काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल करत अनेक आरोप केले आहेत. शनिवारी लंडनमधील भारतीय पत्रकार संघटनेशी (Indian Journalists Association) संवाद साधत असताना राहुल गांधी यांनी बीबीसी डॉक्युमेंट्री, चीनचा आक्रमक सीमावाद हाताळण्याबाबत सरकारची भूमिका, भारत जोडो यात्रेचा अनुभव, विरोधकांची एकजूट आणि त्यांच्या केंब्रिज व्याख्यानावरील वाद अशा अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले. भारत शांत राहावा, असे भाजपाला वाटते. विरोधात आवाज उठला की त्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न होतो. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसकडे नावीन्यपूर्ण कल्पना आहेत, पण आताच त्या उघड करणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी म्हणाले, माध्यमे, संस्था, न्यायव्यवस्था, संसद… या सर्वांवर आज हल्ला होत आहे आणि आम्हाला आपला आवाज पोहोचवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आमचा आवाज, जनतेचा आवाज सर्वदूर पोहोचत नाही. कारण माध्यमे बेरोजगारी, महागाई, महिलांविरोधात वाढलेले अत्याचार आणि काहीच लोकांकडे एकवटलेली संपत्ती अशा खऱ्या मुद्द्यांकडे माध्यमांचे दुर्लक्ष होत आहे.

बीबीसी डॉक्युमेंट्रीचा वाद आणि त्यावर प्रतिक्रिया देत असताना सत्ताधाऱ्यांकडून वसाहतवादी मानसिकतेचा आरोप करण्यात आला, यावर प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले, “हे प्रकरण अदाणी यांच्यासारखेच आहे. तेदेखील वसाहतवादी मानसिकतेचे लक्षण होते. ज्या ज्या ठिकाणी विरोध होतो, तिथे तिथे त्यांच्याकडून कारणे देण्यात येतात. खरेतर देशभरात विरोधातला आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. बीबीसी हे केवळ एक उदाहरण आहे. बीबीसीला आता याबद्दल माहिती मिळाली, परंतु गेल्या नऊ वर्षांपासून भारतात हेच सुरू आहे. पत्रकार भेदरलेले आहेत. त्यांना धमकी देऊन हल्ला केला जातो. याउलट जे सरकारचे गुणगान गातात, त्यांना बक्षिसी दिली जाते. हे आता समीकरणच बनले आहे. जर बीबीसीने सरकारविरोधात लिहिणे बंद केले तर सर्व सुरळीत होईल. सगळी प्रकरणे हवेत विरून जातील आणि सर्वकाही सामान्य होईल. ही नव्या भारताची नवी संकल्पना आहे.”

राहुल गांधी पुढे म्हणाले की, भारत शांत राहावा अशी भाजपाची इच्छा आहे. त्यांना वाटते, दलित, निम्न जाती, आदिवासी, माध्यमे सर्वांनी शांत राहावे आणि या शांततेनंतर त्यांना जे काही भारताचे आहे, ते हिसकावून घ्यायचे आहे आणि आपल्या मित्रांना द्यायचे आहे. लोकांचे लक्ष विचलित करायचे आणि जी काही भारताची संपत्ती आहे, ती दोन-चार लोकांमध्ये वाटून टाकायची. ही खरी तर यामधली गोम आहे. माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नव्हता. संस्थात्मक रचनेवरदेखील पूर्ण क्षमतेने हल्ला होत आहे, याआधी आधुनिक भारतात असे कधीही पाहायला मिळाले नव्हते.

भारतात भाजपाविरोधात खूप रोष असल्याचे सांगताना राहुल गांधी म्हणाले, २०२४ च्या निवडणुका बेरोजगारी, मुठभर धनिकांच्या हातात एकवटलेली संपत्ती, लघु-कुटीर उद्योगांचा झालेला नाश यासारख्या मुद्द्यावर लढली जाणार आहे. यामध्ये विरोधक एकत्र येऊन कसे लढा देतात, हेदेखील महत्त्वाचे असेल. आपल्याकडील काही राज्ये स्वतंत्रपणे काम करत आहेत. पण मला असे वाटते की वेगळ्या कल्पनेने जर विरोधक एकजूट झाले तर भाजपाच्या विरोधात निवडणुकीत चांगली कामगिरी करता येईल. विरोधी पक्षांच्या एकजुटीबाबत बराच समन्वय आहे. विरोधकांमध्ये नियमित संवाददेखील होत आहे. आरएसएस आणि भाजपाला पराभूत करण्याची आवश्यकता आहे, ही कल्पना विरोधी पक्षांच्या मनात खोलवर रुजली आहे. रणनीती म्हणून काही मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. काही राज्ये यासाठी अनुकूल आहेत, पण काही राज्यांमध्ये थोडी अडचण असली तरी चर्चा, संवाद या माध्यमातून आम्ही मार्ग काढण्यासाठी सक्षम आहोत.

भारत जोडो यात्रा आणि काँग्रेसची भविष्यातील रणनीती याबाबत राहुल गांधी यांना विचारले असता ते म्हणाले की, यात्रेमधून निश्चितच काही कल्पना आमच्यासमोर आल्या आहेत. पण यावर पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बोलतील. सध्या आमची पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. आम्ही विरोधकांना सोबत घेऊन पुढे चालू. आताच सर्वकाही सांगून मी आश्चर्याचा भंग करू इच्छित नाही.

परदेशात जाऊन भारताची बदनामी केली असा आरोप भाजपाकडून राहुल गांधी यांच्यावर करण्यात येत आहे. याबद्दल विचारले असता गांधी म्हणाले, केंब्रिजच्या व्याख्यानात मी असे काहीही बोललो नाही, ज्यामुळे भारताची बदनामी होईल. मला आठवत आहे, जेव्हा पंतप्रधान परदेशात जाऊन स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात भारतात काहीच झाले नाही, हे सांगत होते. तसेच मला हेही आठवत आहे की, त्यांनी भारताने गमावलेले दशक, ज्याकाळात अमर्यादित भ्रष्टाचार झाला, असेही म्हटले होते. पण मी असे काहीही बोललो नाही, ज्यामुळे भारताची मान खाली जाईल. परंतु जी व्यक्ती परदेशात जाऊन भारताचा अवमान करत आहे, ती व्यक्ती भारताच्या पंतप्रधानपदावर बसलेली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi in london criticized bjp says wants india to be silent kvg
First published on: 06-03-2023 at 11:01 IST