Bharatiya Jana Sangh Leaders Nanaji Deshmukh : ४ नोव्हेंबर १९७४ रोजी जयप्रकाश नारायण (जेपी) यांनी पाटणा येथील गांधी मैदानापासून राज्य सचिवालयापर्यंत मोर्चा काढला होता. या मोर्चात विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थीही सहभागी झाले होते. त्यावेळी पोलिसांनी या मोर्चावर अचानक लाठीमार सुरू केला. या लाठीमारात जयप्रकाश नारायण हे जखमी झाले असते; पण जनसंघाचे नेते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यकर्ते नानाजी देशमुख हे धाडसाने पुढे आले आणि त्यांनी स्वतःवर लाठ्यांचे प्रहार घेतले, ज्यात त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. या घटनेनंतर नानाजी देशमुख हे जेपी आंदोलनाचे सर्वांत निर्भीड आणि कणखर चेहरे म्हणून ओळखले जाऊ लागले. देशाच्या तत्कालीन इंदिरा गांधी सरकारच्या भ्रष्टाचार आणि कुशासनाविरोधात हे आंदोलन उभं राहिलं होतं.
इंदिरा गांधींवर राजीनाम्याचा दबाव
२२ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू होण्याच्या फक्त तीन दिवस आधी नानाजी देशमुख यांनी संपूर्ण देशभरातील विरोधी पक्षांना एकत्रित करून ‘जनता पार्टी’ची स्थापना करण्याची कृती योजना तयार केली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर त्यांच्यावर तातडीने पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकणे हा यामागचा उद्देश होता. नानाजी देशमुख यांनी जयप्रकाश नारायण (जेपी) यांची राजकारणावरील तिरस्काराची भूमिका कमी केली आणि त्यांना राजकीय शक्तीचंही महत्त्व पटवून दिलं,” अशी आठवण भाजपाचे माजी सरचिटणीस के. एन. गोविंदाचार्य यांनी सांगितली आहे.
जयप्रकाश नारायण यांचे लष्कराला आवाहन
विनय सीतापती त्यांच्या ‘जुगलबंदी – द बीजेपी बीफोर मोदी’ या पुस्तकात लिहितात, “२५ जून १९७५ रोजी जयप्रकाश नारायण यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ‘जनता पार्टी’च्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्या बैठकीत नानाजी देशमुख यांची सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच संध्याकाळी रामलीला मैदानात एक भव्य जाहीर सभा झाली, जिथे जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींचं पंतप्रधानपद बेकायदा ठरवून पोलिस आणि लष्कराला त्यांच्या बेकायदा आदेशांचे पालन करू नका”, असं आवाहन केलं.
आणखी वाचा : आणीबाणीच्या काळात मोदींनी कशी केली सर्वसामान्यांना मदत? पुस्तकात नेमकं काय म्हटलंय?
१९७५ मध्ये देशात नेमकं काय घडलं?
- १९७५ मध्ये देशात प्रचंड अशांततेचं वातावरण निर्माण झालं होतं.
- जयप्रकाश नारायण यांनी लष्कराला केलेल्या आवाहनाने इंदिरा गांधी अस्वस्थ झाल्या होत्या.
- २५ जून १९७५ च्या रात्री इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला.
- त्यांच्या या निर्णयामुळे देशातील मूलभूत अधिकार स्थगित करण्यात आले.
- त्यानंतर विरोधी पक्षांचे नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटक करण्याचे आदेश दिले गेले.
- नानाजी देशमुख यांनी मात्र या अटकेपासून स्वत:ची सुटका करून घेतली होती.
- कॅबिनेटला या आणीबाणीची माहिती दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजता देण्यात आली.
नानाजी देशमुख यांना आला होता फोन
विनय सीतापती लिहितात, “नानाजी देशमुख यांना आणीबाणीच्या रात्री एक फोन आला. या फोनवरून कुणीतरी महिलेच्या आवाजात बोलत होतं. तुमच्याकडे अटकेपासून सुटका करण्यासाठी फक्त एक तास शिल्लक आहे. कारण- रात्री १ वाजता पोलिस तुम्हाला अटक करण्यासाठी येणार आहेत, असं सांगून त्या व्यक्तीनं फोन कट केला. हे ऐकताच नानाजी देशमुख सावध झाले आणि त्यांनी इतरांनाही फोन केले. त्यांच्या सहायकाने थोडेफार कपडे, शर्ट व धोतर एका बॅगेत भरले. जेव्हा दिल्लीतील नेते नानाजींना अटक करण्याचा विचार करीत होते, तेव्हा ते निवा,स्थान सोडून एका गुप्त ठिकाणाकडे रवाना झाले. त्यानंतर काही दिवसांतच ते दक्षिण मुंबईत पोहोचले आणि उद्योजक नस्ली वाडिया यांच्या घरी लपून राहिले.”
संकटात उद्योगपतींनी दिली नानाजींची साथ
आणीबाणीच्या काळात नानाजी देशमुख यांना प्रसिद्ध उद्योगपती नस्ली वाडिया व त्यांच्या पत्नी मॉरीन वाडिया यांनी संरक्षण दिले. इतकेच नव्हे, तर वाडिया यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना आर्थिक मदतही केली, जेणेकरून ते या कठीण काळात तग धरू शकतील. मात्र, काही महिन्यांनी ऑगस्ट १९७५ मध्ये नानाजींना अखेर अटक झाली आणि त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले. जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी हटवून १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या, तेव्हा नानाजी देशमुख यांची तुरुंगातून सुटका झाली. या निवडणुकीत ते उत्तर प्रदेशातील बलरामपूर मतदारसंघातून जनसंघाचे उमेदवार म्हणून उभे राहिले. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पार्टीला प्रचंड यश मिळालं आणि इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. नानाजी देशमुख हेदेखील मोठ्या मताधिक्यानं निवडून आले.

आरएसएसने नानाजी देशमुखांना काय सल्ला दिला होता?
मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यानंतर नानाजी देशमुख यांना केंद्रीय उद्योगमंत्रिपद देण्यात येणार होते. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यांना मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा सल्ला दिला. त्यामागचं कारण म्हणजे १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला जनसंघाचे कोषाध्यक्ष असताना नानाजी देशमुख यांचे वाडिया, मफतलाल व टाटा यांसारख्या उद्योगपतींशी चांगले संबंध तयार झाले होते. त्यामुळे मंत्रिपद स्वीकारल्यास या संबंधांवरून वाद निर्माण होण्याची भीती संघाच्या नेत्यांना वाटत होती.
आणखी वाचा : इंदिरा गांधी व मोरारजी देसाईंना सत्तेतून खाली खेचणारे राज नारायण कोण होते?
नानाजी जनसंघाचे नेते म्हणून कसे उदयास आले?
विनय सितापती त्यांच्या ‘जुगलबंदी– द बीजेपी बीफोर मोदी’या पुस्तकात लिहितात, “नानाजी देशमुख यांनी पक्षासाठी निधी गोळा करण्याचे अतुलनीय प्रयत्न केले. एका ठिकाणी तर ते देणगी मिळविण्यासाठी घोड्यावरून जाणाऱ्या राजकुमारामागे धावत गेले होते.” नानाजी देशमुख यांचा जन्म महाराष्ट्रातील एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे संपूर्ण नाव चंडिकादास अमृतराव देशमुख असे होते. मात्र, नंतर त्यांना नानाजी देशमुख आणि लोकनेता म्हणून ओळखले जाऊ लागले. नानाजींनी भाजी विकून शालेय शिक्षणाचे शुल्क भरले होते. अत्यंत साधारण कुटुंबातून पुढे झालेल्या नानाजींची राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये झपाट्याने भरारी झाली. उत्तर प्रदेशातील संघकार्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि १९५० साली गोरखपूरमध्ये पहिले ‘सरस्वती शिशू मंदिर’ स्थापन केले. पुढे नानाजी देशमुख यांनी भारतीय जनसंघात प्रवेश केला आणि लवकरच पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून उदयास आले.
२०१९ मध्ये नानाजी देशमुख यांना भारतरत्न
१९७७ मध्ये जनता पक्ष सरकार स्थापन झाल्यानंतर काही काळातच नानाजी देशमुख सक्रिय राजकारणातून मागे सरकले. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. प्रथम त्यांनी गोंडा येथे वास्तव्यास सुरुवात केली आणि नंतर ते चंद्रकूट येथे स्थायिक झाले. तिथे त्यांनी महात्मा गांधी चंद्रकूट ग्रामोदय विद्यापीठ स्थापन केले, जे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ मानले जाते. नानाजी देशमुख यांनी समाजकारण आणि ग्रामीण विकासाच्या कामात स्वतःला वाहून घेतले. २०१० मध्ये वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी चंद्रकूट येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, २०१९ मध्ये नरेंद्र मोदी सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले.