पक्षांतर्गत नाराजी आणि स्पर्धेमुळे राजस्थानमध्ये काँग्रेस पक्ष संकटात सापडला आहे. येथे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात नेतृत्वासाठी संघर्ष निर्माण झाला आहे. गेहलोत सरकारकडून वसुंधराराजे सरकारमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप पायलट यांच्याकडून केला जात आहे. हाच मुद्दा घेऊन पायलट यांनी एक दिवसासाठी लाक्षणिक उपोषणही केले होते. दरम्यान, पायलट यांच्या पाच दिवसांच्या ‘जनसंघर्ष यात्रे’ची सांगता झाली आहे. त्यानंतर आता पायलट यांनी गेहलोत सरकार आणि काँग्रेसला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आगामी १५ दिवसांत वसुंधराराजे सरकारमधील कथित भ्रष्टाचाराची चौकशी न केल्यास आम्ही राज्यभर आंदोलन करू, असा इशारा पायलट यांनी दिला आहे.

गेहलोत यांच्याविरोधात पायलट यांची ‘जनसंघर्ष यात्रा’

सचिन पायलट यांनी पाच दिवसांच्या ‘जनसंघर्ष यात्रे’चे आयोजन केले होते. अशोक गेहलोत सरकारकडून तत्कालीन वसुंधराराजे सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप पायलट यांच्याकडून केला जातोय. हाच मुद्दा घेऊन पायलट यांनी पाच दिवसांच्या ‘जनसंघर्ष यात्रे’चे आयोजन केले होते. ११ मे रोजी या यात्रेची सुरुवात झाली होती. आज म्हणजेच सोमवारी (१५ मे) या यात्रेची सांगता झाली.

हेही वाचा >> Karnataka : “काँग्रेसला मत म्हणजे बलात्कारी, दलालांना मत”; असा प्रचार करणारे वादग्रस्त लेखक करियप्पा यांचा राजीनामा

आम्ही प्रत्येक गावात जाऊन आंदोलन करू- पायलट

“या महिन्याच्या शेवटपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही जनतेत जाऊन संपूर्ण देशात आंदोलन करू. आम्ही आतापर्यंत गांधीमार्गाने आंदोलन केले. वसुंधराराजे सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास आम्ही प्रत्येक गावात जाऊन आंदोलन करू. आम्ही रखरखत्या उन्हात चालत असून आम्हाला त्याचे दु:ख नाही. मात्र प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द झालेल्या तरुणांचे काय? आमचे सरकार भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याचे मी मागील अनेक दिवसांपासून म्हणत आहे,” असे पायलट म्हणाले.

“२०१८ साली मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. तेव्हा मी पक्षाचा चेहरा होतो. सरकारची स्थापना झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत पक्षाचा चेहरा झाले. त्यामुळे गेहलोत आणि मी सोबत लढायला हवे. आरोप करणे सोपे असते. मात्र आपण केलेल्या आरोपानंतर काय कारवाई करीत आहोत, हे लोक पाहात आहेत,” असे सचिन पायलट म्हणाले.

हेही वाचा >> Karnataka : महिलांचे मतदान अधिक झालेल्या मतदारसंघांत काँग्रेसला लाभ; ५२ जागांपैकी काँग्रेसचा २८ ठिकाणी विजय

२० आमदारांनी बंड केल्यानंतर गेहलोत-पायलट यांच्यातील संघर्ष वाढला

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून पायलट-गेहलोत यांच्यात नेतृत्वासाठी लढाई सुरू आहे. २०२० साली काँग्रेस पक्षात बंड झाले होते. या वेळी एकूण २० आमदारांनी गेहलोत यांच्याविरोधात बंड केले होते. यामध्ये पायलट यांचाही समावेश होता. या बंडानंतर आमदारांनी भाजपाकडून पैसे घेतले आहेत, असा आरोप गेहलोत यांनी केला होता. तेव्हापासून पायलट-गेहलोत यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

हायकमांडकडून अद्याप ठोस निर्णय नाही

मागील अनेक दिवसांपासून या दोन बड्या नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. मात्र काँग्रेस हायकमांडने अद्यापही याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. पायलट यांना काही तक्रार असेल तर त्यांनी ती काँग्रेस पक्षासमोर मांडावी. त्यावर काँग्रेसच्या अंतर्गतच तोडगा काढला जाईल. पक्षाच्या विरोधात आंदोलन करणे हे पक्षविरोधी कारवाई समजले जाईल, अशी भूमिका प्रदेश काँग्रेसने घेतलेली आहे.

हेही वाचा >>

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सचिन पायलट काँग्रेसला रामराम ठोकणार?

दरम्यान, मागील साधारण चार वर्षांपासून पायलट-गेहलोत यांच्यात संघर्ष सुरू आहे. राजस्थानमध्ये पायलट यांना मोठे राजकीय महत्त्व आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही. आगामी काही महिन्यांत राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. असे असताना काँग्रेसला पक्षांतर्गत फूट परवडणार नाही. याच कारणामुळे काँग्रेस पायलट यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून पायलट हे गेहलोत यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात ते काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.