-मोहन अटाळकर

‘भुकेलेल्‍यांना अन्‍न, तहानलेल्‍यांना पाणी…’ अशी दशसूत्री मांडून मानवतावादाचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांच्‍या विचारांचा वारसा जपण्‍याचा दावा सत्‍ताधारी करीत असताना मंत्रालयातील प्रवेशद्वाराजवळील दशसूत्री हटविण्‍यात आल्‍याने त्‍याच्‍या तीव्र प्रतिक्रिया गाडगेबाबांच्‍या जन्‍मभूमीत उमटल्‍या आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात घेण्‍यात आलेले अनेक निर्णय रद्द करण्‍याची भूमिका शिंदे-फडणवीस सरकारने घेतली. त्‍यातील राजकीय दृष्‍टीकोन लक्षात येतो, पण संत गाडगेबाबांची दशसूत्री हटवण्‍यामागे नेमके काय कारण आहे, अशी विचारणा आता होऊ लागली आहे.

हेही वाचा : वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निमित्ताने मुंडे बंधु-भगिनीत राजकीय चकमक

महाविकास आघाडी सरकारने संत गाडगेबाबा यांची दशसूत्री मंत्रालयाच्या प्रवेशद्वारात लावली होती. नागपूरच्या अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांची दशसूत्री मंत्रालयाच्या प्रवेशद्वारा जवळ लावण्यात येईल अशी घोषणा केली होती आणि त्यानंतर दशसूत्री संगमरवरी फलकात कोरण्यात आली होती, त्याचे समारंभपूर्वक अनावरणही झाले होते. गेले दोन अडीच वर्ष मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर ही दशसूत्री सर्वांनाच प्रेरणा देणारी ठरली होती तथापि नुकताच शिंदे-फडणवीस सरकारने दशसूत्रीचा फलक काढून टाकला.

मानवजातीची सेवाभावी वृत्तीने निरपेक्ष सेवा करून त्यांना अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या जोखडातून बाहेर काढण्याचे महान कार्य संत गाडगेबाबांनी केले. एक थोर समाजसेवक संत, ज्यांनी प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन ‘स्वच्छते’चा महामंत्र संपूर्ण देशाला दिला. त्‍यांनी राबविलेल्या स्‍वच्‍छतेच्‍या कार्याची दखल आपल्या राज्य शासनाला घ्यावी लागली. त्यांच्या नावाने ‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान’ सुरू करण्‍यात आले.

दशसूत्री हटविण्यापेक्षा त्याप्रमाणे वागले पाहिजे – यशोमती ठाकूर

ज्या संत-महात्म्यांच्या विचारांवर महाराष्ट्र उभा आहे, अशा संतांचे प्रेरणादायी विचार मंत्रालयासारख्या जनतेच्या प्रतिनिधिक वास्तूमधून परस्पर हटविणे हे अयोग्य असल्याचे स्पष्ट करीत ज्यांनी हे कर्म केले त्याबद्दल जनतेची जाहीरपणे माफी मागावी आणि संत गाडगेबाबा यांची दशसूत्री पुन्हा मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्‍या संत गाडगेबाबा मिशनच्या अध्यक्ष देखील आहेत. “एखाद्या व्यक्ती द्वेषामुळे जर अशी घटना घडली असेल तर आपण आपल्या समाजसुधारकांचे- संतांचे विचार पायदळी तुडवण्‍यासारखे आहे. दशसूत्री हटविण्यापेक्षा त्याप्रमाणे वागले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण ‘जनतेचे सरकार’ म्हणून मिरवू शकतो. ”, असे ठाकूर यांनी या पत्रात म्हटले आहे.

सरकार दशसूत्री ऐवजी दहशतसूत्री लादण्याचा प्रयत्न करीत आहे – दिलीप एडतकर

“एकीकडे सरस्वतीचे फोटो हटविण्यात येणार नाही अशी घोषणा उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात आणि शिंदे सरकार गाडगे बाबांची दशसूत्री हटवते ही अत्यंत निषेधार्ह बाब असून हे सरकार दशसूत्री ऐवजी दहशतसूत्री लादण्याचा प्रयत्न करीत आहे. ” असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केला आहे. तसेच, अनेक राजकीय नेत्‍यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मानवतावादी तत्त्‍वज्ञान मांडणाऱ्या दशसूत्रीची सरकारला अडचण का झाली, असा प्रश्‍न विचारला जात आहे. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्‍यांनी या घटनेची दखल घ्‍यावी, अशी मागणी केली जात आहे.