सौरभ कुलश्रेष्ठ

सचिन अहिर हे कामगार क्षेत्रापासून ते गृहनिर्माण या मुंबईतील सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा क्षेत्रांमध्ये संचार असलेले व्यक्तीमत्त्व. वरळी या मतदारसंघात त्या जोरावर राजकीय स्थान मिळवलेल्या सचिन अहिर यांना शिवसेनेने विधान परिषदेची उमेदवारी देऊन २०१९ मधील आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीचा मार्ग सोपा करण्यासाठी दिलेल्या सहकार्याची पोचपावती दिली आहे. शिवाय २०२४ मध्येही वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा मार्ग निर्धोक ठेवण्यासाठी केलेली ती एक तरतूद आहे.

Pankaja Munde, Chhagan Bhujbal,
पंकजा मुंडे यांनी नाशिकऐवजी बीडमध्ये लक्ष द्यावे, छगन भुजबळ यांचा सल्ला
Pankaja Munde Pritam Munde
आता प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा; पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
gopal shetty poonam mahajan absent from bjp meeting
Lok Sabha Election 2024 : बैठकीला गोपाळ शेट्टी, पूनम महाजन गैरहजर; भाजपकडून निवडणूक तयारीचा आढावा

सचिन अहिर हे मुंबईतील राजकीय विश्वात समोर आले ते कामगारांच्या राजकारणातून. मामा अरुण गवळी यांच्याशी थेट राजकीय भागीदारी टाळून मात्र त्यांच्या नावाचा चलाखीने वापर करत सचिन अहिर यांनी कामगारांच्या राजकारणात व राष्ट्रीय मिल मजदूर संघात बस्तान बसवले. कामगारांच्या संघटनांमधील एक चाणाक्ष व संघटन कौशल्य असलेला तरुण चेहरा अशी ओळख तयार करत सचिन अहिर यांनी मुंबईच्या राजकीय पटलावर आपले स्थान निर्माण केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन झाल्यानंतर ज्या अनेक तरुण राजकारण्यांचे भाग्य उजळले त्यात सचिन अहिर हेही एक.

एकनाथ खडसे : विद्यार्थी प्रतिनिधी ते लोकप्रतिनिधी, ४० वर्षांचा राजकीय प्रवास!

राष्ट्रवादीसाठी त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली. त्यात पराभव होणार हे माहिती असूनही ती लढवली. त्याचे फळ विधानसभेच्या उमेदवारीच्या रूपात सचिन अहिर यांना मिळाले. २००४ मध्ये शिवडी मतदारसंघातून ते निवडून आले. तर २००९ मध्ये मतदारसघ पुनर्रचनेनंतर वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रसेचे आमदार म्हणून ते विधानसभेत निवडून आले.

आमदारकीच्या पहिल्या कारकीर्दीत म्हाडाच्या इमारत व दुरुस्ती मंडळाचे अध्यक्षपद मिळाले. त्यातून त्यांनी गृहनिर्माण क्षेत्रात चांगला जम बसवला. २००९ मध्ये दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेल्यानंतर गृहनिर्माण या त्यांच्या आवडीच्या खात्यात राज्यमंत्रीपदाची संधी त्यांना शरद पवार यांनी दिली. इतकेच नव्हे तर मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपदही दीर्घकाळ सचिन अहिर यांच्याकडे राहिले.

राममराजे नाईक – निंबाळकर : पवारांचे विश्वासू आणि साताऱ्यातील आधारस्तंभ!

चाळकऱ्यांपासून ते टॉवरमध्ये राहणाऱ्या उच्चभ्रूंपर्यंत सर्वांशी जवळीक साधण्याची हातोटी व कौशल्य सचिन अहिर यांच्याकडे असल्याने मुंबईच्या कार्पोरेट क्षेत्राबरोबरच गृहनिर्माण क्षेत्रातील नामवंत बिल्डरांमध्ये त्यांची सहज उठबस राहिली. मंत्री व आमदार म्हणून पक्षाला हवे असलेले योगदान देणारे व त्यामुळे पक्ष नेतृत्वाचे लाडके असलेले सचिन अहिर मुंबई अध्यक्ष म्हणून पक्ष वाढवण्यात मात्र यशस्वी झाले नाहीत. तरीही त्यांच्याऐवजी दुसरा अध्यक्ष राष्ट्रवादीने दिला नाही हेही विशेष. २०१४ मध्ये शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांचा पराभव केला आणि अहिर बाजूला पडले.

सचिन अहिर यांच्या राजकीय आयुष्यात २०१९ हे वर्ष वेगळे वळण घेऊन आले. शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभेत जाण्याचा निर्णय घेतला. ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने या मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांना दावा सोडण्यासाठी राजी केले गेले. त्यानंतरचे आव्हान होते ही निवडणूक चुरशीची होऊ नये यासाठी वरळीतील माजी आमदार सचिन अहिर यांचे सहकार्य आवश्यक होते. त्यासाठी शिवसेनेने थेट अहिर यांना पक्षात येण्याचे व योग्य पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येण्याची कसलीच शक्यता नसल्याने सचिन अहिर यांनी शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण संधी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून ते विधान परिषदेच्या संधीची वाट पाहत होते. आता ती संधी देऊन त्यांचे पुनर्वसन अखेर शिवसेनेने केले आहे.