Prakash Raj on BJP: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेले ऑपरेशन सिंदूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनेते प्रकाश राज यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. २२ एप्रिलला झालेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावलं उचलली. यामध्ये ऑपरेशन सिंदूर ही महत्त्वपूर्ण कारवाई करत दहशतवाद मुळीच खपवून घेतला जाणार नाही असा संदेश देशभरात पाठवला. मोदी सरकारच्या या कारवाईला पाठिंबा असल्याचे सर्व पक्षांनी म्हटले खरे, मात्र काही विरोधी पक्ष यावर टीका करतच आहेत. यामध्येच आता दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी उडी घेतली आहे. सोमवारी प्रकाश राज यांनी ऑपरेशन सिंदूर आणि पंतप्रधानांशी संबंधित वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर भाजपा नेत्यांनी प्रकाश राज यांना धारेवर धरलं.
प्रकाश राज काय म्हणाले?
प्रकाश राज यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. प्रकाश राज यांनी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी प्रश्न विचारला की, “पण, महिला या वृद्ध माणसाकडून सिंदूर का स्वीकारतील?” प्रकाश राज यांनी केलेली ही पोस्ट अनेकांनी पंतप्रधान मोदींच्या वयावर आणि वैवाहिक आयुष्यावर केलेली टीका म्हणून पाहिली.
भाजपाने राज यांनी केलेल्या या पोस्टची तुलना शत्रूच्या एजंट्सशी केली. यावेळी भाजपाने म्हटले की, पडद्यावर इतक्या गोष्टी सांगणारा एक उत्तम अभिनेता खऱ्या आयुष्यात मात्र खलनायकासारखा वागतो, हे अधिक लज्जास्पद आहे.”
भाजपाची प्रतिक्रिया
प्रकाश राज यांनी केलेल्या या पोस्टनंतर भाजपातील नेते आणि कार्यकर्ते चांगलेच संतापले. भाजपा नेते एन. व्ही. सुभाष यांनी प्रकाश राज यांच्या वक्तव्याचा निषेध करत हे अत्यंत लज्जास्पद आणि भारतातील महिलांचा अनादर करणारे असल्याचे म्हटले आहे. प्रकाश राज यांनी केलेले हे विधान मागे घ्यावे, असे आवाहनही सुभाष यांनी केले. तसंच अशा प्रकारचे विधान प्रकाश राज यांच्या प्रतिष्ठेला शोभत नाही असेही म्हटले.
“अशा प्रकारचे विधान एका बहुमुखी अभिनेत्याला किंवा त्याच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. मोदींबद्दल बोलणं, भारतीय सैन्याला, समाजाच्या लोकशाही मूल्यांना कमी लेखणं असं वागणाऱ्या या अभिनेत्याने त्याचे शब्द मागे घ्यावेत, कारण हा थेट महिलांवर केलेला हल्ला आहे. एक उत्तम, चारित्र्यवान अभिनेता जेव्हा अशा गोष्टी बोलतो तेव्हा तो खलनायक असल्यासारखे वागतो हे अधिक लज्जास्पद आहे”, असे भाजपाच्या ए. व्ही. सुभाष यांनी म्हटले आहे.
प्रकाश राज यांनी सिंदूरबाबत केलेल्या विधानावरून सुभाष यांनी त्यांची तुलना आयएसआय एजंट्सशी केली आहे. “मला वाटतं की, हा अभिनेता आयएसआय एजंटपेक्षा किंवा लोकशाही मूल्यांना नेहमीच छेद देऊ पाहणाऱ्या देशद्रोहीपेक्षा जास्त धोकादायक आहे. त्याने त्याची आई, बहीण आणि इतर महिलांविरुद्ध अशी विधानं करू नयेत. त्याने तात्काळ आपले शब्द मागे घ्यावेत”, असे ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले सुरू केले. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद (जेईएम) प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्य आणि चार जवळच्या सहकाऱ्यांसह १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले.
जैशचा बहावलपूरमधील मरकज सुभान अल्लाह, तेहरा कलानमधील सरजल कॅम्प, कोटलामधील मरकझ अब्बास आणि मुझफ्फराबादमधील सय्यदना बिलाल कॅम्प यांचा यामध्ये समावेश होता. लष्कराचे गड-मुर्डिकमधील मरकझ तैयबा, बर्नाला येथील मरकझ अहले हदीस आणि मुझफ्फराबादमधील श्वाई नाला कॅम्प यांनाही फटका बसला. कोटली इथल्या मकाज राहिल शाहिद आणि सियालकोटमधील मेहमूना जोया येथील हिजबुल मुजाहिदीनच्या सुविधांना लक्ष्य करण्यात आले.