सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांतील विजयानंतर सोलापूर जिल्ह्यात शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील आणि सुशीलकुमार शिंदे या तिघा ज्येष्ठ नेत्यांचे सूत पुन्हा जुळले आहे. यातच जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाची संपूर्ण सूत्रे मोहिते-पाटील कुटुंबीयांकडे सोपविण्यात आली असून जिल्ह्यातील विधानसभेच्या उमेदवारांची निवड मोहिते-पाटील यांच्याच सल्ल्यानेच होणार असल्याचे स्पष्ट संकेत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत. त्यातून केवळ स्वपक्षाच्याच नाहीत तर महाविकास आघाडीच्या सर्व अकरा जागा जिंकून देण्याचा चंग बांधत मोहिते-पाटील कुटुंबीय सक्रिय झाले आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिव स्वराज्य यात्रेसाठी सोलापुरात आलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर मोहिते-पाटील कुटुंबीयांविषयी जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त केली. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यापुढे जाऊन माढा व सोलापूर लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकून देत भाजपचे उच्चाटन करण्यात मोठा हातभार लावणाऱ्या मोहिते-पाटील कुटुंबीयांच्या सल्ल्यानेच जिल्ह्यातील विधानसभेसाठी उमेदवार निवडले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील राजकारणाची संपूर्ण सूत्रे पुन्हा मोहिते-पाटील यांच्या ताब्यात जाणार असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा…विश्वजित कदम – संग्रामसिंह देशमुख पारंपारिक प्रतिस्पर्धी पुन्हा समोरासमोर ?

पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचा मागील ५० वर्षांचा वेध घेतला असता शरद पवार आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यात अधुनमधून ‘ घडलं-बिघडल्या ‘ चे चित्र दिसायचे. कधी सौहार्दपूर्ण दाट मैत्री, कधी शीतयुध्द तर कधी युध्दाचा उडालेला भडका आणि त्यातून टोकाला पेटलेल्या संघर्षाचा महाराष्ट्राने पाहिला आहे. शरद पवार यांच्या सोबत असताना मोहिते-पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रमुख अडसर होता, असे बोलले जायचे. त्यातूनच मोदी लाट असताना मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते-पाटील कुटुंबीयांनी शरद पवार यांची साथ सोडून थेट भाजपमध्ये जाणे पसंत केले होते. तेथे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांना विधान परिषदेवर सामावून घेण्यात आले होते. नंतर काही दिवसांतच त्या पक्षातही मोहिते-पाटील कुटुंबीयांची घुसमट होऊ लागली. त्याचे उदाहरण म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने मोहिते-पाटील यांना अजिबात विश्वासात न घेता त्यांच्या घरच्या माळशिरस राखीव जागेवर संघ परिवारातील राम सातपुते यांना शेवटच्या क्षणी आयात करून त्यांच्या आमदारकीची सोपविलेली जबाबदारी. जे मोहिते-पाटील हे पूर्वी पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेचे उमेदवार ठरविताना महत्वाचा अधिकार गाजवायचे, त्यांना स्वतःच्या माळशिरसमध्येही उमेदवार ठरविण्याचा अधिकार भाजपमध्ये राहिला नव्हता.

एव्हाना, जे घडायचे ते घडले. लोकसभा निवडणुकीत वारे फिरले. मोहिते-पाटील आणि शरद पवार यांचे मनोमिलन झाले. तत्पूर्वी, तिकडे अजित पवार हे भाजप सोबत गेल्यामुळे आणि त्यातच लोकसभा निवडणुकीत भाजपनेही मोहिते-पाटील कुटुंबीयांना हलक्यात घेतल्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा मार्ग आणखी सुलभ झाला. माढा व सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या काही जागा जिंकून दिल्यामुळे आणि शरद पवार, मोहिते-पाटील आणि सुशीलकुमार शिंदे या तिघा बलाढ्यांना उतार वयात एकमेकांची गरज जास्त अधोरेखीत झाली आहे.

हेही वाचा…लोकसभेत फटका बसल्यानेच शरद पवारांवर टीकाटिप्पणी अजित पवारांनी टाळली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात फेर राजकीय जुळणी करताना, शरद पवार यांनी यापूर्वी २५-३० वर्षात सोलापूर जिल्ह्यात माढ्याचे बबनराव शिंदे व संजय शिंदे या आमदार बंधुंना पर्यायी नेतृत्व म्हणून उभे केले होते. ते आज शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या सोबतीला गेले आहेत. या शिंदे बंधुंसह इतर विरोधकांचा बंदोबस्त करण्याची संधी मोहिते-पाटील यांच्याकडे चालून आल्याचे मानले जाते. या संधीचे सोने करून स्वतःचे गतवैभव परत मिळविण्यासाठी मोहिते-पाटील कुटुंबीय पायात भिंगरी लावून फिरू लागल्यामुळे त्याचे दृश्य परिणाम आगामी विधानसभा व नंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह पुढील राजकारणात पाहायला मिळतील, असे राजकीय जाणकारांना वाटते.