जळगाव – जिल्ह्यात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकीतील घवघवीत यशानंतर महायुतीतील भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या अलिकडे वाढली आहे. तर, महाविकास आघाडीला मोठी गळती लागली आहे. असे असताना, कोणत्याही सत्तास्थानी नसलेल्या काँग्रेसमध्ये मात्र प्रवेश करण्यासाठी गर्दी होऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे वेध लागल्यानंतर जिल्ह्यातील महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी नवीन सदस्य नोंदणीसह पक्षप्रवेश, तालुकानिहाय मेळावे, मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. युती झाली किंवा नाही तरी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आदेश त्या-त्या पक्षांकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले जात आहेत. तिरंगा यात्रेच्या निमित्तानेही मतदारांपर्यंत जाण्याचा तसेच एकी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न महायुतीने केला. तुलनेत महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटात मरगळ असताना, काँग्रेसमध्ये मात्र उत्साह आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली असून त्यामुळे महायुतीसह राजकीय तज्ज्ञही गोंधळले आहेत.
महायुतीचे तिन्ही घटक पक्ष तिरंगा यात्रेतून आगामी निवडणुकांची पायाभरणी करत असताना, काँग्रेसनेही फैजपूरमध्ये माजी आमदार शिरीष चौधरी आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढून आपण कुठेच कमी नसल्याचे दाखवून दिले. त्यामुळे चर्चेत आलेल्या काँग्रेसने आता यावलमध्ये मोठा पक्ष प्रवेश घडवून आणला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश न करता काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याने स्वाभाविकपणे महायुतीच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसची रावेर-यावल तालुक्यात हळूहळू ताकद वाढत चालल्याचे लक्षात घेऊन महायुतीही यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.
दरम्यान, अमळनेरमधून विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार डॉ.अनिल शिंदे यांनी काँग्रेसच्या मार्चमध्ये पार पडलेल्या जळगाव जिल्हा बैठकीत राज्याच्या सहप्रभारींसमोर पक्ष निधीतून मिळालेले दोन लाख रुपये आपल्याकडून घेण्यात आल्याचा गंभीर आरोप जिल्हाध्यक्षांवर केला होता. परिणामी, काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. डॉ. शिंदे यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश करुन काँग्रेसला सोडचिठ्ठी सुद्धा दिली. त्याचा कोणताही परिणाम काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उत्साहावर झालेला नसल्याचे दिसून येत आहे.