सुजित तांबडे

पुण्यातील विकासाच्या राजकारणाचे लाभार्थी होण्यासाठी व त्यांचे श्रेय घेण्यासाठी नेहमी तत्पर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि गणेशोत्सवात गल्लोगल्ली फिरून राजकीय प्रचार करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात अतिवृष्टीने हाहाकार झाल्यानंतर मात्र तितक्याच तडफेने जबाबदारी घेण्यासाठी पुढे न आल्याने राजकीयदृष्ट्या अनाथ झालेल्या पुण्याला वाली कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.‌

हेही वाचा >>> माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी शिवबंधन बांधल्याने मंत्री संजय राठोड मतदारसंघातच अडचणीत 

पुण्यात सर्वत्र पाणी साचल्यानंतर मोजक्या लोकप्रतिनिधींनी पाण्यात उतरून नागरिकांची काळजी असल्याचा देखावा केला. पुण्याच्या विकासाचे नवशिल्पकार अशी जाहिरात झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाऊस किती पडावा हे महापालिकेच्या हातात नाही, असे विधान करत एक प्रकारे सत्ताधारी भाजपची जबाबदारी झटकली. पुणेकरांच्या जखमेवर या विधानामुळे मीठ चोळले गेल्याने अंतर्गत नाराजी व्यक्त झाल्यानंतर व परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुण्याचे पालकमंत्री आणि पुणे महापालिकेचा एकहाती कारभार पाहणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करून पुणेकरांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. आजवर पुण्यात केलेल्या विकास कामांची जाहिरातबाजी आणि सभासंमेलनात डंका पिटणाऱ्या भाजपने ही भूमिका घेतल्याने प्रश्न सुटतो का? दिलगिरी व्यक्त करत शरणागती पत्करणे हीदेखील वरकरणी एक राजकीय खेळी असून, राजकारण्यांच्या या डावपेचांमध्ये पुण्याला वाली कोण? असा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला आहे.

हेही वाचा >>> आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक शिंदे गट आणि भाजपा एकत्र लढवणार?

मुसळधार पावसाने पुणे जलमय झाल्यानंतर पुण्याचा विकास केल्याचा आणि पुणेकरांना पायाभूत सुविधा दिल्याचा सत्ताधारी भाजपचा दावा फोल ठरला. मागील पाच वर्षे पुणे महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता होती. त्यामुळे सध्या निर्माण होणाऱ्या परिस्थितीला भाजप जबाबदार असल्याच्या आरोपाच्या फैरी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाडल्या जाऊ लागल्यावर हे प्रकरण अंगलट येणार, याची जाणीव भाजपला झाली. वातावरण तापून पुणेकरांचा रोष पत्करावा लागू नये, यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवी खेळी खेळली. त्यांनी जाहीरपणे या परिस्थितीची सत्ताधारी म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि पुणेकरांकडे दिलगिरीही व्यक्त करून टाकली. वरकरणी झालेल्या चुकीचे परिमार्जन त्यांनी केल्याचे दिसत असले, तरी त्यामागेही सुप्त राजकीय डावपेच आहेत. त्यांनी पुणेकरांची अगोदरच माफी मागून मनाचा मोठेपणा दाखविला असला, तरी पुढील पाच वर्षे पुन्हा संधी द्या. मग उर्वरित विकासकामे करू, अशी एकप्रकारे सावध भूमिका यामागे दिसते. इतकेच नव्हे तर दिलगिरी व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्यावर कुरघोडी केल्याचेही मानले जात आहे.

हेही वाचा >>> बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये जाण्यास इच्छुक पण…

भाजपकडे पाच वर्षे सत्ता असल्याने त्यांना अपयशाचे धनी व्हावे लागणार आहे. पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी पुण्याला वाली कोण? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. सध्या तरी राजकीय पक्ष हे आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले आहेत. शहरात सर्वत्र पाणी साचल्यानंतर फारसे कोणी मदतीसाठी धावले नाहीत. मात्र, पूरस्थिती ओसरल्यावर भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसही पुणेकरांचा कळवळा असल्याचे भासवू लागली आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट, पाणी साचलेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधणे, यावर या दोन पक्षांनी भर दिला आहे. एकेकाळी पुण्यावर अधिराज्य गाजविणाऱ्या काँग्रेसची नेतेमंडळी फारशी कुठेही फिरण्याचा त्रास घेताना दिसत नाही. दोन्ही गटांच्या शिवसेना आणि मनसे हे आपलेच प्रश्न सोडविण्यात गुुंतले आहेत. अशा परिस्थितीत विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा कर देणाऱ्या पुणेकरांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्यासारखी झाली आहे.

हेही वाचा >>> शिवसेनेतील भाऊबंदकीचा नंदुरबारमध्ये भाजपला लाभ; नंदुरबार जिल्हा परिषदेत विजयकुमार गावित यांची सत्ता

भाजपने गेल्या पाच वर्षांत कोणतेही विकासकाम किंवा प्रकल्प हाती घेण्यापासून ते प्रकल्प पूर्ण होईपर्यंत जाहिरातबाजी आणि सभासंमेलनांतून डंका पिटवून सांगण्याचा प्रयत्न केला. मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणले. त्यामुळे या प्रकल्पाचा सर्वत्र बोलबाला झाला. मात्र, सध्या वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गात सुरू असलेली मेट्रो रेल्वे आतापासूनच रिकामी धावू लागली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणून केंद्र सरकारकडून करोडो रुपयांचा निधी आणला; परंतु एका पावसात सर्व पैसा पाण्यात गेल्यासारखी स्थिती झाली. ‘स्मार्ट सिटी’चे तळे झाले. बीआरटी प्रकल्प हा असून नसल्यासारखा झाला आहे. त्यामुळे पुण्यात गेल्या पाच वर्षांत विकासकामे केल्याचा भाजपचा दावा फोल ठरला आहे.

हेही वाचा >>> राहुल गांधी, दिग्विजय सिंह अजून चालत आहेत का?, लोकांची यात्रेकरूंना कुतुहलाने विचारणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्याला आजवर लाभलेले नेतृत्त्व पाहता पुण्यात मोठे प्रकल्प लवकर येण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. काकासाहेब गाडगीळ, ना. ग. गोरे. केशवराव जेधे, एस. एम. जोशी, विठ्ठलराव गाडगीळ, मोहन धारिया यांनी पुण्याचे खासदार म्हणून नेतृत्त्व केले आहे. त्यानंतरच्या काळात अण्णा जोशी, सुरेश कलमाडी, विठ्ठल तुपे, प्रदीप रावत, अनिल शिरोळे आणि गिरीश बापट यांनी केंद्रामध्ये पुण्याचे प्रतिनिधित्त्व केले. काँग्रेसची सत्ता असताना काहीजण मंत्री झाले. भाजपची सत्ता आल्यावर पुण्यात मोठे प्रकल्प येतील, अशी पुणेकरांची अपेक्षा होती. मात्र, तसे झालेले दिसत नाही. पायाभूत सुविधांबाबत सर्वकाही आलबेल असल्याचे भासविले जात असले, तरी त्यामध्ये तथ्य नसल्याचे पावसाने दाखवून दिले.