संजय मोहिते, लोकसत्ता

बुलढाणा : आमदार संजय गायकवाड म्हणजे राजकीय क्षेत्रातील अजब रसायनच. वादग्रस्त विधाने, वादंग आणि आता थेट मारहाण याची जोड, ही त्यांच्या राजकारणाची तऱ्हा राहिली आहे आणि त्यात सुधारणा होण्याची शक्यतचा कमीच आहे. कारण आहे त्यांचे आक्रमक राजकारण.

तीन दशकांच्या दीर्घ प्रतीक्षा आणि संघर्षानंतर गायकवाड २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. मात्र, विधिमंडळात गेल्यावरही त्यांचा आक्रमक बाणा, धाडसी राजकारणाचा पिंड कायम राहिला. यामुळे आपले प्रेरणास्थान एकनाथ शिंदे यांच्या बंडात ते अगदी मुंबई, सुरत, आसामपर्यंत आघाडीवर राहिले. प्रथमच आमदार झाल्यावरही त्यांनी बंडात सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय मोठे राजकीय धाडस होते. कारण, जर हे बंड फसले असते तर उलटफेर झाला असता. मात्र, शिंदेंवरील विश्वासापोटी त्यांनी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली. मुळात आक्रमकपणा, राजकीय धाडस हा त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीचा स्थायीभाव राहिला आहे.

आणखी वाचा-…म्हणून राजकारण सोडून गौतम गंभीर परतला क्रिकेट विश्वात; नेमकं कारण काय?

शिंदे सरकार स्थिरावल्यावर आमदार गायकवाड यांनी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह अन्य पक्षांनाही अंगावर घेतले. त्यांच्या तडाख्यातून थेट उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यातील अन्य नेतेही सुटले नाही. खासदार संजय राऊत तर त्यांचे नेहमीचे लक्ष्यच! आक्रमक, वादग्रस्त विधानानी ते माध्यमांचे लाडके ठरले. यातच ‘केले ते केले, सांगितले ते सांगितले,’ असा बाणा राहिल्याने ते आजवरच्या कारकिर्दीत गाजत राहिले. वादग्रस्त ठरले पण त्यांनी आपल्या शब्दावरून माघार घेतली नाही, हे विशेष. त्यांनी केलेली विकासकामे, बुलढाण्याचा केलेला कायापालट, अडगळीत पडलेले वैद्यकीय, कृषी महाविद्यालय मंजूर करण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकाचा विषय ठरले. मात्र, त्यांच्यामुळे झालेल्या राजकीय वादामुळे ते जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात गाजले व गाजताहेतही.

आणखी वाचा-भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नसल्याने तर्कवितर्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामुळे शिवजयंती मिरवणुकीतील मारहाण, वनविभागाची कारवाई असो की, अलीकडे दाखल झालेले गुन्हे असो, ते आपल्या निर्णयांवर ठाम राहतात. ‘मी केले ते योग्यच,’ असा त्यांचा पवित्रा राहतो. युवकाला केलेल्या मारहाणीची चित्रफीत समाज माध्यमात सार्वत्रिक झाल्यानंतर २ मार्च रोजी त्यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत त्यांचा हाच पवित्रा दिसून आला. बुलढाण्याचे आमदार असेच आहे आणि असेच राहतील, असेच त्यांनी अधोरेखित केले.