BRS Party in Telangana : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती (BRS) हा पक्ष पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यामागचं कारण म्हणजे, माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्या के. कविता यांनी त्यांचे बंधू के.टी रामाराव यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. केसीआर हेच माझे नेते असून मी फक्त त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार, असं कविता यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर बीआरएस पक्षाला भाजपात विलीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. के. कविता यांच्या या आरोपामुळे राजकीय वादळ उठलं असून ‘बीआरएस’बाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
तेलंगणातील प्रादेशिक पक्ष म्हणून उदयास आलेल्या भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचे नेतृत्व सध्या संघर्षाच्या गराड्यात अडकले आहे. मागील काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता या त्यांचे व बंधू तथा पक्षाचे कार्याध्यक्ष के.टी रामाराव यांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. गेल्या आठवड्यात के. कविता यांनी माजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. या पत्रात त्यांनी राज्यात भाजपाविरोधात ठोस भूमिका न घेतल्याबद्दल केसीआर यांच्यावर टीका केली होती. सध्या तेलंगणात काँग्रेसची सत्ता असून बीआरएस व भाजपा हे दोघेही विरोधीपक्षात आहेत.
बीआरएसला भाजपात विलीन करण्याचे प्रयत्न?
आज, गुरुवारी माध्यमांबरोबर संवाद साधताना के. कविता म्हणाल्या, “केसीआर हेच माझे एकमेव नेते आहेत. मी फक्त त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहे. मागील काही दिवसांपासून बीआरएस पक्षाला भाजपात विलीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी तुरुंगात असताना तसा प्रस्ताव आमच्याकडे आला होता; पण त्यावेळी मी ठामपणे नकार दिला. कारण, भारत राष्ट्र समिती हा तेलंगणातील एक प्रादेशिक पक्ष आहे. राज्यातील जनतेच्या हक्कांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तो जिवंत राहायलाच हवा.”
आणखी वाचा : नितीश कुमारांना मुस्लीम समुदायाच्या रोषाला का सामोरं जावं लागत आहे?
के. कविता यांना झाली होती अटक
गेल्या वर्षी दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने के. कविता यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. के. कविता जवळपास पाच महिने तुरुंगात होत्या आणि नंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. “मी पक्षाशी निष्ठा कायम ठेवली असली तरी, पक्षातील काही लोक माझ्याविरोधात गुप्त कारवाई करीत आहेत,” असं के. कविता यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. भारत राष्ट्र समिती हा पक्ष सध्या कमकुवत झाला आहे का? असा प्रश्न दी इंडियन एक्स्प्रेसने के. कविता यांना विचारला. यावर उत्तर देताना, पक्षाला भाजपात विलीन करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
बीआरएस पक्ष कमकुवत झाला आहे का?
के. कविता म्हणाल्या, “बीआरएस पक्ष सध्या राज्यातील सत्तेबाहेर असला तरी, तो कमकुवत झाला असं मला वाटत नाही. तसे झाल्यास भाजपाला याचा मोठा फायदा होईल. भारत राष्ट्र समितीला कोणत्याही पक्षात मग ते भाजपा असो की काँग्रेस विलीन होण्यापासून रोखण्यासाठी सर्व प्रयत्न झाले पाहिजेत, असं मला वाटतं.” तुम्ही पक्षाचे कार्याध्यक्ष के.टी रामाराव यांच्याबरोबर काम करण्यास तयार आहात का? असा प्रश्न माध्यमांनी के. कविता यांना विचारला. त्यावर बोलताना, के. चंद्रशेखर राव हेच माझे एकमेव नेते आहेत. मी यापुढेही त्यांच्याच नेतृत्वात काम करेन, असं उत्तर के. कविता यांनी दिलं.
हेही वाचा : Shashi Tharoor : शशी थरूर भाजपासाठी फायदेशीर? काँग्रेसच्या गोटात नाराजी का पसरली आहे?
काँग्रेसकडून त्या कथित घोटाळ्याची चौकशी
भारत राष्ट्र समिती पक्षाच्या महिला आघाडीची जबाबदारी स्वीकारणाऱ्या के. कविता म्हणाल्या की, सध्या पक्षाची कामगिरी फक्त सोशल मीडियावर पोस्ट करण्याइतकीच मर्यादित झाली आहे. माजी मुख्यमंत्री केसीआर यांना चौकशी समितीने हजर राहण्याची नोटीस बजावल्यानंतर पक्षाची रस्त्यावरील चळवळ नेमकी कुठे होती, असा प्रश्नही के. कविता यांनी उपस्थित केला. तेलंगणात सत्तास्थापन केल्यानंतर काँग्रेस सरकारने बीआरएस सरकारच्या काळातील ‘कालेश्वरम लिफ्ट सिंचन प्रकल्पा’तील कथित गैरव्यवहारांची चौकशी सुरू केली आहे.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं?
के.टी रामाराव यांचे नाव न घेता कविता म्हणाल्या की, मी सत्य बोलल्यामुळे पक्षातील काही गटांकडून मला लक्ष्य केलं जात आहे. माजी मुख्यमंत्र्यांना मी लिहिलेल्या पत्रात सर्व सत्य उलगडून सांगितली आहेत. सलग १० वर्ष तेलंगणाची सत्ता उपभोगणाऱ्या के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. या पराभवानंतर बीआरएसच्या पक्षनेतृत्वावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र, आता बीआरएसचे प्रमुख के.चंद्रशेखर राव पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. राज्यातील विविध कार्यक्रमाला ते हजेरी लावताना दिसून येत आहे. यादरम्यान, के. कविता यांनी बीआरएस भाजपात विलीन होणार असल्याचा दावा केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.