सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा जिल्हाध्यक्ष बदलण्यावरून सोलापूर जिल्ह्यात पक्षात गोंधळ उडाला आहे. अनेक वर्षे जिल्हाध्यक्ष राहिलेले स्थानिक ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांना पदमुक्त करून पंढरपूरचे वसंत देशमुख यांची नव्या जिल्हाध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली आहे. तर मावळते जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना प्रदेश उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु हा बदल आपणास विश्वासात न घेता झाल्यामुळे साठे संतापले आहेत. त्यांनी पक्ष सोडून अन्य राजकीय पर्याय स्वीकारण्याची मानसिकता केली आहे.
पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साठे यांच्याशी थेट संपर्क साधून भेटायला बोलावले आहे. त्यामुळे साठे हे पवार यांचा मान राखून पक्षात कायम राहणार की शिवसेना एकनाथ शिंदे किंवा भाजपचा पर्याय स्वीकारणार, याची स्थानिक राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
राजकारणात सहा दशके राहिलेले, शरद पवार यांच्यावर निष्ठा वाहिलेले बळीराम ऊर्फ काका साठे (वडाळा, उत्तर सोलापूर) हे सुमारे २५ वर्षे जिल्हा परिषद सदस्य होते. जि. प. अध्यक्ष, सभापती यांसह अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशा अनेक अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. पक्ष दुभंगलेल्यानंतर शरद पवार यांना साठे यांनी निष्ठेने साथ देत पक्षाचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले आहे. वृध्दापकाळात शरीर साथ देत नसल्यामुळे त्यातच मोहोळ तालुक्यातील तत्कालीन राजकारणामुळे कंटाळून त्यांनी दोन वर्षांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला होता. परंतु पक्षश्रेष्ठींनी त्यांना पदावर कायम ठेवले होते. तथापि, अलिकडे पक्षश्रेष्ठींनी अचानकपणे जिल्हाध्यक्ष बदलून पंढरपूरचे वसंत देशमुख यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवली. तर बळीराम साठे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. अचानकपणे झालेल्या या बदलामुळे साठे हे संतापले असून त्यांचा रोष प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर दिसून येतो. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख हे मोहिते-पाटील गटाचे मानले जातात.
या पार्श्वभूमीवर बळीराम साठे यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेऊन शरद पवार यांची साथ सोडून अन्य राजकीय पक्षांचा पर्याय स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. यापूर्वी अखंड राष्ट्रवादी असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बळीराम साठे यांचे जमत नव्हते. त्यामुळे अजित पवार गटात प्रवेश करण्याचा विचार सोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष किंवा थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. तशी मानसिकता त्यांनी बोलून दाखवली आहे. या घडामोडी दरम्यान शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, या पक्षात अलिकडेच प्रवेश केलेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आदींनी साठे यांची भेट घेतली. तसेच त्यांचे नातेवाईक असलेले भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनीही त्यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केली.
या पार्श्वभूमीवर इकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा तालुक्यातील नेते संजय पाटील-घाटणेकर यांनी बारामतीत शरद पवार यांची भेट घेऊन बळीराम साठे यांच्या नाराजीचा विषय त्यांच्या कानावर घातला. साठे यांचा राग तात्पुरता आहे. ते आपल्यावरील वर्षानुवर्षे असलेली निष्ठा आणि प्रेम सोडू शकत नाहीत, असा शरद पवार यांनाही खात्री आहे. पवार यांनी लगेच साठे यांच्याशी संपर्क साधून त्यांना बारामतीत भेटायला बोलावल्याचे घाटणेकर यांनी सांगितले. घाटणेकर यांची शिष्टाई यशस्वी होणार का, याचीही उत्सुकता आहे.
सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गट एक खासदार आणि चार आमदारांची ताकद बाळगून आहे. यात मोहिते-पाटील कुटुंबीयांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. यापूर्वी जिल्ह्यातील पक्षांतर्गत राजकारणात शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात ज्यांना ताकद देऊन मोठे केले, ती बहुसंख्य गब्बर झालेली मंडळी सध्या पवार यांची साथ सोडून दुरावली किंवा राजकीयदष्ट्या अडचणीत आहेत. त्यामुळे पवार यांचे राजकारण मोहिते-पाटील यांच्यावर अवलंबून आहे. मोहोळचे आमदार राजू खरे हे शरीराने शरद पवार गटात तर मनाने शिवसेना एकनाथ शिंदे गटात मोडले जातात. अन्य आमदार शेवटपर्यंत शरद पवार गटात टिकून राहतीलच, याची खात्री त्यांच्या हालचालीवरून देता येत नाही, असे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वर्तुळात बोलले जाते.