नागपूर : राज्यातील बदललेल्या राजकीय घडामोडीनंतर प्रतिस्पर्धी पक्षांची युती आणि आघाडी झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपातील गुंता वाढला आहे. अशीच स्थिती महाविकास आघाडीत रामटेक विधानसभा मतदारसंघाबाबत निर्माण झाली आहे. शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसने या जागेवर दावा सांगितला असून त्याबदल्यात कोकणातील अधिक एक जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

रामटेक लोकसभा आणि विधानसभा हे शिवसेनेसाठी (उद्धव ठाकरे) पारंपरिक मतदारसंघ आहेत. तसेच काँग्रेसचादेखील हा पारंपरिक मतदारसंघ आहे. पण, आता हे दोन्ही पक्ष एकाच आघाडीत आहेत. पक्षाच्या फुटीनंतर शिवसेनेने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा काँग्रेससाठी सोडली. काँग्रेसने ही जागा नेटाने लढवून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. परंतु आता ठाकरे गटाला रामटेक विधानसभा लढवायची आहे. लोकसभेत काँग्रेससाठी जागा सोडली होती म्हणून विधानसभेत काँग्रेसने येथे दावा करू नये, असे शिवसेचे मत आहे. शिवाय शिवसेनेला काटोल आणि कामठीची जागा हवी आहे. लोकसभेनंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसला नागपूर ग्रामीणमधील सर्व सहाही जागा लढवायच्या आहेत.

हेही वाचा – मावळमध्ये आमदार सुनील शेळके यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागणार?

हेही वाचा – भाजपपुढे आदिवासींच्या नाराजीचे आव्हान?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामटेक विधानसभा मतदारसंघात तर गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक तयारी करत आहेत. त्यांनी उमरेड मतदारसंघाची बांधणी केली होती. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर ते नवीन मतदारसंघाच्या शोधात होते. ते रामटेकमध्ये दहा वर्षांपासून तयारी करत आहेत. परंतु काँग्रेसमधील अंतर्गंत गटबाजीमुळे त्यांना २०१९ मध्ये रामटेकची उमेदवारी मिळाली नव्हती. ज्याला उमेदवारी काँग्रेसने दिली होती, तो आता भाजपमध्ये आहे. त्यामुळे मुळक यांचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय गणिते बदललेली आहेत. शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत आहे. रामटेक ही शिवसेनेची पारंपरिक जागा आहे. २०१९ मध्ये ही जागा भाजप लढली होती. त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी शिवसेनेचे बंडखोर आशीष जयस्वाल विजयी झाले होते. आता जयस्वाल महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्याकडून निवडणूक लढणार आहे, तर काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. त्याबदल्यात शिवसेनेला कोकणातील एक जागा अधिकची वाढवून देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला असल्याची माहिती आहे.