हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघात सलग दुसऱ्यांदा विजय मिळविता येत नाही असा राजकीय इतिहास असताना खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शिवसेनेच्या शिंदेगटाने घेतला. हळद संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी हेमंत पाटील यांनी बरेच केले. सत्तेच्या जवळ असल्याने विकास करता येईल असा त्यांचा दावा असतो. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा विजयी होण्याची परंपरा ते निर्माण करतील काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हिंगोली लोकसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना असे दाेन गट निवडणूक रिंगणात दिसतील.

हिंगोली लोकसभेसाठी भाजपकडून गेल्या दोन वर्षांपासून निवडणूक पूर्व तयारी सुरू होती. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या नावाला भाजपकडून तीव्र विरोध होता. उमेदवारीच्या मागणी संदर्भात महायुतीत मोठा संघर्ष सुरू होता. अखेर विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले. उमेदवारी जाहीर केल्यानंतर हिंगोली, वसमत यासह विविध गावात हेमंत पाटील यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. हिंगोली लोकसभा मतदारसंघात , वसमत, कळमनुरी या विधानसभा तसेच नांदेड जिल्हयातील हदगाव व किनवट तर यवतमाळ जिल्हयातील उमरखेड या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या लोकसभा मतदार संघात २००९ मतदान केंद्रावरून १८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

हेही वाचा : खासदारांच्या ‘कल्याणा’नंतरच मुलाची उमेदवारी, मुख्यमंत्री शिंदे यांची व्युहरचना

या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानापुर्वीच जय पराजयाचे गणित मांडण्या ऐवजी कोणाला उमेदवारी मिळणार याचेच गणित मांडले जाऊ लागले होते. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, काँग्रेसने त्यांच्या पक्षाला जागा सोडण्याची मागणी केली होती. मात्र या ठिकाणावरून शिवसेनेने त्यांचा उमेदवार जाहीर करून मतदार संघावर आपला हक्क कायम ठेवला आहे. महाविकास आघाडीतून शिवसेनेच्या ठाकरे गटाने माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. दरम्यान, आता दोन प्रमुख पक्षांकडू्‌न उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर आता वंचित बहूजन आघाडीची भूमिका कोणती याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : महायुतीत औरंगाबाद लोकसभेचा तिढा कायम

लोकसभा मतदार संघातील ३५ वर्षातील खासदार

सन १९८९-९१ : उत्तमराव राठोड (काँग्रेस), सन १९९१-९६ : विलास गुंडेवार (शिवसेना), सन १९९६-९८ : ॲड. शिवाजी माने (शिवसेना), सन १९९८-९९ : सुर्यकांता पाटील (काँग्रेस), सन १९९९-२००४ : ॲ्ड. शिवाजी माने (शिवसेना), सन २००४-२००९ : सुर्यकांता पाटील (राष्ट्रवादी), सन २००९-२०१४ : सुभाष वानखेडे (शिवसेना), सन २०१४-१९ : ॲड. राजीव सातव (काँग्रेस), सन २०१९ : हेमंत पाटील (शिवसेना).