सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : परळी येथील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानंतर धनंजय मुंडे यांना बळ आणि पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन अशी नवी राजकीय कसरत लोकसभा निवडणुकपूर्वी पूर्ण केली जाईल असे संकेत देण्यात आले. पंकजा मुंडे यांनी दोन शब्द आणि वाक्यांमध्ये सांध ठेवत केलेल्या वक्तव्यामुळे निघालेले राजकीय अर्थ एका बाजूला आणि नांदेड ते परळी असा सर्व सत्ताधारी मंडळींबरोबर केलेला हेलिकॉप्टर प्रवास असे दोन पारडे करून कौल तपासला जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या नेते आहेत, असे स्पष्टपणे सांगूनच टाकले. त्यामुळे बहुचर्चित ‘पहाटेच्या शपथविधी’च्या वेळीच्या धनंजय मुंडे यांच्या भूमिका नक्की काय असतील, याचा आता मतदारांनाही अंदाज आला. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना बळ दिलेले आहेच. शिवाय देवेंद्र फडणवीस यांचेही ते लाडके असल्याचे स्पष्टपणे मतदारांपर्यंत पोहचले. खरे तर ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमात पंकजा मुंडे यांचे स्थान कोणत्या जबाबदारीमध्ये, हा प्रश्न निर्माण झाला असता. मात्र, त्यांनी केलेल्या सात मिनिटाच्या भाषणात त्यांनी परळीची नागरिक आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची प्रतिनिधी म्हणून सहभागी झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या वेळी खासदार डॉ. प्रीतम या दिल्ली येथे अधिवेशानास हजर होत्या. याच कार्यक्रमात ‘धनंजय आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र रहावे’, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पण ते एकत्र राहणार कसे याचा उलगडा ना बीडच्या मतदारांना झाला, ना परळीच्या.

हेही वाचा… खासदार शिंदे गटाचा, तयारी भाजपाची; पालघर लोकसभेत भाजपाची कुरघोडी?

हेही वाचा… मंत्री संजय राठोड यांची कन्याही राजकारणात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे विजयी झाले असल्याने त्यांनी विधानसभेचा दावा सोडावा, असे कोणताही राजकीय व्यक्ती म्हणू शकणार नाही. मग पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन कसे केले जाणार आणि राजकीय व्यासपीठावर दोघे बहिण – भाऊ एकत्र कसे राहणार, असा प्रश्न कायम आहे. शासकीय कार्यक्रमाचे नियोजन करून धनंजय यांनीही महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे पाठबळ आपल्याला आहे, हे स्पष्टपणे दाखवून दिले. पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी या पर्यायावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, पंकजा मुंडे यांनी ‘मी लोकसभा लढवणार नाही’ असे जाहीरपणे सांगितले होते. एका अर्थाने डाॅ. प्रीतम मुंडे यांची जागा अबाधित ठेवण्याचेच पंकजा सूचित करत आहेत. लाेकसभेसाठी पंकजा मुंडे यांचे मन वळवण्याचे प्रयत्न झाले तर डाॅ. प्रीतम मुंडे यांचे काय, असा प्रश्न उतरताेच. सत्तेसाठी सुरू असणाऱ्या कसरतीमध्ये परळीची कसरतही चर्चेत राहण्याची शक्यता आहे.