मुंबई : लोकसभेत गुरुवारी मंजुरीसाठी सादर झालेल्या ‘वक्फ’ (सुधारणा) विधेयकाला शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी विरोध न करता सभात्याग केल्याप्रकरणी मुस्लीम समुदायातील व्यक्तींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर शनिवारी निदर्शने केली. निदर्शक हे भाजपचे दलाल असल्याचा आरोप करत मुस्लिमांच्याच दुसऱ्या गटाने निदर्शकांना तेथून हुसकावून लावले. मुस्लिमांचे दोन गट आमने-सामने आल्याने कलानगर वसाहतीसमोर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा >>> नैसर्गिक आपत्तीबाधितांना यंदा निकषाच्या दुपटीने मदत

आंदोलन करणाऱ्या १५ ते २० व्यक्ती होत्या. आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून सामान्य मुस्लीम आहोत, असे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने एकगठ्ठा मते दिली. मुस्लीम मतांच्या जोरावर ठाकरे यांचे मुंबईत तीन खासदार निवडून आले आहेत. मात्र जेव्हा लोकसभेत ‘वक्फ’चे विधेयक मांडले गेले, तेव्हा ‘इंडिया आघाडी’च्या खासदारांप्रमाणे ठाकरे यांच्या खासदारांनी विधेयकाला विरोध केला नाही. त्यांनी सभागृहातून पळ काढला, असा आरोप या मुस्लीम निदर्शकांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठ- दहा व्यक्तींनी वांद्रे परिसरातील एका कोपऱ्यात काही घोषणा दिल्या म्हणून ते शिवसेनेच्या विरोधातले आंदोलन होत नसते. निदर्शने करण्यास पोलीस परवानगी लागले. या मंडळींना कोणाची फूस आहे, हे सर्वांना माहिती आहे. सर्व गोष्टी ठरवून केल्या जात आहेत. –अॅड. अनिल परब, शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते