पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) आठवले गटामध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलाचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या १५ वर्षांपासून असलेल्या ‘जम्बो’ कार्यकारणीला घरचा रस्ता दाखवत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळानंतर पुण्यातील ‘आरपीआय’चा कारभार हा नव्या पिढीच्या हाती जाणार असल्याने प्रस्थापितांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

पुणे शहरामध्ये ‘आरपीआय’चा आठवले गट सक्रिय आहे. काही ठरावीक भागात ‘आरपीआय’ची ताकद आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत या पक्षाचे नगरसेवक निवडून येत असतात. मात्र, पक्षांतर्गत गटबाजी कायम आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला स्थान मिळावे आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या कार्यकारणीमध्ये गेल्या १५ वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या काही पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. हा निर्णय शहराध्यक्ष संजय सोनावणे, तसेच परशुराम वाडेकर, रोहिदास गायकवाड, महेंद्र कांबळे अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

‘जम्बो’ कार्यकारिणीची स्थिती

‘आरपीआय’ची गेल्या १५ वर्षांपासून असलेल्या २२ पदाधिकाऱ्यांच्या ‘जम्बो’ कार्यकारिणीमधील काही पदाधिकारी पक्ष सोडून गेले, तरीही त्यांची नावे कार्यकारिणीत होती. काही पदाधिकाऱ्यांचे निधन झाले, तरी त्या जागी नवीन कार्यकर्त्याला संधी देण्यात आली नाही. काही कृतिशून्य पदाधिकारी हे कायम पदाला चिकटून होते. परिणामी कागदोपत्री मोठ्या असलेल्या या कार्यकारिणीचा पक्षवाढीसाठी उपयोग झालेला दिसून येत नाही. आता ही कार्यकारिणी बरखास्त झाल्याने काही पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

नव्या चेहऱ्यांकडे पक्षाची धुरा ?

जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्यानंतर येत्या १५ दिवसांत नवीन कार्यकारिणी तयार केली जाणार आहे. याबाबत शहराध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले, ‘नवीन कार्यकारणीमध्ये स्थान मिळण्यासाठी इच्छुकांना अर्ज करावा लागणार आहे. जुन्या अनुभवी पदाधिकाऱ्यांना पुन्हा संधी देण्याबरोबरच जास्तीत जास्त नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने ही तयारी करण्यात येत आहे.’

महापालिकेत सत्तेतील वाटेकरी

पुण्यात ‘आरपीआय’चा आठवले गट हा गेली पाच वर्षे भाजपसोबत पुणे महापालिकेमध्ये सत्तेतील वाटेकरी राहिला आहे. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने उमेदवारी देताना काही ठिकाणी दगाफटका केला होता. जागा वाटपात ‘आरपीआय’ला भाजपने १६ जागा दिल्या. मात्र, एका ठिकाणी भाजपने पक्षाचे दोन ‘एबी फॉर्म’ दिले. त्यामुळे संबंधित उमेदवाराचा अर्ज बाद झाला.

दोन ठिकाणी तांत्रिक कारणांनी उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे प्रत्यक्षात १३ उमेदवारांनी निवडणूक लढविली. त्यापैकी पाच ठिकाणी ‘आरपीआय’चे उमेदवार निवडून आले होते. भाजपने पाच वर्षे उपमहापौरपद देऊन ‘आरपीआय’ला सन्मान दिला. डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि सुनीता वाडेकर हे आरपीआयचे दोन उपमहापौर झाले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे भाजपसोबत असल्याने आगामी महापालिका निवडणुकांमध्येही आठवले गटाला तिकीट वाटपात झुकते माप दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील ‘आरपीआय’ आतापासूनच कामाला लागली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नवीन कार्यकारणीमध्ये काम करणास इच्छुक असणाऱ्यांच्या आजवरच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये संबंधित इच्छुकांची आपापल्या भागात शाखा आहे का, हे पाहिले जाणार आहे. त्यामुळे पक्षात सक्रिय असणाऱ्यांनाच संधी मिळू शकणार आहे. त्याचा पक्षवाढीसाठी उपयोग होऊ शकणार आहे’ संजय सोनवणे, शहराध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)