सतीश कामत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या लोकांनी एकनाथ शिंदे यांची ठाकरेंशी भेट होऊ दिली नाही. त्यामुळे मला गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा खुलासा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

रत्नागिरी येथे बंडखोरीची पार्श्वभूमी विशद करताना सामंत यांनी पडद्यामागच्या घडामोडी सांगितल्या. एकनाथ शिंदे यांना थांबवण्यासाठी  उद्धव ठाकरे यांना मी चार दिवस‌‌ विनंती करत होतो.पण त्यांच्याभोवती असणाऱ्या लोकांनी ते होऊ दिले नाही. ठाकरे व शिंदे भेट होऊच नये असेच या मंडळींचे धोरण होते. त्यामुळे मी पाचव्या दिवशी गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला. पण मी कळपाने गेलो नाही. एकटा आणि सांगून गेलो.

जे काही प्रसंग घडले, तो नंतरचा विषय आहे. पण, रत्नागिरीचा विकास करणे, रत्नागिरीमधील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणे, ही उद्योगमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. अजूनपर्यंत पालकमंत्रीपद जाहीर झालेले नाही. ते उद्या किंवा परवा जाहीर होईल. रत्नागिरीचा पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्याला निधीची कमी पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीसुध्दा सामंत यांनी दिली