रविवारी (२ जून) तेलंगणा राज्याने आपला दहावा वर्धापन दिन साजरा केला. मात्र, त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भारत राष्ट्र समितीमध्ये (बीआरएस) तेलंगणाचे राज्यगीत आणि चिन्हावरून मोठा वादविवाद सुरू आहे. काय आहे हा वाद आणि राज्यगीत आणि चिन्हामधील वादावरून गोंधळ का होत आहे?

राज्याच्या चिन्हावरून होणारा वाद काय?

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने तेलंगणा राज्यामध्ये बहुमत प्राप्त करत सत्ता स्थापन केली आहे. सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसने राज्याचे संक्षिप्त नाव ‘TS’ वरून ‘TG’ असे केले आहे. तसेच सत्ताधारी काँग्रेसने Telangana State Road Transport Corporation (TSRTC) चे नावदेखील ‘TGSRTC’ असे केले आहे. त्यांनी प्रगती भवनचे नामकरण ज्योतिबा फुले प्रजा भवन असे केले आहे. गेल्या आठवड्यामध्ये रेवंथ रेड्डी यांच्या सरकारने म्हटले की, आधीच्या राज्य चिन्हावर ऐतिहासिक राजवंशांचे प्रतिबिंब दिसायचे. स्वतंत्र राज्यासाठीचा संघर्ष राज्य चिन्हावर दिसायला हवा, यासाठी त्यामध्ये बदल केला जात आहे. नव्या राज्य चिन्हावर चारमिनार, काकतिया कलेने साकारलेली कमान आणि तेलंगणातील हुतात्मा स्मारकाचे चित्र घेण्यात आले आहे.

हेही वाचा : एक्झिट पोल्स फारच हास्यास्पद! आमच्या कामगिरीत किमान सुधारणा तरी होईलच : शशी थरूर

काँग्रेसचे आमदार बी. महेश गौड यांनी म्हटले की, “राज्य चिन्हावर हुतात्म्यांच्या स्मारकाचे चित्र का नको आहे, याचा खुलासा बीआरएस पक्षाने तेलंगणाच्या जनतेला करायला हवा. राज्यगीतामध्ये उल्लेख असलेल्या शब्दांची आठवण या चिन्हामुळे होत नाही का?” तेलंगणा सरकारने रुद्र राजेशम आणि वेंकट रमणा रेड्डी या कलाकारांकडून नव्या बदलांनी युक्त राज्य चिन्ह तयार केले असून गेल्याच आठवड्यात त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले.

भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) काय म्हणणे आहे?

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारत राष्ट्र समितीने रेड्डी सरकारवर अनेक आरोप केले आहेत. रेड्डी सरकार के चंद्रशेखर राव यांचे योगदान आणि वारसा राज्यातून पुसून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा मुख्य आरोप बीआरएस पक्षाने केला आहे. तेलंगणाचे माजी मंत्री के. टी. रामा राव यांनी म्हटले की, “रेवंथ रेड्डी यांनी स्वतंत्र तेलंगणा चळवळीमध्ये भाग घेतलेला नाही. बीआरएसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री केसीआर यांनी राज्य चिन्हाची निवड केली असल्यामुळे रेड्डींना त्यामध्ये बदल करायचे आहेत.”

चारमिनार आणि हैद्राबाद या दोन्ही गोष्टी अतूट आहेत. मात्र, राजकीय सूडबुद्धीमधून रेड्डी अशा प्रकारचे निर्णय घाईने घेत असल्याचा आरोप बीआरएसने केला आहे. “जर सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही राज्यव्यापी आंदोलनास सुरुवात करू”, असेही रामा राव यांनी म्हटले. दरम्यान, एका खुल्या पत्रात माजी मुख्यमंत्री केसीआर यांनी म्हटले आहे की, काँग्रेसने चिन्हात बदल करण्याचा प्रयत्न करून तेलंगणाच्या इतिहासाचा आणि राज्यातील लोकांचा अपमान केला आहे.

तेलंगणा दिनाच्या सोहळ्यावर बीआरएसने बहिष्कार का टाकला?

तेलंगणा राज्यनिर्मिती दिनाच्या पाहुण्यांच्या यादीमुळेही वादाला तोंड फुटले होते. रेवंथ रेड्डी हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांनी राज्य दिनाच्या सोहळ्यासाठी सोनिया गांधी आणि केसीआर यांनाही निमंत्रण दिले होते. मात्र, यामुळे बीआरएस आणि भाजपा या दोन्हीही पक्षांनी आक्षेप घेतला. काँग्रेस पक्षाने राज्य दिनाच्या कार्यक्रमासाठी बाहेरील लोकांना निमंत्रित करून तेलंगणातील लोकांचा अपमान केल्याचा आरोप या दोन्हीही विरोधी पक्षांनी केला. माजी मुख्यमंत्री केसीआर यांनी एका पत्रामध्ये तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यास विलंब करण्यास आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या मृत्यूसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. “गेल्या सहा महिन्यांपासून तेलंगणातील काँग्रेसच्या राजवटीमुळे राज्यात गोंधळ माजला आहे. काँग्रेसच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी केलेली नाही. बीआरएसच्या कोणत्याही नेत्याने सरकारच्या धोरणांवर प्रश्न विचारल्यास पोलिस त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत,” असाही दावा त्यांनी या पत्रामध्ये केला आहे. केसीआर यांनी तेलंगणा दिनाच्या सोहळ्याबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला निमंत्रित न केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देणारे पेमा खांडू आहेत तरी कोण?

तेलंगणा राज्य गीतावरून काय वाद होत आहे?

राज्य सरकारने प्रसिद्ध कवी आंदे श्री आणि ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक एम. एम. कीरावानी यांच्याकडून ‘जय जय हे तेलंगणा’ नावाचे एक राज्य गीत तयार केले आहे. मात्र, या राज्य गीताबाबत काही लोकांमधून नाराजीचा सूर उमटला. कीरावानी हे मूळचे आंध्र प्रदेशचे आहेत. “त्यांच्यापेक्षाही अधिक चांगल्या दर्जाचे संगीत निर्माण करू शकणारे अनेक लोक राज्यामध्ये आहेत”, असा दावा एका बीआरएस नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सगळ्या वादाचे राजकीय परिणाम काय होतील?

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज्यामधील आपले राजकारण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न बीआरएसकडून केला जात आहे. त्यासाठी ते विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी काँग्रेसला घेरताना दिसत आहेत. एकीकडे आपल्या पक्षाची होत असलेली पडझड आणि दुसरीकडे भाजपाची वाढत असलेली ताकद बीआरएससाठी धोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अधिकाधिक चर्चेत राहण्यासाठी आणि आपले स्थान मजबूत करण्यासाठी बीआरएस धडपड करत आहे.