ठाणे/ डोंबिवली : महाराष्ट्राच्या राजकारणातील विचार, राजकीय संस्कृती आता संपत चालली आहे. फोडाफोडीच्या राजकारणाने कळस गाठला आहे. फोडोफाडी कितीही झाली तरी शिवसेना आणि त्याचे धनुष्यबाण हे चिन्ह ही फक्त शिवसेनाप्रमुखांची मालमत्ता आहे. ही ना उद्धव ठाकरे, ना एकनाथ शिंदे यांची मालमत्ता आहे, अशी स्पष्टोक्ती प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी येथील डोंबिवली आणि ठाण्यातील प्रचारसभेत बोलताना दिली. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आपले असल्याचा दावा अजित पवार करत असले तरी हा पक्ष आणि ते चिन्ह हे फक्त शरद पवार यांचेच आहे, असेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी सोमवारी कल्याण ग्रामीणमधील मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीत तर, मनसेचे ठाणे शहर मतदारसंघातील उमेदवार अविनाश जाधव, ओवळा-माजीवडा मतदारसंघातील उमेदवार संदीप पाचंगे आणि कळवा- मुंब्रा मतदार संघातील उमेदवार सुशांत सूर्यराव यांच्या प्रचारासाठी ठाण्यात जाहीर सभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दलबदलू भूमिकेवर सडकून टीका केली. देशाला विचार देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितले जात होते. पण आता महाराष्ट्रात तो विचार, राजकीय संस्कृती शिल्लक राहिली आहे का, असा प्रश्न उपस्थित करत स्वार्थाच्या डोहात सर्व बुडाले असल्याची टीका त्यांनी केली. अतिशय खालच्या थराचे राजकारण या राज्याने कधीही पाहिलेले नाही, असे राजकारण सुरू असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>Amit Shah : UCC बाबत अमित शाह यांची मोठी घोषणा, आदिवासी बांधवांना काय दिलं आश्वासन?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांवर टीका

चाळीस आमदार निघून जातात, त्याचा मुख्यमंत्र्यांना थांगपत्ता लागत नाही. आमदारांना घेऊन जाणारा म्होरक्या म्हणाला होता की, अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, तोच आता त्यांना मांडीवर घेऊन बसला आहे. आता त्यांची घुसमट होत नाही, अशी टीका राज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.