Shashi Tharoor on Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानशी झालेल्या युद्धविरामावरून सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी पाहायला मिळत आहे. लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी याच मुद्द्याला हाताशी धरून शनिवारी (तारीख ३ जुलै) पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फोन आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शरणागती पत्करली, अशी टीका राहुल गांधींनी केली होती. त्यांच्या या टीकेनंतर भाजपाचे नेते चांगलेच आक्रमक झाले होते. दरम्यान, पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धविरामात अमेरिकेची काय भूमिका होती? असा प्रश्न माध्यमांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना विचारला. त्यावर थरूर यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचं स्पष्ट झालं. भारतानं या हल्ल्याचा सूड म्हणून ७ मे रोजी पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचं सांगण्यात आलं. भारतीय लष्कराने राबविलेल्या या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यात आलं. यानंतर पाकिस्ताननेही भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्यदलाने तो यशस्वीरित्या हाणून पाडला. जवळपास ७८ तास भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू होता. यादरम्यान, भारताकडून अचानक युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारताने युद्धविराम केला असा आरोप विरोधकांनी केला आहे.
युद्धविरामाबाबत शशी थरूर काय म्हणाले?
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारची शिष्टमंडळे परदेशात गेलेली आहेत. यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर करीत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील मध्यस्थीच्या दाव्यांवर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रत्युत्तर दिले. भारत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा आदर करतो, पण आम्ही कधीही कुणालाही मध्यस्थी करण्यासाठी विनंती केलेली नाही, असे थरूर यांनी स्पष्ट केले. भारताला पाकिस्तानशी संवाद साधण्यात काही अडचण नाही, पण तो संवाद एका विशिष्ट भाषेत होतो. जर पाकिस्तान दहशतवादाची भाषा वापरत असेल, तर भारत शक्तीची भाषा वापरेल. यासाठी कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही, असंही थरूर यांनी जाहीरपणे सांगितले.
आणखी वाचा : Maharashtra Politics : आधी दाऊदशी कथित संबंधाचे आरोप, आता थेट पक्षात प्रवेश? भाजपाला बडगुजर का हवेहवेसे?
राहुल गांधी युद्धविरामावरून काय म्हणाले होते?
- लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी भारत-पाकिस्तान युद्धविरामावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं होतं.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून फोन आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शरणागती पत्करली, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता.
- भाजपा आणि राष्ट्रीय लोक कसे आहेत, ते मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. थोडा दबाव टाकला की हे घाबरून पळून जातात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.
- अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि म्हणाले की, मोदीजी काय करत आहात? नरेंदर, सरेंडर, त्यानंतर जी हुजूर म्हणत मोदींनी शरणागती पत्करली, असं राहुल गांधी म्हणाले होते.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर युद्धविराम कसा झाला?
खासदार शशी थरूर म्हणाले, “पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू असताना आम्हाला कोणाच्याही सल्ल्याची गरज नव्हती. आम्ही पहिल्या दिवशी सांगितले होते की, जर पाकिस्तान हल्ला करेल तर आम्ही अधिक जोरदार प्रत्युत्तर देऊ आणि जर त्यांनी शरणागती पत्करली तर भारतही पुढील कारवाई करणार नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या कारवाईला पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्कराने तो यशस्वीरित्या हाणून पाडला. यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांच्या संरक्षण प्रमुखांमध्ये युद्धबंदीची चर्चा झाली आणि त्यानंतर युद्धविराम करण्यात आला.” दरम्यान, शशी थरूर यांनी एकप्रकारे राहुल गांधी यांचं विधान खोडून काढलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसची आणखीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : मेहबूबा मुफ्तींसह अनेक काश्मिरी नेत्यांची हिंदू मंदिराला भेट; खीर भवानी मंदिराचे महत्त्व काय?
इंदिरा गांधींचा दिला होता संदर्भ
यावेळी राहुल गांधींनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचंही उदाहरणही दिलं होतं. ते म्हणाले होते की, “तुम्हाला कदाचित आठवत असेल, एक काळ होता जेव्हा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी अमेरिकेतून भारतावर हल्ला करण्यासाठी सातवा ताफा आला होता. हत्यारे आली होती, एअरक्राफ्ट कॅरियर आले होते; पण इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, मला जे करायचं आहे ते मी करेन. हाच फरक आहे. हे लोक सगळे असेच आहेत. स्वातंत्र्याच्या काळापासून यांना शरणपत्र लिहायची सवय आहे… गांधीजी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल हे सगळे नेते शरण जाणारे नव्हते, तर ते महाशक्तींशी लढणारे होते. देशात काँग्रेसचे सरकार असते तर कधीही शरणागती पत्करली नसती.”
भाजपा-काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करली, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकेनंतर बुधवारी भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले. “लोकसभेचे विरोधी पक्ष झाल्यावर देखील राहुल गांधी बालबुद्धीचेच राहिले असून त्यांच्याकडे हे पद सांभाळण्याची परिपक्वता नाही हेच सिद्ध होते,” अशी टीका भाजपeचे प्रवक्ता व राज्यसभेचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केली. त्यावर, “नरेंद्र म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे नरेंद्र नव्हे,” असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रवक्ता पवन खेरा यांनी दिले. पाकिस्तानी लष्कर, हाफिज सईद आणि अझर मसूद या दहशतवाद्यांना देखील ‘सरेंडर’ म्हणण्याचे धाडस झाले नाही असे त्रिवेदी म्हणाले. भाजपच्या टीकेला उत्तर देताना खेरा यांनी “मोदी अजून ट्रम्पबद्दल बोललेले नाहीत. चीनचाही उल्लेख करत नाहीत,” अशी टीका केली.