उमाकांत देशपांडे, लोकसत्ता

मुंबई : महाराष्ट्रात प्रथमच पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार असल्याने त्याचा महायुतीला प्रचारासाठी अधिक राजकीय लाभ होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड जिल्ह्यांसह पश्चिम व उत्तर महाराष्ट्र, मधील अशा महत्वाच्या जिल्ह्यांमधील निवडणुका तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या टप्प्यात होणार असल्याने भाजपला प्रचारासाठी देशभरातील नेते, मंत्री व कुमक या टापूत सज्ज ठेवता येणार आहे.

भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी महायुती राज्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच लोकसभा सामोरी जाणार आहे. काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाकडूनही जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघ अटीतटीने लढविला जाईल, अशी अपेक्षा आहे. महायुतीची विदर्भात चांगली ताकद असल्याने १९ व २६ एप्रिल रोजी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी तेथे प्रचार करता येईल. मात्र तिसरा, चौथा आणि पाचव्या टप्प्यातील निवडणूक होत असलेल्या मतदारसंघात अटीतटीची लढत होणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये देशातील अनेक राज्यांमधील निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे त्या राज्यांमधील भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील नेते महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांपासून अधिक मोठ्या संख्येने दाखल होतील. तिसऱ्या टप्प्यात बारामतीमध्ये मतदान होणार असून तेथे मोठी कुमक पाठविली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा- आसाममध्ये इंडिया आघाडीत धुसफूस; काँग्रेस-आप आणि तृणमूलमध्ये तुझं माझं जमेना

मुंबई-ठाणे जिल्ह्यातील निवडणूक ही महायुतीसाठी आणि ठाकरे यांच्यासाठी सर्वाधिक महत्वाची आहे. भाजपला या जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ जिंकायचे असून ठाकरे यांच्यासाठी तर हा त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारसंघात ठाकरे यांची ताकद होती. पण फुटीमुळे आता त्यांच्यामागे जनतेचा किती पाठिंबा आहे, हा कौल आता अजमावला जाणार आहे. शरद पवार यांच्या दृष्टीनेही बारामती मतदारसंघात त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यातील सामना अतिशय महत्वाचा आहे. पवार यांचे सर्वाधिक लक्ष व ताकद या निवडणुकीत या मतदारसंघात अधिक राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्य मतदारसंघांमधील विजयापेक्षाही बारामती मतदारसंघात कोण विजयी होणार, हा मुद्दा शरद आणि अजित पवार यांच्यादृष्टीने अतिशय प्रतिष्ठेचा असून त्याकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे भाजपकडून या मतदारसंघात मोठी प्रचारयंत्रणा आणि कार्यकर्त्यांची व नेत्यांची फौज पाठविली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभेसाठी महाराष्ट्रात आतापर्यंत दोन ते तीन टप्प्यांमध्ये मतदान झाले असून पाच टप्प्यांमध्ये प्रथमच मतदान होणार आहे. निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांसह भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील बहुतांश नेते, मंत्री महाराष्ट्रात येणार असून त्यांच्या सभा व प्रचार दौऱ्यांसाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये मतदानापेक्षा पाच टप्प्यांत मतदान होणार असल्याने भाजपला प्रचारावर अधिक जोर देता येणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.