PM Narendra Modi Pakistan warning : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्या हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. यादरम्यान, भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवीत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या भ्याड हल्ल्याला गुरुवारी (२२ मे) एक महिना पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलांनी दाखविलेल्या शौर्याला अभिवादन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

नेमके काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी बिकारनेरमधील एका जाहीर सभेला संबोधित केलं. “ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. जेव्हा सिंदूर स्फोटकाचं रूप घेतं, तेव्हा काय परिणाम होतात, हे संपूर्ण जगानं आणि देशाच्या शत्रूनं (पाकिस्तान) पाहिलं आहे. माझ्या नसांमध्ये रक्त नाही, तर गरम सिंदूर वाहत आहे. आता पाकिस्तानबरोबर ना व्यापार होणार, ना चर्चा. त्यांना प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा पंतप्रधानांनी दिला.

प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला ठोस उत्तर दिलं जाईल. भारत अणुबॉम्बच्या धमक्यांना भीक घालणार नाही. पाकिस्तानच्या राज्य आणि राज्याबाहेरील दहशतवादी घटकांना एकच मानलं जाईल, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. बिकानेर येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले, “राजस्थानची ही शौर्यभूमी आपल्याला शिकवते की, देश किंवा देशातील माणसांपेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही. २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं. त्यांनी आधी धर्म विचारला आणि गोळ्या झाडल्या. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जखम ही १४० कोटी भारतीयांच्या हृदयाला झालेली जखम आहे. दहशतवाद्यांना कल्पनाही करता येणार नाही, अशी शिक्षा आम्ही त्यांना देऊ.”

आणखी वाचा : Operation Sindoor : पाकिस्तानला पुन्हा धडकी भरणार? ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची नवी रणनीती; बैठकीत काय ठरलं?

तिन्ही सैन्यदलांना मोकळीक

“आज, तुमच्या आशीर्वादाने आणि भारतीय सैन्याच्या शौर्याने आपण दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. आपल्या सरकारने तिन्ही सैन्यदलांना मोकळीक दिली आहे. त्यांनी असा चक्रव्यूह तयार केलाय की, पाकिस्तानने गुडघे टेकले आहेत. २२ तारखेला झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात आपण केवळ २२ मिनिटांत दहशतवाद्यांची नऊ मोठी ठिकाणं उद्ध्वस्त केली. जेव्हा सिंदूर स्फोटकाचं रूप घेतं, तेव्हा काय परिणाम होतात हे संपूर्ण जगानं आणि देशाच्या शत्रूंनी पाहिलं आहे,” असा इशारा मोदींनी दिला.

“मोदीचं मन थंड; पण रक्त गरम”

“पाकिस्तान भारताशी थेट युद्ध कधीही जिंकू शकत नाही. जेव्हा जेव्हा थेट युद्ध झालं, तेव्हा तेव्हा पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. म्हणूनच त्यांनी युद्धासाठी दहशतवादाचं अस्त्र निवडलं. स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक दशकांपासून हेच ​​सुरू आहे. याआधी पाकिस्ताननं भारतात अनेकदा दहशतवाद पसरवून निष्पापांचा जीव घेतला आहे. परंतु, आता भारतमातेचा सुपुत्र मोदी छाती फुगवून येथे उभा आहे. मोदीचं मन थंड आहे; पण त्याचं रक्त गरम आहे. मोदीच्या नसांतून रक्त नव्हे, तर गरम सिंदूर वाहत आहे”, असंही पंतप्रधान म्हणाले.

“दहशतवादाचा फणा चिरडायचा हाच मार्ग”

२०१९ मधील बालाकोट सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करीत पंतप्रधान म्हणाले, “दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यानं तेव्हा पाकिस्ताच्या घरात घुसून अनेक दहशतवाद्यांना ठार केलं होतं. आताही भारतीय सैन्यदलानं तशीच कामगिरी केली आहे. दहशतवादाचा फणा चिरडायचा तर हाच मार्ग आहे. हा भारत आहे, नवा भारत आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाचा सामना करण्यासाठी तीन तत्त्वं निश्चित केली आहेत. जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर त्याला योग्य उत्तर दिलं जाईल. या हल्ल्याची वेळ आणि पद्धती आपलं सैन्य ठरवेल. अटी आणि शर्तीदेखील आपल्याच असतील.”

“पाकिस्तानला किंमत मोजावी लागेल”

“आज राजस्थानच्या भूमीवरून, मी माझ्या देशाच्या लोकांना नम्रपणे सांगू इच्छितो की, “जो सिंदूर मिटाने निकले थे, उन्हे मिट्टी में मिलाया है”, असे पंतप्रधान म्हणाले. ज्यांनी देशाच्या सुपुत्रांवर अंदाधुंद गोळीबार करून रक्तपात केला, त्यांना प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागली आहे. ज्यांना वाटायचे की, भारत शांत राहील, ते आता त्यांच्या घरात लपून बसले आहेत. दुसऱ्याला शस्त्रांचा धाक दाखविणारे आता ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत,” असा घणाघातही मोदींनी केला.

पुढे पंतप्रधान मोदी यांनी, “भारतानं स्पष्ट केलं आहे की, पाकिस्तानला प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल. ही किंमत पाकिस्तानचं सैन्य आणि त्यांची अर्थव्यवस्था असे दोघेही भरतील. ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने बिकानेरमधील नल हवाई तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना त्याचे कोणतेही नुकसान करता आले नाही. याचाच दाखला देत, पाकिस्तानमधील रहिमयार खान हवाई तळ पुन्हा कधी उघडेल हे कोणालाही माहीत नाही. तो ‘आयसीयू’मध्ये आहे. भारताच्या हल्ल्याने तो तळ उद्ध्वस्त झाला आहे”, असे अधोरेखित केले.

हेही वाचा : Maharashtra Politics : छगन भुजबळांनंतर धनंजय मुंडेंच्या गळ्यातही लवकरच मंत्रिपदाची माळ?

“पाकिस्तानबरोबर ना व्यापार होणार, ना चर्चा”

पाकिस्तानबरोबर ना व्यापार होणार, ना चर्चा. जर चर्चा झालीच, तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरबाबत होईल. जर पाकिस्ताननं दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत, तर त्यांना कोणताही देश आर्थिक मदत करणार नाही. तसेच त्यांना भारताच्या हक्काचं पाणीही मिळणार नाही. भारतीयांच्या रक्ताशी खेळणं पाकिस्तानला महागात पडेल. जगातली कोणतीही ताकद आपल्याला या निर्णयापासून रोखू शकत नाही, असंही पंतप्रधानांनी ठामपणे सांगितलं. पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे जागतिक स्तरावर ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार आहेत, असंही मोदींनी यावेळी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची नवी रणनीती

दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाची तीन पथके बुधवारी (२१ मे) परदेश दौऱ्यासाठी रवाना झाली. या दौऱ्यांदरम्यान पाकिस्तानकडून ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत पसरवली जात असलेली चुकीची माहिती खोडून काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर दहशतवादाच्या विरोधातील लढ्यात इस्लामाबादची दुटप्पी भूमिकाही उघड केली जाणार आहे. सिंधू जलसंधी करारावरील भारताची भूमिकाही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात येणार आहे. त्याशिवाय सीमापारच्या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या ‘नवीन सामान्य’ धोरणाची माहिती जागतिक स्तरावर मांडली जाणार आहे.