यवतमाळ – जिल्ह्यात आज ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर येणार आहेत. या कार्यक्रमात काही कार्यकर्ते अडथळा आणण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी दडपशाही सुरू केल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे-भोसले यांना कळंब पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. पोलिसांच्या या तुघलकी निर्णयाविरोधात कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष विभागल्याने मूळ पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांची अडवणूक होण्याची शक्यता आहे. शिवाय शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जुन्या पक्षाचे कार्यकर्ते अडथळा आणू शकतात, अशी भीती पोलिसांना आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अशा चळवळीतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी रविवारी नोटीस बजावली आहे. त्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून शांतता भंग केल्यास पोलीस कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
कळंब तालुक्यातील मावळणी येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे यांचे वास्तव्य आहे. काटे या चळवळीत आक्रमक राहत असल्याने कळंब पोलिसांनी त्यांच्या घरी रविवारपासूनच बंदोबस्त लावून त्यांच्यावर नजर ठेवली. दरम्यान आज सोमवारी सकाळी त्यांना पोलीस बंदोबस्तात कळंब पोलीस ठाण्यात आणून येथून ११० किमी दूर असलेल्या वणी पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र त्यांनतर त्यांना कळंब पोलीस ठाण्यात पोलिसांच्या पहाऱ्यात बसवून ठेवण्यात आले. यासंदर्भात कळंब पोलीस ठाण्याच्या निरीक्षक दीपमाला भेंडे यांना विचारणा केली असता, शासन आपल्या दारी कार्यक्रमात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी खबरदारी म्हणून मनीषा काटे यांना ‘डिटेन’ करून कळंब पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांना वणी येथे घेवून जाणार नसल्याचेही ठाणेदार भेंडे यांनी स्पष्ट केले. शासन आपल्या दारी कार्यक्रमावर मराठा आंदोलनाचे सावट असताना मूळ पक्षातील कार्यकर्त्यांचाही नेत्यांनी आणि पोलिसांनी धसका घेतल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले.
हेही वाचा – श्रीवर्धनच्या सभेत शरद पवार यांनी सुनील तटकरेंना अनुल्लेखाने टाळले
आमचा एवढा धाक का? मनीषा काटे यांचा प्रश्न
ही कारवाई म्हणजे पोलिसांची दडपशाही असल्याचा आरोप मनीषा काटे यांनी केला आहे. आमचा एवढा धाक का, ही दडपशाही शासन का करत आहे, असा प्रश्न मनीषा काटे यांनी उपस्थित केला. आपल्याला कळंब किंवा यवतमाळ पोलीस ठाण्यात कार्यक्रम होईपर्यंत स्थानबद्ध करण्याऐवजी वणी येथे घेवून जात असल्याचे का सांगण्यात आले, असे काटे म्हणाल्या. एका महिला कार्यकर्त्यास जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया मनीषा काटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. कार्यकर्त्यांना डांबण्याची ही दडपशाही खपवून घेणार नसल्याचे मनीषा काटे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीची आमच्याशी गाठ असून लढेंगे- जितेंगे असा इशारा काटे यांनी दिला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.