२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवासाठी विरोधक राष्ट्रीय पातळीवर एकत्र आले आहेत. INDIA आघाडीच्या माध्यमातून काँग्रेससह इतर २६ प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत. तर भाजपाने एनडीएच्या रुपात समविचारी पक्षांना एकत्र केले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये चांगला जनाधार असलेल्या बहुजन समाज पार्टी (बसपा) या पक्षाने मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नव्हती. बसपा पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी नुकत्याच केलेल्या विधानावरून मात्र या पक्षाने एनडीए आणि INDIA या दोन्ही गटांमध्ये सामील होण्यासाठी मार्ग खुला ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

“निवडणुका झाल्यानंतर आम्ही निर्णय घेणार”

बसपा पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची मायावती यांनी दिल्ली येथे एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यावर आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेऊ, असे मायावती म्हणाल्या. सत्तेत समतोल साधण्यासाठी तसेच दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी आम्ही हा निर्णय घेऊ, असेही मायावती यांनी सांगितले.

Swastik Maheshwari
चौथ्या टप्प्यातील मतदानाआधीच ममता बॅनर्जींना मोठा धक्का; टीएमसी उमेदवाराची पत्नी भाजपात दाखल
Wayanad, Rahul Gandhi, Vinod Tawde,
वायनाडमधील पराभवाच्या भीतीने राहुल गांधींचा रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय – विनोद तावडे
What Abu Azmi Said?
अबू आझमींचं पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उत्तर, म्हणाले; “होय मी नाराज आहे”
nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन

“उपेक्षित वर्ग आणि मुस्लिमांच्या विकासासाठी मजबूत आणि अहंकारी सरकारऐवजी लोकांच्या कल्याणाचे काम करणाऱ्या, समाजाचा विकास करणाऱ्या (लोकांच्या हिताचे मजबूर सरकार) युतीची गरज आहे,” असे मायावती म्हणाल्या.

“आम्ही कोणाशीही युती करणार नाही”

काही दिवसांपूर्वी मायावती यांनी वेगवेगळ्या राज्यांतील विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका जाहीर केली होती. तसेच आम्ही कोणाशीही युती करणार नाही, असेही मायावती म्हणाल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी “बसपा पक्षाने सरकारमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न याआधीही केलेला आहे. मात्र काही पक्षविरोधी, जातीयवादी लोकांनी आमच्या पक्षाला तोडण्याचा प्रयत्न केला. सत्तेत सहभागी होण्याचे प्रलोभन देऊन आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमच्या पक्षाला याचा फटका बसला,” असे मायावती म्हणाल्या होत्या.

या वर्षात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या चार राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या चार राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश आमि छत्तीसगड या तीन राज्यांत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे. तर तेलंगणा या राज्यात बीआरएस, भाजपा आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे.

“…तर आम्हाला नवी दिशा मिळेल”

बसपाच्या सध्याच्या भूमिकेबाबत या पक्षाच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली. “मायावती यांच्या सध्याच्या विधानावरून असे दिसत आहे की, आमचा पक्ष भविष्यात काँग्रेस किंवा भाजपा अशा कोणाशीही युती करू शकतो. हा तर्क खरा ठरल्यास २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला एक नवी दिशा मिळेल,” अशी प्रतिक्रिया या नेत्याने दिली.

“सत्तेत सहभागी झाल्यास आमदार पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही”

दरम्यान, २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये बसपा पक्षाचा एकूण सहा जागांवर विजय झाला होता. तर मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत बसपाचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले होते. याबाबत बोलताना “निवडणूक झाल्यानंतर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बसपाने राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र राजस्थानमध्ये काँग्रेसने बसपाच्या आमदारांना फोडले. सत्तेत सहभागी होण्यासाठी आमच्या आमदारांनी काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भविष्यात बसपा पक्षाने अधिकृतरित्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास आणि आमचे आमदार मंत्री झाल्यास, ते पक्ष सोडून कसे जातील? आमच्या पक्षाने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास आमची स्थिती निश्चितच चांगली असेल. तेव्हा आम्ही वंचित घटकांसाठी चांगल्या प्रकारे काम करू शकू. आमच्या पक्षाचा जनाधार वाढेल,” असेही या नेत्याने सांगितले.

“सत्तेत सहभागी होण्याची आमची भूमिका”

बसपा पक्ष भविष्यात एनडीएमध्ये सहभागी होणार की INDIA चा भाग होणार? असा प्रश्न या नेत्याला विचाण्यात आला. मात्र आमची कोणत्याही एका पक्षात सहभागी होण्याची भूमिका नाही. सत्तेत समतोल म्हणून सरकारचा भाग होण्याची आमची भूमिका आहे, असे या नेत्याने सांगितले.