सोलापूर : सोलापूरची विमानसेवा आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या कथित अडथळा असलेल्या चिमणी पाडकामाच्या प्रश्नावर पुन्हा आंदोलन-प्रतिआंदोलन होण्याची सज्जता होत आहे. विमानसेवेच्या प्रश्नावर राजकीय व सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विविध मुद्द्यांवर राजकीय वातावरण तापविले जात आहे. बोरामणी कार्गो विमानतळ उभारणीचा रखडलेला प्रश्नही प्रदीर्घकाळ दुर्लक्षित न ठेवता लवकर मार्गी लावण्याची आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. जेव्हा जुन्या विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याचा आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी हटविण्याचा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा बोरामणी आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळाच्या उभारणीचा प्रश्नही समोर येतो. एरव्ही, हा प्रश्न शीतपेटीत बंद राहतो. त्यामुळे विमानतळ आणि विमानसेवेचा प्रश्न आता अधुनमधून आंदोलन-प्रतिआंदोलन आणि केवळ चर्चा आणि इशारेबाजीपुरताच समोर येतो.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा – “एके काळी इतरांमध्ये दहशत पसरवणारे आज स्वतः दहशतीखाली आहेत,” योगी आदित्यनाथांचा माफियांना इशारा!

शहरात होटगी रस्त्यावर अवघ्या ३५० एकर क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या जुन्या विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी सोलापूर विकास मंच नावाच्या संघटनेने आंदोलन हाती घेतले आहे. या जुन्या विमानतळावरून विमानसेवा सुरू करताना लगतच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या ३८ मेगावाट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या चिमणीचा अडथळा ठरतो म्हणून ही चिमणी पाडून टाकण्याची मागणी होत आहे. या चिमणीचे बांधकामही बेकायदेशीर असल्यामुळे सोलापूर महापालिका प्रशासनाकडे हा विषय कार्यवाहीसाठी प्रलंबित आहे. महापालिकेच्या प्रशासक शीतल तेली-उगले यांच्यासमोर या प्रश्नावर यापूर्वीच सुनावणी झाली असून आता निकाल देणे आणि तद्अनुषंगाने पुढील कार्यवाही होणे बाकी राहिले आहे.

गेल्या नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये विमानसेवेच्या बाजूने सोलापूर विकास मंचने आंदोलन हाती घेतले असताना दुसरीकडे आणि याउलट, सिद्धेश्वर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी वाचविण्यासाठी आणि बोरामणी आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळाची रखडलेली उभारणी लवकर पूर्ण व्हावी म्हणून सिद्धेश्वर कारखाना बचाव, बोरामणी विमानतळ विकास संघर्ष समितीने प्रतिआंदोलन केले होते. तत्पूर्वी, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्वर्यू धर्मराज काडादी यांना जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न झाला होता. त्यातूनच काडादी यांच्याकडून विमानसेवेच्या बाजूने आंदोलन करणाऱ्या एका प्रमुख कार्यकर्त्याला आंदोलनस्थळी जाऊन पिस्तूल काढून दाखविण्याचाही प्रकार घडला होता. पुढे उभयतांमध्ये चांगलाच संघर्ष पेटला असता त्यास राजकीय रंगही चढला होता. विशेषतः भाजपचे आमदार विजय देशमुख आणि धर्मराज काडादी यांच्यातील शीतयुद्धाला तोंड फुटले होते. त्यातूनच आमदार विजय देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळवूनच दाखवावे, असे खुले आव्हान काडादी यांनी दिले असता देशमुख यांनीही काडादी यांना स्वतः तुम्हीच रणांगणावर उतरण्याचे प्रतिआव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत असून नवीन समीकरणे तयार होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे मानले जात असताना आता पुन्हा विमानसेवेचा आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या चिमणी पाडकामासाठीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा – रायगड जिल्ह्यात काँग्रेसला गळती सुरूच

जुन्या विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी अर्जुन रामगीर नावाच्या ७२ वर्षांच्या वृद्ध नागरिकाने सोलापूर-मुंबई आत्मक्लेष पदयात्रा काढून मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सोलापूरची विमानसेवा तात्काळ सुरू करण्याचे आश्वासन देऊन रामगीर यांना परत पाठविले होते. तर यापूर्वी, सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही सिद्धेश्वर साखर कारखान्याचा गळीत हंगम संपताच तेथील सहवीज निर्मितीची चिमणी पाडून टाकण्याचा मनोदय बोलून दाखविला होता. आता सिद्धेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम संपला आहे. त्यामुळे तेथील चिमणी पाडून टाकण्यासाठी सोलापूर विकास मंचने उचल खाल्ली आहे.

विमानसेवेसाठी येत्या १ मे महाराष्ट्र दिनाची मुदत सोलापूर विकास मंचने दिली आहे. परंतु धर्मराज काडादी यांनी विमानसेवेसाठी सिद्धेश्वर सहवीज निर्मिती प्रकल्पाची एकमेव चिमणी अडथळा ठरत नाही इतर १०६ अडथळे असल्याची बाब पुढे करीत, तूर्त सोलापूरच्या विमानतळावरून उडान योजनेतून २७ आसनी हेलिकॉप्टर सेवेसाठी लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती दाखवावी आणि बोरामणी विमानतळाचा विकासही प्राधान्यक्रमाने व्हावा, अशी मागणी केली आहे. बोरामणी विमानतळाच्या विकासात वनजमिनीचा अडथळा असल्याची माहितीही दिशाभूल करणारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – भारतीय निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीविरोधात सर्वोच न्यायालयात याचिका, जाणून घ्या अरुण गोयल कोण आहेत?

काडादी यांच्या म्हणण्यानुसार डायरेक्टर ऑफ सिव्हिल नागरी विमान वाहतूक विभागाच्या निर्णयाप्रमाणे गेल्या आठवड्यात भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या मुंबई कार्यालयातील उपसरव्यवस्थापक मग्गीवार आणि होटगी रोड विमानतळाचे अधिकारी चांपला हे सोलापूर विमानतळसेवेत येणार्‍या अडथळ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी सिद्धेश्वर साखर कारखान्यात आले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या सूचनेनुसार होटगी रोड विमानतळाच्या जागेच्या मर्यादा लक्षात घेता बोरामणी विमानतळाचा विकास होणे गरजेचे आहे. जोपर्यंत बोरामणी विमानतळ सुरू होत नाही तोपर्यंत उत्तर भारतातील सिमला, चंदीगड भागामध्ये चालतात तशी २७ आसनी हेलिकॉप्टरची सेवा होटगी रोड विमानतळावरून चालू करता येईल. सोलापुरातून हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, शिर्डी, तिरूपती, गोवा या शहरांसाठी ही सेवा चालू केली तर ती फायदेशीर होईल.

बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने २०१० पासून आजपर्यंत ५७९.२५ हेक्टर क्षेत्र भूसंपादन करण्यासाठी १२२ कोटी ७९ लाख रुपये खर्च केले आहेत. येथील गायरान जमिनीच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना असल्यामुळे बोरामणी विमानतळाच्या विकासात कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये. या विमानतळाच्या विकासात वनजमिनीचा अडथळा असल्याची दिशाभूल केली जाते. प्रत्यक्षात येथील गट क्रमांक ५६९ मधील १३.६० हेक्टर जमीन १९८७ साली वनविरहीत करून जिल्हाधिकाऱ्यांनी ती जमीन रामचंद्र मांग यांना दिली आहे. १९६८ मध्ये गट क्रमांक ५७४ या क्षेत्रातील १०७.२१ हेक्टर भूसंपादन करून ती बोरामणी ग्रामपंचायतीला मोफत गायरानसाठी राखीव ठेवण्यात आल्याचा दावा बोरामणी विमानतळ विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. राजू चव्हाण यांनी केला आहे. हा दावा खरा असेल तर शासनाने इच्छाशक्ती दाखवून बोरामणी विमानतळाच्या विकासाला चालना देणे अपेक्षित आहे.