उत्तर प्रदेशात रामचरितमानस ग्रंथावरून सुरू झालेल्या वादामध्ये आता उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी उडी घेतली आहे. रामचरितमानस या ग्रंथावरून उत्तर भारतात मोठा वाद सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती म्हणाल्या की, रामचरितमानस नव्हे तर संविधान हा देशातल्या दुर्बलांचा ग्रंथ आहे. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली आहे. मायावती यांनी अखिलेश यांना कुख्यात गेस्ट हाऊस घटनेची आठवण करून दिली आहे.

मयावती यांनी ट्विट केलं आहे की, देशातील दुर्बल आणि उपेक्षित वर्गाचा ग्रंथ म्हणजे देशाचं संविधान. रामचरितमानस किंवा मनूस्मृती हे त्यांचे ग्रंथ नाहीत. संविधान हाच सर्वांचा ग्रंथ आहे. ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दुर्बल आणि उपेक्षितांसाठी एससी, एसटी आणि ओबीसी अशी संज्ञा वापरली आहे. तिथे कुठेही शुद्र हा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे समाजवादी पार्टीने उपेक्षितांसाठी शुद्र हा शब्द संबोधून त्यांचा अपमान करू नये.

मायावती यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, इतर राज्यांप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्ये देखील दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाचे शोषण, अन्याय, संत आणि महापुरुषांची अवहेलना आणि अपमान करण्यात काँग्रेस, भाजपा आणि समाजवादी पार्टी मागे राहिलेली नाही.

हे ही वाचा >> भारतावर कारगिल युद्ध लादणारे पाकिस्तानी माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचे निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेस्ट हाऊस प्रकरणाची आठवण करून दिली

मायावती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहीलं आहे की, “सपा प्रमुखांनी इतरांची वकिली करण्याआधी २ जून १९९५ रोजी लखनौ गेस्ट हाऊसमध्ये काय झालं होतं ते एकदा आठवावं. एका दलिताची मुलगी मुख्यमंत्री होणार होती तेव्हा सपा सरकारने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.”