यांशी बोलणे केले आहे. त्यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले असून चर्चा केली आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतुकीच्या मार्गांपैकी एक आहे. इराणच्या संसदेने रविवारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याला मान्यता दिली. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुस्थळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेले युद्ध आणखी वाढले आहे आणि त्यानंतरच इराणकडून ही घोषणा करण्यात आली आहे. ‘न्यूज१८’ ने दिलेल्या वृत्तानुसार, ही सामुद्रधुनी बंद झाल्याने जगात १९७३ पेक्षाही वाईट तेल संकट निर्माण होऊ शकते व त्यामुळे जागतिक मंदी येऊ शकते.

सूत्रांनी इशारा दिला की, सामुद्रधुनी बंद पडल्याने जगातील व्यापार २० ते २५ टक्के आणि जागतिक एलएनजी व्यापार ३० टक्क्यांनी कमी होऊ शकतो आणि त्यामुळे तेलाच्या किमती प्रति बॅरल २०० ते ३०० डॉलर्सपर्यंत वाढू शकतात. याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी ४५ मिनिटे फोनवरून चर्चा केली. मोदींनी गेल्या काही दिवसांत वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती आणि त्यांनी या चर्चेत संवादाद्वारे तणाव कमी करण्यास म्हटले. या प्रदेशातून भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि परतीची खात्री करण्यासाठी त्यांनी इराणचे आभार मानले.

होर्मुझ सामुद्रधुनी किती महत्त्वाची?

होर्मुझ सामुद्रधुनी ही आंतरराष्ट्रीय व्यापारी नौवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जगभरातील कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी सुमारे २० टक्के तेल या सामुद्रधुनीतून जात असते, त्यामुळे ही सामुद्रधुनी बंद केल्यास जागतिक तेल पुरवठा साखळी कोलमडू शकते आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर मोठा परिणाम होऊ शकतो. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास त्याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम होऊ शकतात, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

होर्मुझ सामुद्रधुनी हा एक अरुंद पण अत्यंत महत्त्वाचा जलवाहतूक मार्ग आहे. पर्शिया, अर्थात इराणच्या आखातात शिरण्याचा हा मुख्य मार्ग मानला जातो. या सामुद्रधुनीच्या उत्तरेला इराण, तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती हे देश आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी उत्तर दिशेला पर्शियन आखाताला दक्षिणेकडील ओमानच्या आखाताशी जोडते आणि त्यानंतर ती अरबी समुद्रात विलीन होते. ही सामुद्रधुनी सुमारे १६१ किलोमीटर लांब असून तिची रुंदी सर्वात अरुंद भागात फक्त ३३ किलोमीटर आहे. पश्चिम आशियातील प्रमुख तेल आणि वायू उत्पादक देश तसेच त्यांचे आयातदार वाहतुकीसाठी याच सामुद्रधुनीचा वापर करतात.