विरोधकांच्या महाआघाडीची गंभीर दखल भाजपला घ्यावी लागली असून मंगळवारी (१८ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या नव्या स्वरुपातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत २०२४च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा ठरणार आहे.
‘रालोआ’चे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १९ प्रादेशिक पक्षांना बैठकीचे आमंत्रण दिले असून उपस्थित राहणाऱ्या पक्षांमधील काहींना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात स्थान दिले जाणार आहे. ‘रालोआ’मध्ये कोणते व किती प्रादेशिक पक्ष सामील होतील, याचा अंदाज घेऊन भाजप आगामी लोकसभा निवडणुकीची आखणी करत आहे. नव्या स्वरुपात ‘रालोआ’ची बांधणी केली जात असल्यानेदेखील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार रेंगाळल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा – कॅनडात फलकावर झळकली ‘नरेंद्र मोदी दहशतवादी’ची ग्रॅफिटी, प्रशासनाने व्यक्त केला खेद!
भाजपसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्यांमधील ‘रालोआ’मध्ये सामील झालेल्या पक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात प्रामुख्याने सहभागी करून घेतले जाईल. त्यामुळे महाराष्ट्रातून शिवसेना-शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट या दोन्ही फुटीर गटांना ‘रालोआ’च्या बैठकीला बोलवण्यात आले आहे. शिंदे गटाचे प्रतिनिधी उपस्थित राहतीलच, अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल बैठकीत सहभागी होतील. या दोन्ही गटांना मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद दिले जाऊ शकते.
दक्षिणेतील १२९ जागांसाठी जुळवाजुळव
कर्नाटकमध्ये पराभूत झाल्यानंतर भाजपने दक्षिणेकडील राज्यांमध्ये मित्र जोडण्यास सुरुवात केली आहे. तामीळनाडूतील अण्णाद्रमुक ‘रालोआ’मध्ये असून तमिळ मनिला काँग्रेस आणि इंडिया मक्कल कालवी मुन्नेत्र कळघम हे पक्षही जोडले जातील. आंध्र प्रदेशमधील चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगु देसमला बैठकीचे निमंत्रण दिले की नाही याबाबत संदिग्धता कायम आहे. पण, अभिनेता पवन कल्याण यांचा अखंड आंध्र प्रदेशमधील जनसेना हा प्रादेशिक पक्ष ‘रालोआ’मध्ये सामील झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये तेलगु देसम व जनसेना यांची युती होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये एच. डी. देवेगौडा यांचा जनता दल (धर्मनिरपेक्ष) हा पक्ष ‘रालोआ’मध्ये अजून अधिकृतपणे सामील झाला नसला तरी, लोकसभा निवडणुकीत भाजप व जनता दल युती होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातील सत्ताधारी ‘वायएसआर काँग्रेस’ला रालोआमध्ये आणण्यात यश आलेले नसले तरी, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी संसदेमध्ये भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. दक्षिणेतील ५ राज्यांतील १२९ लोकसभा मतदारसंघांपैकी अधिकाधिक जागा घटक पक्षांनी जिंकल्या तरच भाजपला फायदा होऊ शकेल.
हेही वाचा – शेतीमध्ये आधुनिकतेचा पाया अधिक विस्तारणार
उत्तरेत नवे मित्र गरजेचे!
बिहारमध्ये भाजपला नवी समीकरणे मांडावी लागणार असल्याने चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती (रामविलास), उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष, जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थान आवामी मोर्चा, संजय निषाद यांचा निषाद पक्ष हे नवे मित्र भाजपने जोडले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ओमप्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पक्ष, अनुप्रिया पटेल यांचा अपना दल (सोनेलाल) यांच्यासह छोटे जातीनिहाय पक्षही भाजपशी जोडले जातील. राजभर यांच्या पक्षाने समाजवादी पक्षाशी फारकत घेतली आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पक्ष कोणत्याही आघाडीत सामील होणार नसला तरी, मायावती सक्रिय न झाल्याचा अप्रत्यक्ष लाभ भाजपला मिळत आहे. हरियाणामध्ये भाजपला टिकून राहण्यासाठी जननायक जनता पक्षाच्या मदतीशिवाय पर्याय नाही. झारखंड तसेच ईशान्येकडील आसाम, नागालँड, मणिपूर, मेघालय, सिक्कीम या राज्यांतील प्रादेशिक पक्षही रालोआमध्ये सामील झाले आहेत.
‘रालोआ’चा २५ वर्षांचा प्रवास
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १९९८ मध्ये रालोआची स्थापना झाली, संस्थापक सदस्यांमध्ये शिवसेना व शिरोमणी अकाली दल यांच्यासह १६ प्रादेशिक पक्ष सामील झाले होते. २०१९ नंतर दोन्ही संस्थापक पक्षांनी ‘रालोआ’ला सोडचिठ्ठी दिली. अकाली दलाला पुन्हा सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. १९९८ मध्ये रालोआची ९ राज्यांत सत्ता होती, त्यातील ५ राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री होते. आत्ता रालोआमध्ये १६ घटक पक्ष असून १० राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री आहेत.