मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ८० ते ९० जागांची मागणी केली असतानाच, शिवसेना शिंदे गटानेही महायुतीत १०० जागा मिळाव्यात, अशी मागणी पुढे केली आहे. दोन्ही मित्र पक्षांची मागणी लक्षात घेता भाजपच्या वाट्याला किती जागा येतील, असा प्रश्न भाजपच्या नेत्यांना पडला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यात महायुतीत भाजपकडे किमान १०० जागा मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली. मुख्य नेता व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या बरोबर गेलेल्या अपक्षांसह ४८ आमदारांसाठी त्यांचे मतदारसंघ कायम ठेवणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी दिला आहे. याशिवाय आणखी ५० मतदारसंघांची मागणी महायुतीत करण्यात येणार आहे. महायुतीत शिवसेनेची ताकद असल्याने पक्षाला १०० जागा मिळाव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली. राज्य सरकारच्या लाडकी बहीण, लाडका भाऊ, मोफत एसटी प्रवास, कृषी पंप वीज माफी, पीकविमासारख्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत.लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून झालेली दिरंगाई व त्यामुळे पक्षाला बसलेला फटका लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाने व्यूहरचनेला सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>>श्रीरामाबाबत वादग्रस्त विधान : न्यायालयाने फटकारल्यानंतर आव्हाडांविरोधातील सर्व गुन्हे शिर्डी पोलिसांकडे वर्ग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे गटाची तयारी

तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची ठाकरे गटाने तयारी सुरू केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेना-भाजप युतीत शिवसेनेने १९ जागा लढवल्या होत्या. १४ जागांवर शिवसेनेने विजय मिळविला. यातील आठ आमदार ठाकरे गटात तर सहा शिंदे गटात आहेत. ठाकरे गटाने सर्व मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांची यादी मागवली आहे. चार लोकसभा मतदारसंघांतील २४ विधानसभा मतदारसंघांवर ठाकरे गटाचा दावा कायम आहे. यात एक- दोन मतदारसंघ निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी जादा मागितले जाणार आहेत. या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांना ‘कामाला’ लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठाकरे गटाची ही तयारी पाहून शिवसेना शिंदे गटानेही कंबर कसली आहे.